सकाळी ‘ती’ हाॅस्पिटल मधे दाखल झाल्याचे समजले. गेले वर्षभर ‘ती’च्या हाॅस्पिटलच्या वाऱ्या वाढल्या होत्या. २-३ दिवसात बरं वाटले की ती घरी येईल या विचारात असतानाच तिची तब्येत बिकट झाली व एका दिवसात सगळे संपले.
काही सुचायला मार्गच उरला नाही…
“आता तुझ्या घरच्यांना, माझ्या काकू (जिला आम्ही ‘आई’ म्हणतो) शी बोलून घ्यायला सांग. तू ही बोल जमेल तसं. घरात तीच मोठी आहे. एकदम साधी आहे. काही टेन्शन घेऊ नकोस. आमची मम्मी गेल्यावर हिनेच एका परीने आम्हाला लहानाचे मोठे केले. आम्ही तिला मानतो.” नुकतीच प्राथमिक पसंती झाली होती आमची, तेव्हा तो मुलगा (आताचा माझा नवरा) मला म्हणाला होता. देवाच्या दयेने योग जुळून आला व त्या माझ्या ‘अहो आई’ (चुलत सासू) झाल्या. अवघा ६-७ वर्षांचा ऋणानुबंध, (दूर राहत असल्यामुळे) एकून ८-१० भेटी. पण पहिल्या काही भेटींमधेच त्या फार मायाळू असल्याचा प्रत्यय आला…येतच राहिला.
आम्ही आमचे लग्न इंटरनेटवर ठरविले पण प्रत्यक्ष भेटलो ते त्यांच्या समोर. पुढे मग लग्नाची तारिख ठरविणे, खरेदी, कोर्ट मॅरेज, खरं लग्न, ती घाई-गडबड, त्यांचा तो उरक, सिद्धीविनायक, देव दर्शन. माझ्या माहेरी आम्ही गेलो, माझ्या कुलदैवतेला. केवढे आवडले होते त्यांना माझं माहेरचं घर, रत्नागिरी, गणपतीपुळे, सिंधुदूर्ग, समुद्र, भगवतीचे देऊळ! “हा पट्टा बघायचा राहिला होता. तुझ्यामुळे बघून झाला…” पायरी चढताना माझा हात धरत त्या म्हणालेल्या मला आठवतंय.
मी इकडे येऊन लगेच गाडी चालवायला लागले त्याचे कौतूक, काही नविन पदार्थ केला की मला कधी करून घालतेयस? हा प्रश्न…फार हौशी. माझ्या डोहाळ-जेवणाला हिरवी साडी लागते म्हणून त्यांनी कोणाकरवी ती पाठवून दिली होती. लोकांना तसदी होईल म्हणून आम्ही सांगत होतो, पण त्यांच्या मनात आले की त्यांनी ते केलेच समजा. मानव सुलभ डावे-उजवे त्यांच्या ठायीही होते. पण त्यांच्या मायेचे पागडे इतकं वजनदार होतं की त्यापुढे सगळे हलकंच. ‘ती’ने सगळ्यांवर भरभरून वेडी माया केली. एका अनाथ जीवाला आपले केले. त्याला नावं, घर, कुटुंब तर दिलेच पण ममता दिली. नवऱ्या पश्चात कष्ट करुन त्याला एकटीने हिंमतीने वाढवले.
आमच्यातले कुणा ना कुणाची वर्षातून एकदा भारतात फेरी होतेच. त्यांना नुसती कुणकुण लागली तरी त्या कंबर कसून तयारीला लागायच्या. कुठे चकल्या, चिवडा, लाडू, पापड-कुरडया, कुठे हळद-मसाला. वयोमानानुसार सगळे जमायचेच असे नाही. मग मुलं रागवणार, बॅगेत जागाच नाही तुझ्या खाऊ साठी सांगणार आणि निमूटपणे तिने बनविलेले सगळे बॅगेतून इकडे येणार आणि मग आम्ही त्यावर ताव मारणार. हे गेली अनेक वर्ष मी बघत आले आहे. “मी जिवंत आहे तोपर्यंत मी बनवणारच.” हे त्यांचे बोलणे त्यांनी खरे करुन दाखविले.
प्रत्येक सणा-सुदीला काय-कसे करायचे हे त्या सांगायच्या. त्यातले सगळे करायला जमायचेच असे नाही. इकडे अमेरिकेत अमुक-तमुक गोष्ट मिळत नाही किंवा करता येत नाही हे कळल्यावर त्या आधी अमेरिकेच्या नावाने बोटं मोडायच्या व मग स्वतःच त्यातील पळवाटा सुचवायच्या. फार गंमत वाटायची. (अमेरिकेवर तसाही त्यांचा रोष होता. काय करणार? अमेरिकेने त्यांच्या लाडक्या मुलांना त्यांच्यापासून लांब केलं होतं.) कुळाचार करावा हा त्यांचा आग्रह होता पण हट्ट नव्हता. त्यांचे विचार सुधारित होते. म्हणूनच जाती बाहेर प्रेमविवाह करणाऱ्या आपल्या पुतण्याच्या मागे त्या ठामपणे उभ्या राहिल्या, तो ही दीराचा राग ओढवून व विरोध पत्करुन. त्यांच्यासाठी त्यांच्या मुलाचा आनंद इतर कुठल्याही गोष्टापेक्षा अधिक महत्वाचा होता.
त्या फार शिकलेल्या नव्हत्या पण वाचन पुष्कळ केले होते. खूप फिरल्या होत्या. यादोन्हीचे श्रेय त्या दिवंगत नवऱ्याला द्यायच्या. कधी प्रसंगी दोन कवितेच्या ओळीही सुचायच्या त्यांना…कुठे नात्यात लग्न, कार्य निघाले की त्या निघायला एका पायावर तयार. अगदी हल्लीच त्या ‘द्वारका’ बघून आल्या, मुला-नातवंडांसाठी आशिर्वाद मागून आल्या.
त्या कधी कुणाबद्दल वाईट बोलल्याचे मला स्मरत नाही. अलीकडे मात्र त्या बोलताना हळव्या व्हायच्या. जुन्या आठवणी सांगत बसायच्या. “तुला सांगते रुही,….” अशी सुरुवात करुन मनातला एखादा सल हळूच डोकं वर काढायचा.
ठेंगणी – बैठी मूर्ती, गहू वर्ण, पिकलेले केस, कपाळावर गोंदलेले बारिक कुंकू, सांधेदुखीमुळे थोडे अडखळत चालणे, नाशिक-धुळे कडील बोलायची लकब, प्रचंड उत्साह, फिरायची हौस आणि ऐकूनच जगण्याची हौस!
काॅफी, चाॅकलेट, आईस्क्रिम, आणि मसाला डोसा खास आवडीच्या गोष्टी. आत्ताही कुणी लहानगी आजीसाठी, (तिला लवकर बरं वाटावं म्हणून) कॅडबरी घेऊन आली होती. ती कॅडबरी तशीच पडलीए अजून फ्रिज मधे. त्या ती न खाताच निघून गेल्या…कायमच्या…कुणालाही कसलीही पूर्व-कल्पना न देता…त्यांचे त्यांनाही न उमजता!
या मकरसंक्रांतीला, उत्तरायणात शिरणारा सुर्य, आधीच्या पिढीचा, शेवटचा प्रतिनिधी असलेला एक तेजस्वी तारा घेऊन मावळला.
फोन केल्यावर, “हा बोल बेटा…” अशी मायाची हाक आता कायमची बंद झाली!
************
‘ती’ शृंखला –
‘ती’ – २६
‘ती’ – २५
‘ती’ – २४
‘ती’ – २३
‘ती’ – २२
‘ती’ – २१
‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
👍 .. I am going to read this on your behalf on 12th day
Really well written Ruhi. She was really a guiding light for all of us. People like her are very rare. May god bless her soul.
Vachun kharokarch tuze koutuk karav tevde thodech! English medium chi asun Marathi yevde sunder… Tu Aaincha sahavasat nasun sudhaa tichavarche prem vachun khup bare vatle…
Best of all articles!
Ruhi ..jabardasta👍👍👍tuza lekhan apratim. Mala abhiman vatato ki mi tuzi teacher aahe .khara tar Marathi mi tula kadhich shikavala nahi . pan manavatavadi drishtikon, sanvedanshilata yasarakhya janiva jagrut karayala mi kuthe tari nakkich beej perala asen …karan te mi ajunhi karate …hats off to u Ruhi. I am really really proud of u …sorry for sending opinion very late. Actually I couldn’t read it. Today as soon as I woke up, I read it .Thanks. keep on posting.
Tu chaan lihila aahes .. Majhya dolya samor na baghta tyanchi pratima ubhi rahili. Beautiful! Aai la fwd kela vachayla.
Ruhi.. khup chhan lihile ahes… te sagle diwas punha athavale…Sakali uthlyawar chaha ghetana tuza lekh vachane… ha khup chhan anubhav ahe.
Fakta lekh ha eka vait goshtiwar ahe, hyacha manatun tras zala…Kadhi na kadhi he ghadnar mahit asel tarihi tras hoto😢
रडवलंस ग रुही…
आजची ‘ ती ‘ मनःस्पर्शी 🙂
Khup khup chaan lihites Tu. Sagala chitra dolya samor ubha rahata…I mean I feel blogging/writing should come from heart, That’s how u write. I don’t write but I like reading such blogs that touches ur heart and make u think. Keep writing !!! Will love to read…