‘ती’ – २७

17 01 2017

सकाळी ‘ती’ हाॅस्पिटल मधे दाखल झाल्याचे समजले. गेले वर्षभर ‘ती’च्या हाॅस्पिटलच्या वाऱ्या वाढल्या होत्या. २-३ दिवसात बरं वाटले की ती घरी येईल या विचारात असतानाच तिची तब्येत बिकट झाली व एका दिवसात सगळे संपले.

काही सुचायला मार्गच उरला नाही…

“आता तुझ्या घरच्यांना, माझ्या काकू (जिला आम्ही ‘आई’ म्हणतो) शी बोलून घ्यायला सांग. तू ही बोल जमेल तसं. घरात तीच मोठी आहे. एकदम साधी आहे. काही टेन्शन घेऊ नकोस. आमची मम्मी गेल्यावर हिनेच एका परीने आम्हाला लहानाचे मोठे केले. आम्ही तिला मानतो.” नुकतीच प्राथमिक पसंती झाली होती आमची, तेव्हा तो मुलगा (आताचा माझा नवरा) मला म्हणाला होता. देवाच्या दयेने योग जुळून आला व त्या माझ्या ‘अहो आई’ (चुलत सासू) झाल्या. अवघा ६-७ वर्षांचा ऋणानुबंध, (दूर राहत असल्यामुळे) एकून ८-१० भेटी. पण पहिल्या काही भेटींमधेच त्या फार मायाळू असल्याचा प्रत्यय आला…येतच राहिला.

आम्ही आमचे लग्न इंटरनेटवर ठरविले पण प्रत्यक्ष भेटलो ते त्यांच्या समोर. पुढे मग लग्नाची तारिख ठरविणे, खरेदी, कोर्ट मॅरेज, खरं लग्न, ती घाई-गडबड, त्यांचा तो उरक, सिद्धीविनायक, देव दर्शन. माझ्या माहेरी आम्ही गेलो, माझ्या कुलदैवतेला. केवढे आवडले होते त्यांना माझं माहेरचं घर, रत्नागिरी, गणपतीपुळे, सिंधुदूर्ग, समुद्र, भगवतीचे देऊळ! “हा पट्टा बघायचा राहिला होता. तुझ्यामुळे बघून झाला…” पायरी चढताना माझा हात धरत त्या म्हणालेल्या मला आठवतंय.

मी इकडे येऊन लगेच गाडी चालवायला लागले त्याचे कौतूक, काही नविन पदार्थ केला की मला कधी करून घालतेयस? हा प्रश्न…फार हौशी. माझ्या डोहाळ-जेवणाला हिरवी साडी लागते म्हणून त्यांनी कोणाकरवी ती पाठवून दिली होती. लोकांना तसदी होईल म्हणून आम्ही सांगत होतो, पण त्यांच्या मनात आले की त्यांनी ते केलेच समजा. मानव सुलभ डावे-उजवे त्यांच्या ठायीही होते. पण त्यांच्या मायेचे पागडे इतकं वजनदार होतं की त्यापुढे सगळे हलकंच. ‘ती’ने सगळ्यांवर भरभरून वेडी माया केली. एका अनाथ जीवाला आपले केले. त्याला नावं, घर, कुटुंब तर दिलेच पण ममता दिली. नवऱ्या पश्चात कष्ट करुन त्याला एकटीने हिंमतीने वाढवले.

आमच्यातले कुणा ना कुणाची वर्षातून एकदा भारतात फेरी होतेच. त्यांना नुसती कुणकुण लागली तरी त्या कंबर कसून तयारीला लागायच्या. कुठे चकल्या, चिवडा, लाडू, पापड-कुरडया, कुठे हळद-मसाला. वयोमानानुसार सगळे जमायचेच असे नाही. मग मुलं रागवणार, बॅगेत जागाच नाही तुझ्या खाऊ साठी सांगणार आणि निमूटपणे तिने बनविलेले  सगळे बॅगेतून इकडे येणार आणि मग आम्ही त्यावर ताव मारणार. हे गेली अनेक वर्ष मी बघत आले आहे. “मी जिवंत आहे तोपर्यंत मी बनवणारच.” हे त्यांचे बोलणे त्यांनी खरे करुन दाखविले.

प्रत्येक सणा-सुदीला काय-कसे करायचे हे त्या सांगायच्या. त्यातले सगळे करायला जमायचेच असे नाही. इकडे अमेरिकेत अमुक-तमुक गोष्ट मिळत नाही किंवा करता येत नाही हे कळल्यावर त्या आधी अमेरिकेच्या नावाने बोटं मोडायच्या व मग स्वतःच त्यातील पळवाटा सुचवायच्या. फार गंमत वाटायची. (अमेरिकेवर तसाही त्यांचा रोष होता. काय करणार? अमेरिकेने त्यांच्या लाडक्या मुलांना त्यांच्यापासून लांब केलं होतं.) कुळाचार करावा हा त्यांचा आग्रह होता पण हट्ट नव्हता. त्यांचे विचार सुधारित होते. म्हणूनच जाती बाहेर प्रेमविवाह करणाऱ्या आपल्या पुतण्याच्या मागे त्या ठामपणे उभ्या राहिल्या, तो ही दीराचा राग ओढवून व विरोध पत्करुन. त्यांच्यासाठी त्यांच्या मुलाचा आनंद इतर कुठल्याही गोष्टापेक्षा अधिक महत्वाचा होता.

त्या फार शिकलेल्या नव्हत्या पण वाचन पुष्कळ केले होते. खूप फिरल्या होत्या. यादोन्हीचे श्रेय त्या दिवंगत नवऱ्याला द्यायच्या. कधी प्रसंगी दोन कवितेच्या ओळीही सुचायच्या त्यांना…कुठे नात्यात लग्न, कार्य निघाले की त्या निघायला एका पायावर तयार. अगदी हल्लीच त्या ‘द्वारका’ बघून आल्या, मुला-नातवंडांसाठी आशिर्वाद मागून आल्या.

त्या कधी कुणाबद्दल वाईट बोलल्याचे मला स्मरत नाही. अलीकडे मात्र त्या बोलताना हळव्या व्हायच्या. जुन्या आठवणी सांगत बसायच्या. “तुला सांगते रुही,….” अशी सुरुवात करुन मनातला एखादा सल हळूच डोकं वर काढायचा.

ठेंगणी – बैठी मूर्ती, गहू वर्ण, पिकलेले केस, कपाळावर गोंदलेले बारिक कुंकू, सांधेदुखीमुळे थोडे अडखळत चालणे, नाशिक-धुळे कडील बोलायची लकब, प्रचंड उत्साह, फिरायची हौस आणि ऐकूनच जगण्याची हौस!

काॅफी, चाॅकलेट, आईस्क्रिम, आणि मसाला डोसा खास आवडीच्या गोष्टी. आत्ताही कुणी लहानगी आजीसाठी, (तिला लवकर बरं वाटावं म्हणून) कॅडबरी घेऊन आली होती. ती कॅडबरी तशीच पडलीए अजून फ्रिज मधे. त्या ती न खाताच निघून गेल्या…कायमच्या…कुणालाही कसलीही पूर्व-कल्पना न देता…त्यांचे त्यांनाही न उमजता!

या मकरसंक्रांतीला, उत्तरायणात शिरणारा सुर्य, आधीच्या पिढीचा, शेवटचा प्रतिनिधी असलेला एक तेजस्वी तारा घेऊन मावळला.

फोन केल्यावर, “हा बोल बेटा…” अशी मायाची हाक आता कायमची बंद झाली!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – २६
‘ती’ – २५
‘ती’ – २४
‘ती’ – २३
‘ती’ – २२
‘ती’ – २१
‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape





‘ती’ – २४

17 11 2015

माझा मित्र ‘ती’च्या प्रेमात वगैरे होता. ती त्याच्याच कॉलेज मधली, त्याची ज्युनियर. माझेही स्टडी सेंटर तेच कॉलेज. त्याने कधीतरी ‘ती’ची तोंडदेखली ओळख करुन दिली. मला फक्त तिचं नावं लक्षात होतं.

एके दिवशी अचानक कोणीतरी मुलगी मला भेटायला माझ्या शक्रवारपेठेतल्या रुमवर आली. तिने नाव सांगितले तरीही मी तिला पाहून जरा गोंधळलेच. मग तिने माझ्या मित्राचे नाव घेतले. आणि लगेच लिंक लागली. ‘ती’ त्याची ती होती तर…

ती काही कामासाठी मी राहते तिथे आली होती व तिला काही पैशांची गरज होती. त्याने तिला सांगितले असावे की मी त्याच परिसरात राहते. ती माझा माग काढत माझ्याकडे आली. रक्कम अगदीच शुल्लक नव्हती. पंधरावर्षा पूर्वी तेवढ्या पैशात अर्ध्या महिन्याचे मेसचे जेवता येऊ शकत होते. ‘ती’ने हे पैसे त्याला लगेच द्यायला सांगते असे म्हणून गळ घातली. मीही तयार झाले. नशिबाने तेवढे होते माझ्यापाशी. तिचे धन्यवाद वगैरे स्विकारुन मी पैसे दिले व ते पैसे स्विकारुन ‘ती’ निघून गेली.

ती जाताच माझ्या मैत्रिणीने मला फटकारलेच की विसर आता हे पैसे. तिची बत्ताशी खरी निघेल हे वाटलेच नव्हते तेव्हा. ‘ती’ गेली ती गेलीच. नंतर ती काही मला भेटली नाही. तो भेटला काही वेळा पण कुठेकाही मागमूस नाही. मी सुद्धा स्वत:हून पैसे परत मागितले नाहीत. असतात आपले काही घेणेकरी असा विचार करुन मी त्यांवर पाणी सोडले. माणूस चुकून विसरतो कधीतरी.

मुद्दा तो नाहीच मुळी, ज्यावेळी मी तिला मदत केली त्यावेळी शिक्षण, पुस्तकं, पार्ट-टाईम नोकरी, रुमचे भाडे, मेसचा डब्बा या सगळ्यांत महिन्याचा हिशेब जुळवणे ही कसरतच होती. घरुन पैसे घेणं मी जवळ-जवळ बंद करुन टाकलं होतं. जे करायचं ते स्वत:च्या बळावर हा नारा. त्यात हा भुरदंड (तेव्हा) मोठा होता. ‘ती’ला ते विसरणे फारच सहज, सोईस्कर व सोप्पं होतं. आणि मला…?

पुढे तिचे त्याच्याशी लग्न झाले. दोघांनी भरपूर पगाराच्या नोकऱ्या पटकावल्या. परदेशात राहिले बरीच वर्ष. त्यात आनंदच आहे. मधली काही वर्ष संपर्क तुटला. जुना विषय तर मी केव्हाच विसरले होते पण एक माणूसकी म्हणून ‘ती’ने नुसती आभासी ओळख तरी ठेवावी ना? ते ही नाही… आज एवढा काळ लोटल्यावर मी थोडीच पैसे परत दे म्हणणार आहे?

काही माणसं त्यांच्या विशिष्ट वर्तवणूकीमुळे लक्षात राहतात. ‘ती’ त्यांतलीच एक!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – २३
‘ती’ – २२
‘ती’ – २१
‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape





‘ती’ – २३

28 10 2015

‘ती’ माझी दूरची नातेवाईक. उन्हाळ्यात ती कुटुंबासोबत अमेरिका फिरायला आली होती. आमचे निमंत्रण स्विकारुन ‘ती’ घरी आली. खरंतर ती आमची पहिली आणि (आता म्हणावं लागतंय) शेवटची भेट!

‘ती’ ला दोन मुली. मोठीचे वय १३/१४ असेल तर लहान ८/९ वर्षांची. ‘ती’ चांगल्या हुद्द्यावर नोकरीला होती. सावळी, बेताची उंची, मध्यम बांधा. दर दिवशी न चुकता योगासनं, सुर्यनमस्कार, खाण्या-पिण्यात पथ्य, ‘ती’ आम्हाला सुदृढ राहणे कसे जरुरीचे आहे हे सांगत होती. मस्त जेवण, (तिच्या आवडीची) वोडका, गप्पांबरोबर माहोल छान रंगला होता. दुसऱ्या दिवशी त्यांना नायगाराला निघायचे होते. भरपूर फिरुन, खरेदी करुन, मजेत सुट्टी घालवून ‘ती’ भारतात परतली.

मागच्या महिन्यात एका पहाटे फोन किणकिणला. ‘ती’ची तब्येत अचानक बिघडली, ‘ती’चे काही खरं नाही…ही बातमी! एकदम काही सुचेनासे झाले. मग कळले, दुपारी ‘ती’ गणपती कार्यक्रमात मुलीच्या नाच बघत असताना कोसळली व बेशुद्ध झाली. आधी घरचा डॉक्टर व मग हॉस्पिटलला नेले तोवर मेंदूत रक्तस्त्राव होऊन ‘ती’ची तब्येत गंभीर झाली होती. त्या दिवशी रात्री तिला कृत्रिम श्वासोश्वास देणाऱ्या यंत्रावर ठेवण्यात आले. डॉक्टरांनी ‘ती’ला ‘ब्रेन डेड’ अर्थात ‘मेंदू निकामी मृत’ घोषित केले. वैदकीय दृष्ट्या ‘ती’ गेलेली होती. पण तरी काहीतरी चमत्कार होईल आणि ती डोळे उघडेल म्हणून तिचे घरच्यांनी (खोटी) आशा बाळगून तिचा कृत्रिम श्वासोश्वास सुरु ठेवला होता. तिची केस सांगून भारतभरातील, परदेशात इतर कुठे, काही मदत मिळते का ते शोधण्यात आले पण सगळीकडून नकारच येत होता. फार भीषण परिस्तिथी झाली होती. कृत्रिम श्वासोश्वासामुळे ऊर धडधडत असतो आणि ते पाहून आपले माणूस जिवंत असल्यासारखे वाटते. आणि अशा वेळी मन सत्य स्विकारायला तयार होत नाही.

‘ती’ ला उच्च रक्तदाबाचा त्रास होता, ज्याकडे तिने कानाडोळा केला. शिवाय तिला रक्तवाहिन्यांचा एक विकार होता, ज्यात त्यांच्या भिंती नाजूक होतात. त्यामुळे अती रक्तप्रवाह झाल्यास त्या लगेच फुटतात किंवा वाहिन्यांना कोंब येतात. ‘aneurysm’ असे नाव आहे त्या दोषाचे. हे ती गेल्यानंतर कळले. परंतू हा विकार अनुवंषिक असू शकतो व तिच्या नातेवाईकांची ही चाचणी करावी लागली.

मेंदूतील रक्तस्त्राव इतका झाला की मेंदू व कवटी यातील पूर्ण जागा रक्ताच्या गुठळ्यांनी भरली. ‘ती’चे वाचणे अशक्य झाले. सगळे शरिर नियंत्रित करणारा मेंदूच निकामी झाला. वैदकीय भाषेत याला ‘ब्रेन डेड’ म्हणतात. आणि कानूनी भाषेतही ‘ब्रेन डेड’ म्हणजे ‘डेड’! यापुढे तिला किती काळ कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवायचे हे हॉस्पिटलने घरच्यांवर सोपविले. ७-८ दिवसात ‘ती’ गेल्याचे कळले.

जो पर्यंत आपल्या माहितीतल्यांशी एखादी गोष्ट होत नाही तोवर आपल्याला त्याचे गांभीर्य कळत नाही. ‘ती’ गेली! आमच्या घरी आम्हा जमलेल्यांनी ती सांगत होती,”मीच तुमच्यात वयाने सगळ्यांत मोठ्ठी आहे पण मीच सर्वांच्यात फिट आहे!”. काटेकोर पथ्य, व्यायाम करणाऱ्या ‘ती’चे शब्द आठवले. तिच्या मुलींसाठी जास्त हळहळायला होते. जाताना ‘ती’, तिच्या मुलींच्या चेहऱ्यावरची ‘हसी-खुशी’ घेऊन गेली…!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – २२
‘ती’ – २१
‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape





‘ती’ – २१

25 09 2015

अचानक ‘ती’ चे लग्न ठरल्याचे तिने कळविले. एकदम तडकाफडकी! लग्नकार्यही लगबगीने उरकले. मी तर विना लग्न पत्रिका, आमंत्रण स्विकारुन मंगलकार्यालयात पोहचले होते, मला आठवतंय. नवरा मुलगा दिसायला तिच्यापेक्षा गोरा, देखणा, उजवा, चांगली नोकरी, सुखवस्तू कुटुंब. ‘ती’ तशी सावळी, दिसायला चार-चौघींसारखी.

लग्नानंतर तिच्या आईकडून तिचे सासरचे किस्से कानावर येत होते. सासरी ती अगदी मजेत व आनंदात होती. सासूला सासूरवास ठाऊक नव्हता. दोघी सकाळी मस्त चहा घेत, गप्पा मारत बसायच्या, वगैरे. मलाही खूपच आनंद वाटला. प्रत्येक मुलीला असे सासर हवे असे वाटले.

हळूहळू ती संसारात रमली. एकाच शहरात राहून भेटी-गाठी कठिण झाल्या. पाच-एक वर्षां अलिकडची गोष्ट असावी. मी लक्ष्मी रस्त्यावर एका दुकानात शिरले आणि अचानक ‘ती’ दिसली. बरोबर नवराही होता. मी बोलायला गेले. ती ही बोलली – अलिप्तपणे, तुटक व मोजकंच! जणू मैत्री नसून आमची फक्त तोंडदेखली ओळख होती. काम झाले तशी, न थांबता दोघे नजरेआड गेलेही.

‘ती’शी छान मैत्री होती. पण ‘ती’ ने स्वत:च काही संपर्क ठेवला नाही. जणू ‘ती’ला टाळायचे आहे. मला की कोणाला? की एखादे कुणी नको ‘त्या’ विषयाला उगाच हात घालू नये म्हणून मुद्दाम…

‘ती’च्या लग्नाला नक्कीच दहा वर्ष झाली असावीत. अजून मुल-बाळ नाही. यामुळेच तर नसेल ना..? या बेरक्या समाजाने बोलचे असेल का तिला या टोकदार, धारेच्या सावालाने? इतके की ‘ती’ ने स्वत:च्याच कोषात स्वत:ला लपवून घेतले. दूर-दूर केले ‘ती’ने जाणून-उमगून, आपल्याला इतरांपासून…

की अजून काही असेल? घाईत झालेले लग्न फसवून तर केले गेले नसेल? एखादे व्यंग लपवायला? आणि ‘ती’ पदरी पडले व पावन झाले म्हणत जगतेय आपली. हे आणि असे खंडीभर प्रश्न मनात उभे राहतात ‘ती’चा विचार केला की.

मागे म्हणाले तसे – मुलं होणं, न होणं, मुलं होऊ देणं, न देणं हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे व आपण त्यात फार स्वारस्य घेणं मला पटत नाही. सहज म्हणून जाणून घ्यायलाही विचारते कोणीही – मुलं आहेत का? कोण आहे? किती? हा स्वाभाविकपणाचा एक भाग झाला. नेहमी हे विचारण्यात हिणविणे वा तुच्छ लेखणे हा हेतू असतो असे नाही. खाजगी असलेतरी ‘खाजगी’ वर्तुळाच्या आत घुसण्याची काहींना (निदान जिवाच्या मैतरांना) बुभा असतेच! आणि ती असावीच लागते…याने झालीच तर मदतच होते.

आज कितीतरी विनापत्य जोडपी नांदतायत आनंदाने. त्यांना प्रयत्न करुनही नाही झाली मुलं. हे वास्तव स्विकारुन, एकमेकांवर तितकेच प्रेम करत, जपत, सुखाने संसार करतात. यातील काहींनी अनाथ मुलांना दत्तक घेऊन आपले आणि त्या निराधार लेकरांचे आयुष्य संपन्न केले. अनेक जोडप्यांना (होणार असलीतरी) मुलं नकोच आहेत. ते आपल्या मतांवर ठाम आहेत. ओळखी-पाळखीतले मुलं असलेले लोकं जेव्हा मुलांच्या त्रासापाई आसवं गाळतात तेव्हा ही लोकं स्वत:ला भाग्यवानच समजत असतील. संसारसुखाला ‘मुलं असणं’ या मोजमापात तोलणंच मुळी चुकीचं आहे. मागासलेला समाज कधी कात टाकणार देव जाणे? बरं हा कलंक अजूनही लागतो फक्त बायकांचाच माथी. पुरुषांच्या पौषार्थाला कुठेही कणभर सुद्धा धक्का लावला जात नाही. मी काही वादात शिरत नाही किंवा पुरषांच्या विरोधात नाही. पण निदान आपल्या देशात पुरुषप्रधान संस्कृती(?) प्रचलीत आहे. हे सुधारण्याची नितांत गरज आहे. प्रेम, आदर एकीकडे आणि शारिरीक व्यंग दुसरीकडे. माझ्या ओळखीत एक-दोघी आहेत ज्यांना चक्क फसवून विवाह करण्यात आला. एकीने घटस्फोट घेऊन सासरकडच्यांना अद्दल शिकवली. दुसरे लग्न करुन सुखी झाली. दुसरी दोष नसला तरी रोष ओढवून घेत जगतेय.

वाटल्याने सुख वाढते आणि संकटं, दुःख कमी होते. आणि म्हणूनच माझ्या या मैत्रिणीला सांगावेसे वाटते की तू ही अढी, हा न्यूनगंड मनातून काढून टाक व बोलती हो. हे यातले अगदीच काहीही असले/नसले तरी “मी खूप सुखात आहे!” एवढेच सांग…!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape





‘ती’ – १६

15 09 2015

माझ्या जन्मा आधीपासून आमच्या दोघींच्या आईंची एकमेकींशी घट्ट मैत्री होती. तिच्या आईला सगळे ‘भाबी’ म्हणायचे. आमच्या चाळी शेजारी त्यांचा बंगला होता. अगदी गडगंज श्रीमंती, गाई-म्हशी, दुध-दुभते, घरीच कुकुटपालन, गाड्या, बागकामाला माळीबुवा! भाबी अतिशय प्रेमळ व निगर्वी होत्या. आमच्याशी त्यांचे विशेष सख्य होत्या. त्यांना तीन मुलं. आजची ‘ती’ ही त्यांची मोठी लेक.

‘ती’ चे वय पंचावन्नच्या आसपास असेल कारण तिचा मोठा मुलगा माझ्या वयाचा आहे. मध्यम उंची, सुदृढ, गोरी, आत्ता केस कापलेले आहेत पण तेव्हा एक पोनी, पंजाबी ड्रेस, बोलघेवडी, थोडासा घोगरा आवाज, हसरी मुद्रा आणि जणू आईकडून वारसाहक्काने मिळालेला निगर्वीपणा!

‘ती’ वाढली श्रीमंतीत पण तिचं लग्न एका हुशार, सामान्य, होतकरु तरुणाशी लावून देण्यात आले. ह्या तरुणाने पुढे खूप मेहनत घेऊन असामान्य कामगिरीने बलाढ्य उद्योग साम्राज्य उभं केले. आज त्यांच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त आहे. त्यांच्या उद्योगधंदा देशभर पसरला आहे.

त्या भाबी गेल्या पण ‘ती’ आमच्या संपर्कात होती. माझ्या बहिणीची लग्नाची पत्रिका द्यायला मी ‘ती’च्या घरी गेले. तिथे जाऊन त्यांच्याशी आपण काय बोलणार ही मनात शंका होती पण हे श्रीमंत लोक असलेतरी त्यातले नाहीत अशी आईने खात्री दिली. ‘ती’ने हसून माझे स्वागत केले आणि मनातले दडपण एकदम कमी झाले. मी पुण्यात काय करते, कुठे राहते अशी आस्थेने चौकशी केली. मी नको-नको म्हणत असताना मला खाऊ-पिऊ घातले. कधी काही लागले तर नि:संकोचपणे सांग असे मला सांगितले.

‘ती’ खूप बोलत होती, स्वत:बद्दल, आपल्या नवर्याबद्दल, मुलांबद्दल, शून्यातून उभ्या केलेल्या सगळ्या डोलार्याबद्दल! नवर्याची हुशारी, नेतृत्वाचे गुण, आपल्या गावातल्या लोकांना रोजगार मिळावा म्हणून कंपनीत त्यांना कशा नोकर्या दिल्या, वसाहत बांधून दिली. ‘ती’ने ह्या वयात चिकाटीने एम.बी.ए पूर्ण केले होते. पैसा आहे म्हणून शिकली हे बोलणे सोप्पं आहे. पण सगळं आहे, मग आणखी काही करायची गरजच काय असे म्हणणारेही आहेतच की. जे आहे ते सांभाळायला ही जमायला हवे.

माहेरची सुबत्ता असूनही ती ने नव्या संघर्षात नवर्याला साथ दिली. जगाचे चांगले वाईट अनुभव ती सांगत होती. जितका व्याप जास्त तितके ताप जास्त. बाहेरुन दिसते तसे नेहमीच असते असे नाही.

पुढे काही वर्षांनी मी व माझी आई माझ्या लग्नाची पत्रिका द्यायला ‘ती’च्या घरी गेलो. यंदा पूर्वीचे दडपण तर नव्हतेच. दरम्यान तिच्या मुलाचे लग्न होऊन घरी सून आली होती. सूनही बोला-वागायला छान होती. माझी प्रगती, माझे छंद याला ‘ती’ने दाद दिली. माझा होणारा नवरा कोण, कुठला, काय करतो ही चौकशी केली. माझ्या आईच्या हातच्या पदार्थांची चव अजून इतक्या वर्षांनंतरही कशी जिभेवर रेंगाळतेय वगैरे दिलखुलास गप्पा रंगल्या. आई सोबत असल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तिची सून सुद्धा आमच्यात सहभागी झाली.

‘ती’ तिच्या सूनेला व मला कौतुकाने सांगत होती,”हिची (माझी आजी) मुंबईहून काय छान मिठाई आणायची…वर्ख लावलेल्या मिठाईचे भारी आकर्षण असायचे आम्हाला तेव्हा!”. मनोमनी मी अवाक् झाले. ‘ती’ ला कशाचीच कमी नव्हती, तेव्हाही आणि आत्ताही. तरीही किती सहजतेने ‘ती’ने आपल्या सूनेसमोर व माझ्यासमोर हे बोलून टाकले. आत एक बाहेर एक, किंवा आम्ही कोणीतरी बडे रईस, आम्हाला कसले कौतुक असे तिच्या ठायी नाही. तसेच आपल्याकडे नेहमी कुणी ना कुणी कोणत्यातरी आशेनेच येते हा पूर्वग्रह बांधून, दुसर्याला उडवून लावणेही नाही. किंवा एखादी आपली गोष्ट सांगितली तर आपल्याला कमीपणा येईल ही दांभिकता नाही.

माझ्या लग्नात ‘ती’, सूनेला आवर्जून घेऊन आली होती. निघताना आईला मिठ्ठी मारुन लग्नकार्य चांगले झाले हे सांगायला ‘ती’ विसरली नाही.

खरंतर कोण कुणाकडे अपेक्षेने जात-येत नसतं. पण नाती जपणं, ती टिकवणं ही देखील एक कसब आहे. काही माणसांचं ‘साधेपण’ हे त्यांचं खरं ऐश्वर्य असतं. ही ‘ती’ मला तशी ‘प्रतिभावान धनाढ्य’ भासते.

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape





‘ती’ – १५

11 09 2015

मी एकोणीसाव्या वर्षी नोकरीला लागले. तेव्हा माझे सगळेच सहकारी माझ्याहून वयाने बरेच होते. मेहनतीचे फळ म्हणून असेल किंवा होतकरु, लहान म्हणून असेल पण सगळे प्रेमाने वागायचे, वागवायचे. ‘ती’ ही त्यांतलीच एक होती.

‘ती’ गोरी, नाकावर चष्मा, गोड हसू, खट्याळ बोलणं, सुबक ठेंगणी. ‘ती’ बंगाली. पण पुण्यात वाढल्यामुळे मराठी तर इतके अस्खलित बोलते की मातृभाषा असूनही, मराठी बोलायची लाज वाटते अशा अमराठी जीवांना थोतरीत बसेल. ‘थोडंसं खाल्लं की आणखी जास्त भूक लागते’ याला ‘ती’ (बंगाली असूनही) ‘भूक खवळली’ हा वाक्प्रचार वापरते. यातच सगळे आले. ‘ती’ चे इंग्रजीही अफलातून आहे, अगदी अग्रगणी व सुप्रसिद्ध वर्तमानपत्रात पत्रकारीता करण्या इतके. पण मला ‘ती’ची वेगळी ओळख करुन द्यायची आहे.

‘ती’ चे एका मुलावर प्रेम होते. तिच्या बोलण्यात त्याचा खूप वेळा उल्लेख असायचा. वयाच्या अदबीमुळे मी स्वत:हून त्याच्याबद्दल तिला कधीच काही विचारले नव्हते. तो मुंबईचा होता एवढेच ठाऊक. एकदा तो तिला भेटायला येणार होता. जेवणाच्या सुट्टी आधी थोडावेळ ती मला म्हणाली,”रुही बेबी, (हो. मला बेबी झाले तरी ती अजूनही मला याच नावाने हाक मारते) तो आलाय. चल तू पण. आपण एकत्र बाहेर जाऊ लंचला.” तेव्हा ‘कबाब में हड्डी’ वगैरे गावीही नव्हते. मी पण तिच्या खास मित्राला भेटूया या उत्साहात तिच्या बरोबर निघाले. आम्ही वेळेच्या आधीच रेस्टॉरंटला पोहचलो आणि टेबल रिझर्व केला. वाट पाहत असताना एक तरुण आत शिरला. तिच्याकडे बघून हसत आमच्या दिशेने आला. लागलीच आणखी एक तरुण आत येताना दिसला. त्याचा काखेत कुबड्या होत्या. तो आमच्या टेबलवर येताच ‘ती’ ने माझी ओळख करुन दिली. मला एका क्षणासाठी काहीच कळेनासे झाले. हे अनपेक्षित होते. भानावर येत मी हस्तांदोलन केले. आधी आलेला तरुण त्याचा मित्र होता. गप्पा करत करत जेवण झाले. पुढे त्याच्याशी छान ओळख झाली.

धडधाकट असलेल्या ‘ती’ चा ‘तो’ दोन्ही पायांनी पांगळा आहे. हे पचविणे मला जड गेले. तिचे घरचे लग्नाला तयार नव्हते. तब्बल आठ एक वर्षांनी त्या दोघांनी लग्न केले. तो कामानिमित्त परदेशात आला. दोघांनी तिथेच संसार थाटला. तो हुशार आहे. त्याच्या बुद्धीने त्याने कमतरतेवर मात केली. त्याने उत्तम करियर घडविले.

कालांतराने मी ही परदेशी आले. आम्ही फोनवर बोलत होतो. ‘ती’ सांगत होती,”अॉफिस जवळच घर बघतो आम्ही. बरं पडते. मी इकडे गाडी चालवायला लागले. त्याला ऑफिसला सोडावे-आणावे लागते. तो गाडी चालवतो पण मलाही गाडी लागते बाहेरची कामे करायला.” तिचे सगळेच आयुष्य त्याच्या भोवती फिरत होते. तिच्या बोलण्यात त्याच्यासाठी कुठे आईची माया होती, कुठे बायको या नात्याने त्याच्या हुशारीचे कौतुक होते, कुठे प्रेयसीची काळजी होती, कधी त्याच्या कर्तृत्वाचा अभिमान डोकावत होता. दाखवायला ही राग, तक्रार, त्रागा, कंटाळा नव्हता. आणि वेळप्रसंगी यातील एक किंवा सगळ्या गोष्टी तिने दर्शविल्या असत्यातरी ते वागणे मनुष्यसुलभ वृत्तीला धरुनच आहे. तेवढी मुभा तिला नक्कीच आहे. संयम नेहमीच बाळगता यावा अशी सक्ती कुठं आहे?. तो कधी ढळला ही असेल. बोलणे आणि करणे यात जमिन-अस्मानाची तफावत असते. आणि ‘ती’ सगळं आनंदाने करतेय.

तिची परदेशात स्थिरावण्याची मुख्य कारणं होती, अपंगांसाठी इथे असलेल्या सोई, दिली जाणारी समानतेची वागणूक. अगदी खरं होते ते. परदेशात अपंगांना दयेचा नजरेने कोणी बघत नाही. त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी योग्य त्या सोई करण्यात मात्र देश कार्यशील असतो. अशांसाठी खास प्रकारच्या कार, आरक्षित पार्कींग, दुकानांमधे बसून खरेदी करता येईल अशा बैठ्या गाड्या, व्हीलचेरसकट आत जाता येईल अशा बस, तशी प्रसाधनगृह आणि पुष्कळ काही.

प्रेम आंधळं असतं म्हणतात पण ‘ती’ ने असे काही प्रेम केले की प्रेमाला एका नविन अर्थ, एक नविन परिभाषा दिली! ‘ती’ने त्याचे आयुष्य नुसते सुखकरच नाही तर सुकर ही केलं.

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape





‘ती’ – ११

2 09 2015

अकाळी वडिल गेले. त्यांचे कार्य उरकून मी परत नोकरीवर रूजू झाले. मन हळवे झाले होते. आठवणींनी टचकण डोळ्यांत पाणी येई. मी परत आले कळल्यावर माझी मॅनेजर माझ्या डेस्कपाशी थांबली. मला गहिवरून आले. ती सांतवन करत म्हणाली,”वाईट झालं. पण तुला तुझे वडिल इतकी वर्ष लाभले तरी, मी अगदी लहान असताना माझे वडिल गेले. त्यांचा चेहराही मला आठवत नाही!”

एवढेच बोलून ती निघून गेली. माझं दु:ख उगाच हलकं झाल्यासारखं वाटायला लागलं आणि तिचंच सांतवन करावंसं वाटायला लागलं.

‘ती’ चायनीज होती. शिकायला पुण्यात आली व तिथेच नोकरीला लागली. तिच्याशी फक्त कामापुरतेच बोलणं होत असे. बरेच वर्ष पुण्यात काढल्यामुळे बोलता येत नसलेतरी तिला मराठी कळते असे काहीजण म्हणायचे.

त्या कठिण समयी तिने माझ्या दु:खावर जी फुंकर व मनावर जो चटका दिला, त्यामुळे आपल्याहूनही कमनशिबी लोकं आहेत याची जाणीव झाली. त्यासाठी ‘ती’ चे आभार मानायचे मात्र राहूनच गेले.

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape





‘ती’ – ८

13 09 2014

दर वर्षी वटपोर्णिमेला मला या ‘ती’ ची आठवण येते. अगदी न चुकता! लग्ना आधीची सुद्धा कित्तेक वर्ष ‘वट पोर्णिमा’ म्हटले की याच डोळ्यांसमोर येत. आत्ता ही याच येतात.

त्यांचे नाव ‘शुभांगी घाणेकर’. पण सहसा उल्लेख ‘घाणेकर बाई’ असा. आमच्या घरी त्या घरकामाला होत्या. बारीकशा, सावळ्या, बेताची उंची, एक वेणी, तोंडावर वांगाचे डाग, गरिबीला साजेसे बसलेले गाल, पण वावर चुणचुणीत, कष्टाळू, कामाचा उरक भयंकर! माझी आई त्यांना “कामाला वाघ आहेत” असे कौतुकाने म्हणायची. त्यांचे घर बरेच लांब होते. साधारण अर्धातास चालून मग होडीने तरं आेलांडून त्यांचे गाव होते. त्यांची ३-४ घरकामं होती आणि त्या कामांसाठी त्यांना येणे भाग होते.

दोन लहान मुलगे, नवरा आणि या. त्यांचा नवरा अगदीच ऐतखाऊ नव्हता. कुठेकुठे हंगामी गवंडी कामाला होता खरा पण त्याची कमाई दारुत घालवायचा. मग मारहाण, शिवीगाळ हे ओघाने आलेच. तो दिसायला बराच बरा, बाईंहून तरुण व लहान वाटायचा. कष्टांनी बाई खंगल्यासारख्या दिसायच्या. त्यांच्याच कमाईवर घर चालायचे. शिवाय नवर्याला काम नसेल तेव्हा त्याच्या दारुला पण या पैसे पुरवायच्या. मोठा मुलगा असेल ५-६ वर्षांचा, तो बोला-चालायला चुणचुणीत होता. छोट्या २.५ – ३ वर्षांचा, रडका, मुडदुस झाल्यासारखे हात-पाय होते. या मुलांसाठी त्या जगत होत्या. माझी आई त्यांना लागेल ते पुरवायची. कुठे सणावाराला कपडे, कुठे खाऊ, साबण, कुठे छत्री, कुठे पुस्तकं-दप्तर. बाईंचे जेवण आमच्याकडेच होते. त्या छोट्याला दर दिवशी बटाट्याची भाजी लागायची. माझी आई न चुकता एका बटाट्याला फोडणी देत असे, मग घरी कुठलीही भाजी असो. आम्ही तिला बोलायचो की फार लाडावून ठेवतेस बाईंच्या मुलाला पण आमच्याकडे लक्ष न देता आई त्यांना प्रेमाने जेवू घालायची.

एकदा बाईंचे काहीतरी बिनसले होते. चेहरा, अंग काळे-निळे पडलेले. त्याचच त्या कामात असताना त्यांचा नवरा आमच्या दाराशी येऊन त्यांना दारुच्या नशेत िशव्या देऊ लागला. माझ्या वडिलांनी पोलिसांची भीती घालून त्याला पळवून लावले. त्यांच्या गावाकर्््यांना पण हे यांचे प्रकरण ठाऊक होते. थोडे दिवस गेले की बाईंच्या नवर्याला कोण जाणे पण ही अवकळा लागत असे. पुन्हा एके दिवशी असेच झाले आणि तो ढोरासारखे बाईंना मारताना त्यांचे शेजारी मध्ये पडले आणि याला पोलिसांच्या हवाली केले.

बाई उशीरा घरी आल्या. आणि आल्या त्या रडतच. झाला प्रकार कळल्यावर खरंतर आम्ही आनंदलोच. “बरं झालं गजा आड केला, पोलिसी खाक्या मिळेल तेव्हाच डोळे उघडतील या राक्षसाचे” असा विचार मनात आला. पण बाईंचे काहीतरी वेगळेच. त्या पोलिसांशी मध्यस्ती करुन नवर्याला सोडविण्यात मदत करा अशी याचना माझ्या वडिलांना करत होत्या. आम्हा भावंडांचे डोकंच सटकले. ‘अरे काय बाई आहे??? जीवावर बेतेल असा मार खाते दारुड्या नवर्याचा तरी त्याचाच पुळका???’ रागच आला होता बाईंचा. अजाणच वय ते आमचे. सुदैवाने माझ्या वडिलांनी तिला मदत केली. आणि शेवटी एकदाचा त्यांचा नवरा सुटला कोठडीतून.

दुसर्या दिवशी बाई कामावर आल्या. आईचा उपास होता. चहा घेत त्या आईला म्हणाल्या “माझाही उपास आहे. आज वट पोर्णिमा ना!”. आम्हाला हसावे की रडावे कळेना!!! एवढे रामायण झाले तरी…एक जन्म काढताना जड आणि हा नवरा हवा त्यांना ७ जन्म!

मी स्त्रीमुक्ती, स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीसमानता वगैरेची पुरस्करती! एकीकडे असा विचार आला की ही बाई का एवढे सहन करते? सोडून का नाही देत अशा व्यसनी माणसाला? तसंही हीच रेटतेय संसारा(?) चा गाडा…मग का अजूनही स्वतःला अबला समजते? केवळ अशिक्षित आहे म्हणून? की माहेरचा पाठींबा नाही म्हणून? की लोकलज्जेस्तव? पण जगाला माहीत आहेच नवरा कसा आहे ते. दुसरीकडे वाटले किती सहनशील असावे कोणी? की जीव गुंतलाय? की ‘आपले’ माणूस कसेही वागले तरी ‘आपले’च हे संस्कार उराशी बाळगून जगणार अशा बायका मरेपर्यंत आणि आयुष्यभर असेच संसाररुपी आगीत सरपणासारख्या जळत राहणार? अशीच व्यथा अनेक कष्टकरी स्त्रियांची आहे. आपण मदतीचा हात जरी पुढे केला तरी त्या तो घेतीलच असं नाही. मग होईल ती (आणि त्यांना मानवेल ती) मदत करण्या पलीकडे आपल्या हातात काहीच उरत नाही!

आई बाईंच्या त्या छोट्या मुलाला दररोज का बटाट्याची भाजी बनवून द्यायची, का त्यांना हवे-नको ते बघायची, व माझे वडिल का त्या दिवशी बाईंच्या नवर्याला सोडवून आणायला त्यांच्या सोबत पोलिस स्टेशनला गेले या आणि अशा अनेक प्रश्नांची कोडी आपोआप उलगडत गेली…

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape





‘ती’ – ७

12 09 2014

Note : या ‘ती’ ला आपण ‘त्या’ म्हणूया. कारण मी त्यांना एकेरी संबोधत नाही.

‘त्या’ आल्याच! माझ्या बाळाच्या बारशाच्या आमंत्रणाचा स्वीकार करुन ‘त्या’ नक्की येतील असे वाटत होते. पण तरी आडवळणाचा, भर उन्हाळ्यातला, कंटाळवाणा, परगावचा प्रवास करून त्या येतील का? त्यांना मुलांच्या गडबडीत जमेल का? असे प्रश्न मनात डोकावून जात होते. पण ‘त्या’ आल्याच… ‘माझ्या’ साठी ‘त्या’ आल्याच!

तब्बल ४ वर्षांनंतरची भेट. एकमेकींना बघून आम्ही मनोमन सुखावलो. माझ्या बाळाला त्यांनी प्रेमाने जवळ घेतलं. मी म्हणाले “छान वाटले आलात.” त्यावर त्या म्हणाल्या “राहवलेच नाही. ठरवलं काही झालं तरी तुला भेटायचंच. मुलं पण म्हणाली – आई, तू जाच. आम्ही करतो मॅनेज. आयुष्यात पहिल्यांदा एकटीने परगावचा प्रवास केला.” माझ्या घरच्यांच्या तर त्या चांगल्याच परिचयाच्या आहेतच पण माझ्या नवर्याला त्या प्रथमच भेटत होत्या. पुढे गप्पा रंगल्या.

‘त्या’ माझ्या ८ वी – १० वी च्या टिचर! ऐन पंचविशीतल्या, गोर्यापान, उंच, प्रसन्न व्यक्तिमत्व, चेहर्यावर कायमस्वरुपी फुललेलं हसू, आणि अगदी बोलघेवड्या! वडिलांचा विरोध पतकरुन त्यांनी प्रेमविवाह केला होता. रत्नागिरी सारख्या छोट्या शहरात ते गुपीत राहतं तर नवलंच. आमचा ५-६ मैत्रिणींचा ग्रुप होता. आम्ही त्यांच्या भोवती घोळका करु लागलो. त्या ही आमच्यात सामील झाल्या. त्यांच्या घरापासून समुद्र जवळ. एकदा आम्हा मैत्रिणींचा समुद्रावर जाण्याचा बेत ठरला. त्यांनी स्वतः घरी येण्याचे सुचविले का आम्हीच स्वतःहून त्यांच्या घरी गेलो हे नीटसं आठवत नाही पण त्या नंतर जातच राहिलो, जातच राहिलो. त्यांच्या वाढदिवसाला गेलो, त्यांचे बाळ बघायला गेलो, कधी शिकायला परगावी जाते हे सांगायला, कधी रिझल्ट कळवा़ला, कधी नोकरीचे पेढे, कधी onsite हून आणलेली, (त्यांच्या मुलांसाठी मुद्दाम राखून ठेवलेली) chocolates द्यायला, कधी मनं मोकळ्या गप्पा मारायला, नंतर लग्नासाठी कुणालातरी पसंत केला हे सांगायला, जातच राहिलो. एक जगावेगळ्या मैत्रीचे, आदरयुक्त प्रेमाचे नाते जडले होते. आम्हा मैत्रिणींंबरोबर त्या समुद्रावर यायच्या, गप्पा, भेळ-आईस्क्रिम, भाजका बुट्टा, खूप धम्माल यायची. चटकन सगळे डोळ्यांसमोर तरळले.

पुढे करियर, लग्नानवये सगळ्या मैत्रिणी विखुरलो. पण मी रत्नागिरीला गेले की न चुकता त्यांना भेटत होते. ते अगदी लग्नापर्यंत. मग परदेशात आल्यावर फोनवर बोलणं होत होतं. माझी pregnancy ची बातमी ऐकून माझ्या घरच्यांइतकाच त्यांनाही आनंद झालेला. मी बाळाला घेऊन भारतात आले हे त्यांना कळल्या पासून आम्ही भेटीचा मनसुबा आखत होतो पण काही ना काही कारणाने योग येत नव्हता. शेवटी देवाने तो योग जुळवून आणला. पुढच्या प्रत्यक्ष भेटीपर्यंत पुरेल एवढा आनंद मनात सामावून घेतला आम्ही दोघींनी. बाकी अप्रत्यक्ष भेटींची अनेक साधनं आहेतच – fb, email, picasa albums, वगैरे.

निघताना खूप आशीर्वाद देऊन, कौतुक करुन ‘त्या’ गेल्या. त्यांची ती माया पाहून सगळेच थबकले. काही ऋणानुबंधच असे असतात!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape





…गमते उदास!

16 11 2009

मागच्या रविवारचा सकाळ पपेर उघडला आणि headline वाचून धक्का बसला…सुनिताबाईंवर काळाने झडप घातली होती….माझी त्यांना भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिली या विचाराने मनं हळहळले.

पुलंशी माझी ओळख तशी फार उशिरा झाली…एका जवळच्या मित्राने वाढदिवसाला पुलंची एक cassette भेट दिली आणि पुलंशी माझी ओळख झाली…मग त्यांची die hard fan असलेल्या माझ्या जिवलग मैत्रिणीने ती वाढवण्यात हात भार लावला. जवळ-जवळ सगळी पुलंची पुस्तकं संचयी आली आणि ‘आहे मनोहर तरी…” पुस्तक घेतले, वाचले आणि सुनिताबाई यांची नवी ओळख झली…त्यांचे अनुभव वाचून भारावून गेले…स्वातंत्र संग्रामात देशासाठी लढलेली, स्पष्ट आणी जबरदस्त व्यक्तिमत्व, करारी, स्वत:च्या चुका न बिचाकता जगासमोर ठेवणरी, प्रत्येक गोष्ट निटंच करावी असा हट्टं असणारी, पुलं वर जिवापाड प्रेम करणारी त्यांची सखी – सहचारिणी, एक ना अनेक पैलू उलगडत गेले… आणि मी त्यांच्या व्यक्तिमत्वावर पूर्णपणे भाळले. त्यांच्या बद्दल खूप वाचले, पुलंच्या भावांच्या मुलखतींपासून ते अगदी पुलंच्या जयंती निमित्त येणार्‍या लेखांपर्यंत.

पुलं प्रेमींना त्यांचा स्पष्टपणा फारसा रुचला नाही म्हणून सुनिताबाई बिनमर्जीतल्या राहिल्या. मला त्या ‘आहे मनोहर तरी…’ मधून खर्‍या कळल्या. त्यांच्या लेखनाचा प्रभाव वाढत गेला आणि त्यांना भेटण्याची मनात सुप्त इच्छा तरळत राहीली.

गेले अनेक महिने आजारी असलेल्या सुनीताबाई अखेरच्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी ८ नोव्हेंबरला (पु लंच्या वाढदिवसाच्याच) दिवसाचीच वाट बघावी की यालाच विचित्र योगायोग म्हणायचे? तसाच अजून एक योगायोग की मी अनेक महिन्यांपूर्वी सुरु करुन ठेवलेला मराठी blog ची  सुरुवात या लेखाने करावी (?)
 
माझी त्यांना भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिली म्हणून सुनिताबाई आत्ता खरोखरंच “….गमते उदास!” 😦