‘ती’ – २१

25 09 2015

अचानक ‘ती’ चे लग्न ठरल्याचे तिने कळविले. एकदम तडकाफडकी! लग्नकार्यही लगबगीने उरकले. मी तर विना लग्न पत्रिका, आमंत्रण स्विकारुन मंगलकार्यालयात पोहचले होते, मला आठवतंय. नवरा मुलगा दिसायला तिच्यापेक्षा गोरा, देखणा, उजवा, चांगली नोकरी, सुखवस्तू कुटुंब. ‘ती’ तशी सावळी, दिसायला चार-चौघींसारखी.

लग्नानंतर तिच्या आईकडून तिचे सासरचे किस्से कानावर येत होते. सासरी ती अगदी मजेत व आनंदात होती. सासूला सासूरवास ठाऊक नव्हता. दोघी सकाळी मस्त चहा घेत, गप्पा मारत बसायच्या, वगैरे. मलाही खूपच आनंद वाटला. प्रत्येक मुलीला असे सासर हवे असे वाटले.

हळूहळू ती संसारात रमली. एकाच शहरात राहून भेटी-गाठी कठिण झाल्या. पाच-एक वर्षां अलिकडची गोष्ट असावी. मी लक्ष्मी रस्त्यावर एका दुकानात शिरले आणि अचानक ‘ती’ दिसली. बरोबर नवराही होता. मी बोलायला गेले. ती ही बोलली – अलिप्तपणे, तुटक व मोजकंच! जणू मैत्री नसून आमची फक्त तोंडदेखली ओळख होती. काम झाले तशी, न थांबता दोघे नजरेआड गेलेही.

‘ती’शी छान मैत्री होती. पण ‘ती’ ने स्वत:च काही संपर्क ठेवला नाही. जणू ‘ती’ला टाळायचे आहे. मला की कोणाला? की एखादे कुणी नको ‘त्या’ विषयाला उगाच हात घालू नये म्हणून मुद्दाम…

‘ती’च्या लग्नाला नक्कीच दहा वर्ष झाली असावीत. अजून मुल-बाळ नाही. यामुळेच तर नसेल ना..? या बेरक्या समाजाने बोलचे असेल का तिला या टोकदार, धारेच्या सावालाने? इतके की ‘ती’ ने स्वत:च्याच कोषात स्वत:ला लपवून घेतले. दूर-दूर केले ‘ती’ने जाणून-उमगून, आपल्याला इतरांपासून…

की अजून काही असेल? घाईत झालेले लग्न फसवून तर केले गेले नसेल? एखादे व्यंग लपवायला? आणि ‘ती’ पदरी पडले व पावन झाले म्हणत जगतेय आपली. हे आणि असे खंडीभर प्रश्न मनात उभे राहतात ‘ती’चा विचार केला की.

मागे म्हणाले तसे – मुलं होणं, न होणं, मुलं होऊ देणं, न देणं हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे व आपण त्यात फार स्वारस्य घेणं मला पटत नाही. सहज म्हणून जाणून घ्यायलाही विचारते कोणीही – मुलं आहेत का? कोण आहे? किती? हा स्वाभाविकपणाचा एक भाग झाला. नेहमी हे विचारण्यात हिणविणे वा तुच्छ लेखणे हा हेतू असतो असे नाही. खाजगी असलेतरी ‘खाजगी’ वर्तुळाच्या आत घुसण्याची काहींना (निदान जिवाच्या मैतरांना) बुभा असतेच! आणि ती असावीच लागते…याने झालीच तर मदतच होते.

आज कितीतरी विनापत्य जोडपी नांदतायत आनंदाने. त्यांना प्रयत्न करुनही नाही झाली मुलं. हे वास्तव स्विकारुन, एकमेकांवर तितकेच प्रेम करत, जपत, सुखाने संसार करतात. यातील काहींनी अनाथ मुलांना दत्तक घेऊन आपले आणि त्या निराधार लेकरांचे आयुष्य संपन्न केले. अनेक जोडप्यांना (होणार असलीतरी) मुलं नकोच आहेत. ते आपल्या मतांवर ठाम आहेत. ओळखी-पाळखीतले मुलं असलेले लोकं जेव्हा मुलांच्या त्रासापाई आसवं गाळतात तेव्हा ही लोकं स्वत:ला भाग्यवानच समजत असतील. संसारसुखाला ‘मुलं असणं’ या मोजमापात तोलणंच मुळी चुकीचं आहे. मागासलेला समाज कधी कात टाकणार देव जाणे? बरं हा कलंक अजूनही लागतो फक्त बायकांचाच माथी. पुरुषांच्या पौषार्थाला कुठेही कणभर सुद्धा धक्का लावला जात नाही. मी काही वादात शिरत नाही किंवा पुरषांच्या विरोधात नाही. पण निदान आपल्या देशात पुरुषप्रधान संस्कृती(?) प्रचलीत आहे. हे सुधारण्याची नितांत गरज आहे. प्रेम, आदर एकीकडे आणि शारिरीक व्यंग दुसरीकडे. माझ्या ओळखीत एक-दोघी आहेत ज्यांना चक्क फसवून विवाह करण्यात आला. एकीने घटस्फोट घेऊन सासरकडच्यांना अद्दल शिकवली. दुसरे लग्न करुन सुखी झाली. दुसरी दोष नसला तरी रोष ओढवून घेत जगतेय.

वाटल्याने सुख वाढते आणि संकटं, दुःख कमी होते. आणि म्हणूनच माझ्या या मैत्रिणीला सांगावेसे वाटते की तू ही अढी, हा न्यूनगंड मनातून काढून टाक व बोलती हो. हे यातले अगदीच काहीही असले/नसले तरी “मी खूप सुखात आहे!” एवढेच सांग…!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape


अंमलबजावणी

Information

१ प्रतिसाद

13 10 2015
Pranita

Changle lihiles. Tuza prashnach nahi ..tu lihitesach khup chan. Dolyat pani anates.

यावर आपले मत नोंदवा