२६ जानेवारी, भारताचा गणतंत्र दिवस. लहाणपणी हा दिवस म्हणजे परवणीच वाटायचा. सकाळी लवकर, मस्त शुभ्र युनिफॉर्म, कॅनवास चे शूज घालून शाळेत झेंडा वंदन करायला जायचो. शाळेत वेगळेच वातावरण असायचे. देशभक्तिपर गीते मोठ्याने वाजत असायची. NCC विद्यार्थींचे मार्चिंग परेड व्हायची. विशेष अतिथींच्या हस्ते झेंडा वंदन व्हायचे. काही सांस्क्रुतिक गाणी आणि कार्यक्रम व्हायचे. देश प्रेमाने ऊर अगदी भरुन यायचा.
आपण भारतीय आहोत याचा अभिमान होता, आहे आणि कायम राहीलच. नुसत्या २६ जानेवरी व १५ ऑगस्टलाच नव्हे तर कुठेही फडकणारा आपला तिरंगा बघितला की मला त्या समोर नतमस्तक व्हावे हीच भावना मनी येते. गर्व वाटतो आपण या ‘सुजलाम सुफलाम’ देशाचे नागरिक असल्यचा.
आज लहानपणच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या – शाळेतले झेंडा वंदन झाले की माझे वडिल आम्हाला शिवाजी स्टेडियमवर परेड दाखवायला घेऊन जायचे. ती परेड संपली की मग घरी येताना मस्त जिलेबी आणि समोसे किंवा बटाटे वडे घेऊन यायचो. घरातल्या सगळ्यांनी टि.व्हि. वरची राजपथची परेड बघत एकत्र बसून ते खायचे…वाह! काय दिवस होते ते…हा २६ जानेवारीचा दिनक्रम ७ वी पर्यंत होता…८ वीत गेल्यावर शिंग फुटली आणि मग स्टेडियमची परेड वगैरे बघायल जाणे बंद झाले. कॉलेज मधे शाळे सारखी मजा येत नसे. झेंडा वंदन करुन घरी येऊन टि.व्हि. वर दिल्ली चे प्रक्षपण बघत असू. जिलेबी-समोसे-बटाटे वडे मात्र कायम होते. किंबहुना या खाण्या शिवाय तो दिवस साजरा झाला असे वाटतच नसे.
अगदी उद्याही माझा भाऊ थोडी का होईना जिलेबी घरी घेऊन येईल…फरक फक्त एवढाच आहे की यंदा ती गरम-गरम जिलेबी खायला आणि ती खात-खात दिल्लीची परेड बघायला, मी मात्र भारतात नाहिये.




ताज्या प्रतिक्रिया