‘ती’ – २७

17 01 2017

सकाळी ‘ती’ हाॅस्पिटल मधे दाखल झाल्याचे समजले. गेले वर्षभर ‘ती’च्या हाॅस्पिटलच्या वाऱ्या वाढल्या होत्या. २-३ दिवसात बरं वाटले की ती घरी येईल या विचारात असतानाच तिची तब्येत बिकट झाली व एका दिवसात सगळे संपले.

काही सुचायला मार्गच उरला नाही…

“आता तुझ्या घरच्यांना, माझ्या काकू (जिला आम्ही ‘आई’ म्हणतो) शी बोलून घ्यायला सांग. तू ही बोल जमेल तसं. घरात तीच मोठी आहे. एकदम साधी आहे. काही टेन्शन घेऊ नकोस. आमची मम्मी गेल्यावर हिनेच एका परीने आम्हाला लहानाचे मोठे केले. आम्ही तिला मानतो.” नुकतीच प्राथमिक पसंती झाली होती आमची, तेव्हा तो मुलगा (आताचा माझा नवरा) मला म्हणाला होता. देवाच्या दयेने योग जुळून आला व त्या माझ्या ‘अहो आई’ (चुलत सासू) झाल्या. अवघा ६-७ वर्षांचा ऋणानुबंध, (दूर राहत असल्यामुळे) एकून ८-१० भेटी. पण पहिल्या काही भेटींमधेच त्या फार मायाळू असल्याचा प्रत्यय आला…येतच राहिला.

आम्ही आमचे लग्न इंटरनेटवर ठरविले पण प्रत्यक्ष भेटलो ते त्यांच्या समोर. पुढे मग लग्नाची तारिख ठरविणे, खरेदी, कोर्ट मॅरेज, खरं लग्न, ती घाई-गडबड, त्यांचा तो उरक, सिद्धीविनायक, देव दर्शन. माझ्या माहेरी आम्ही गेलो, माझ्या कुलदैवतेला. केवढे आवडले होते त्यांना माझं माहेरचं घर, रत्नागिरी, गणपतीपुळे, सिंधुदूर्ग, समुद्र, भगवतीचे देऊळ! “हा पट्टा बघायचा राहिला होता. तुझ्यामुळे बघून झाला…” पायरी चढताना माझा हात धरत त्या म्हणालेल्या मला आठवतंय.

मी इकडे येऊन लगेच गाडी चालवायला लागले त्याचे कौतूक, काही नविन पदार्थ केला की मला कधी करून घालतेयस? हा प्रश्न…फार हौशी. माझ्या डोहाळ-जेवणाला हिरवी साडी लागते म्हणून त्यांनी कोणाकरवी ती पाठवून दिली होती. लोकांना तसदी होईल म्हणून आम्ही सांगत होतो, पण त्यांच्या मनात आले की त्यांनी ते केलेच समजा. मानव सुलभ डावे-उजवे त्यांच्या ठायीही होते. पण त्यांच्या मायेचे पागडे इतकं वजनदार होतं की त्यापुढे सगळे हलकंच. ‘ती’ने सगळ्यांवर भरभरून वेडी माया केली. एका अनाथ जीवाला आपले केले. त्याला नावं, घर, कुटुंब तर दिलेच पण ममता दिली. नवऱ्या पश्चात कष्ट करुन त्याला एकटीने हिंमतीने वाढवले.

आमच्यातले कुणा ना कुणाची वर्षातून एकदा भारतात फेरी होतेच. त्यांना नुसती कुणकुण लागली तरी त्या कंबर कसून तयारीला लागायच्या. कुठे चकल्या, चिवडा, लाडू, पापड-कुरडया, कुठे हळद-मसाला. वयोमानानुसार सगळे जमायचेच असे नाही. मग मुलं रागवणार, बॅगेत जागाच नाही तुझ्या खाऊ साठी सांगणार आणि निमूटपणे तिने बनविलेले  सगळे बॅगेतून इकडे येणार आणि मग आम्ही त्यावर ताव मारणार. हे गेली अनेक वर्ष मी बघत आले आहे. “मी जिवंत आहे तोपर्यंत मी बनवणारच.” हे त्यांचे बोलणे त्यांनी खरे करुन दाखविले.

प्रत्येक सणा-सुदीला काय-कसे करायचे हे त्या सांगायच्या. त्यातले सगळे करायला जमायचेच असे नाही. इकडे अमेरिकेत अमुक-तमुक गोष्ट मिळत नाही किंवा करता येत नाही हे कळल्यावर त्या आधी अमेरिकेच्या नावाने बोटं मोडायच्या व मग स्वतःच त्यातील पळवाटा सुचवायच्या. फार गंमत वाटायची. (अमेरिकेवर तसाही त्यांचा रोष होता. काय करणार? अमेरिकेने त्यांच्या लाडक्या मुलांना त्यांच्यापासून लांब केलं होतं.) कुळाचार करावा हा त्यांचा आग्रह होता पण हट्ट नव्हता. त्यांचे विचार सुधारित होते. म्हणूनच जाती बाहेर प्रेमविवाह करणाऱ्या आपल्या पुतण्याच्या मागे त्या ठामपणे उभ्या राहिल्या, तो ही दीराचा राग ओढवून व विरोध पत्करुन. त्यांच्यासाठी त्यांच्या मुलाचा आनंद इतर कुठल्याही गोष्टापेक्षा अधिक महत्वाचा होता.

त्या फार शिकलेल्या नव्हत्या पण वाचन पुष्कळ केले होते. खूप फिरल्या होत्या. यादोन्हीचे श्रेय त्या दिवंगत नवऱ्याला द्यायच्या. कधी प्रसंगी दोन कवितेच्या ओळीही सुचायच्या त्यांना…कुठे नात्यात लग्न, कार्य निघाले की त्या निघायला एका पायावर तयार. अगदी हल्लीच त्या ‘द्वारका’ बघून आल्या, मुला-नातवंडांसाठी आशिर्वाद मागून आल्या.

त्या कधी कुणाबद्दल वाईट बोलल्याचे मला स्मरत नाही. अलीकडे मात्र त्या बोलताना हळव्या व्हायच्या. जुन्या आठवणी सांगत बसायच्या. “तुला सांगते रुही,….” अशी सुरुवात करुन मनातला एखादा सल हळूच डोकं वर काढायचा.

ठेंगणी – बैठी मूर्ती, गहू वर्ण, पिकलेले केस, कपाळावर गोंदलेले बारिक कुंकू, सांधेदुखीमुळे थोडे अडखळत चालणे, नाशिक-धुळे कडील बोलायची लकब, प्रचंड उत्साह, फिरायची हौस आणि ऐकूनच जगण्याची हौस!

काॅफी, चाॅकलेट, आईस्क्रिम, आणि मसाला डोसा खास आवडीच्या गोष्टी. आत्ताही कुणी लहानगी आजीसाठी, (तिला लवकर बरं वाटावं म्हणून) कॅडबरी घेऊन आली होती. ती कॅडबरी तशीच पडलीए अजून फ्रिज मधे. त्या ती न खाताच निघून गेल्या…कायमच्या…कुणालाही कसलीही पूर्व-कल्पना न देता…त्यांचे त्यांनाही न उमजता!

या मकरसंक्रांतीला, उत्तरायणात शिरणारा सुर्य, आधीच्या पिढीचा, शेवटचा प्रतिनिधी असलेला एक तेजस्वी तारा घेऊन मावळला.

फोन केल्यावर, “हा बोल बेटा…” अशी मायाची हाक आता कायमची बंद झाली!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – २६
‘ती’ – २५
‘ती’ – २४
‘ती’ – २३
‘ती’ – २२
‘ती’ – २१
‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape





‘ती’ – २३

28 10 2015

‘ती’ माझी दूरची नातेवाईक. उन्हाळ्यात ती कुटुंबासोबत अमेरिका फिरायला आली होती. आमचे निमंत्रण स्विकारुन ‘ती’ घरी आली. खरंतर ती आमची पहिली आणि (आता म्हणावं लागतंय) शेवटची भेट!

‘ती’ ला दोन मुली. मोठीचे वय १३/१४ असेल तर लहान ८/९ वर्षांची. ‘ती’ चांगल्या हुद्द्यावर नोकरीला होती. सावळी, बेताची उंची, मध्यम बांधा. दर दिवशी न चुकता योगासनं, सुर्यनमस्कार, खाण्या-पिण्यात पथ्य, ‘ती’ आम्हाला सुदृढ राहणे कसे जरुरीचे आहे हे सांगत होती. मस्त जेवण, (तिच्या आवडीची) वोडका, गप्पांबरोबर माहोल छान रंगला होता. दुसऱ्या दिवशी त्यांना नायगाराला निघायचे होते. भरपूर फिरुन, खरेदी करुन, मजेत सुट्टी घालवून ‘ती’ भारतात परतली.

मागच्या महिन्यात एका पहाटे फोन किणकिणला. ‘ती’ची तब्येत अचानक बिघडली, ‘ती’चे काही खरं नाही…ही बातमी! एकदम काही सुचेनासे झाले. मग कळले, दुपारी ‘ती’ गणपती कार्यक्रमात मुलीच्या नाच बघत असताना कोसळली व बेशुद्ध झाली. आधी घरचा डॉक्टर व मग हॉस्पिटलला नेले तोवर मेंदूत रक्तस्त्राव होऊन ‘ती’ची तब्येत गंभीर झाली होती. त्या दिवशी रात्री तिला कृत्रिम श्वासोश्वास देणाऱ्या यंत्रावर ठेवण्यात आले. डॉक्टरांनी ‘ती’ला ‘ब्रेन डेड’ अर्थात ‘मेंदू निकामी मृत’ घोषित केले. वैदकीय दृष्ट्या ‘ती’ गेलेली होती. पण तरी काहीतरी चमत्कार होईल आणि ती डोळे उघडेल म्हणून तिचे घरच्यांनी (खोटी) आशा बाळगून तिचा कृत्रिम श्वासोश्वास सुरु ठेवला होता. तिची केस सांगून भारतभरातील, परदेशात इतर कुठे, काही मदत मिळते का ते शोधण्यात आले पण सगळीकडून नकारच येत होता. फार भीषण परिस्तिथी झाली होती. कृत्रिम श्वासोश्वासामुळे ऊर धडधडत असतो आणि ते पाहून आपले माणूस जिवंत असल्यासारखे वाटते. आणि अशा वेळी मन सत्य स्विकारायला तयार होत नाही.

‘ती’ ला उच्च रक्तदाबाचा त्रास होता, ज्याकडे तिने कानाडोळा केला. शिवाय तिला रक्तवाहिन्यांचा एक विकार होता, ज्यात त्यांच्या भिंती नाजूक होतात. त्यामुळे अती रक्तप्रवाह झाल्यास त्या लगेच फुटतात किंवा वाहिन्यांना कोंब येतात. ‘aneurysm’ असे नाव आहे त्या दोषाचे. हे ती गेल्यानंतर कळले. परंतू हा विकार अनुवंषिक असू शकतो व तिच्या नातेवाईकांची ही चाचणी करावी लागली.

मेंदूतील रक्तस्त्राव इतका झाला की मेंदू व कवटी यातील पूर्ण जागा रक्ताच्या गुठळ्यांनी भरली. ‘ती’चे वाचणे अशक्य झाले. सगळे शरिर नियंत्रित करणारा मेंदूच निकामी झाला. वैदकीय भाषेत याला ‘ब्रेन डेड’ म्हणतात. आणि कानूनी भाषेतही ‘ब्रेन डेड’ म्हणजे ‘डेड’! यापुढे तिला किती काळ कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवायचे हे हॉस्पिटलने घरच्यांवर सोपविले. ७-८ दिवसात ‘ती’ गेल्याचे कळले.

जो पर्यंत आपल्या माहितीतल्यांशी एखादी गोष्ट होत नाही तोवर आपल्याला त्याचे गांभीर्य कळत नाही. ‘ती’ गेली! आमच्या घरी आम्हा जमलेल्यांनी ती सांगत होती,”मीच तुमच्यात वयाने सगळ्यांत मोठ्ठी आहे पण मीच सर्वांच्यात फिट आहे!”. काटेकोर पथ्य, व्यायाम करणाऱ्या ‘ती’चे शब्द आठवले. तिच्या मुलींसाठी जास्त हळहळायला होते. जाताना ‘ती’, तिच्या मुलींच्या चेहऱ्यावरची ‘हसी-खुशी’ घेऊन गेली…!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – २२
‘ती’ – २१
‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape





‘ती’ – ११

2 09 2015

अकाळी वडिल गेले. त्यांचे कार्य उरकून मी परत नोकरीवर रूजू झाले. मन हळवे झाले होते. आठवणींनी टचकण डोळ्यांत पाणी येई. मी परत आले कळल्यावर माझी मॅनेजर माझ्या डेस्कपाशी थांबली. मला गहिवरून आले. ती सांतवन करत म्हणाली,”वाईट झालं. पण तुला तुझे वडिल इतकी वर्ष लाभले तरी, मी अगदी लहान असताना माझे वडिल गेले. त्यांचा चेहराही मला आठवत नाही!”

एवढेच बोलून ती निघून गेली. माझं दु:ख उगाच हलकं झाल्यासारखं वाटायला लागलं आणि तिचंच सांतवन करावंसं वाटायला लागलं.

‘ती’ चायनीज होती. शिकायला पुण्यात आली व तिथेच नोकरीला लागली. तिच्याशी फक्त कामापुरतेच बोलणं होत असे. बरेच वर्ष पुण्यात काढल्यामुळे बोलता येत नसलेतरी तिला मराठी कळते असे काहीजण म्हणायचे.

त्या कठिण समयी तिने माझ्या दु:खावर जी फुंकर व मनावर जो चटका दिला, त्यामुळे आपल्याहूनही कमनशिबी लोकं आहेत याची जाणीव झाली. त्यासाठी ‘ती’ चे आभार मानायचे मात्र राहूनच गेले.

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape





एक मोऽऽऽठ्ठ्ठा माणूस!

17 10 2012
“एकीकडे सगळं जगं आहे, आणि दुसरीकडे ‘मी’…तर सांग बघू तू कोणाकडे जाशील?” हा त्यांचा मला नित्याचा प्रश्न! मस्करीत माझे उत्तर “जगाकडे…” हे एकून त्यांच्या चेहर्‍यावर मिष्किलवजा खट्टू आविर्भाव आणि माझ्या चेहर्‍यावर ‘विजयी’ मुद्रा. असे हे अगदी ते जाईपर्यंत सुरु होते…
ते एकुलते एक. लहानपणीच त्यांची आई गेली. वडिलांनीच (आबांनी) यांना वाढविले. म्हणूनच असेल कदाचित त्यांच्यात एक विलक्षण लाघवी ‘मूलपण’ होते.

काही कारण्यास्त्व एकत्र कुटुंब सांभाळायची जबाबदारी पेलावी लागणार्‍या आबांना स्वत:च्या मुलाची कुवत असूनही मेडिकलला पाठवता आले नाही. तरीही त्याला चांगले संस्कार आणि शिक्षण देण्यात ते कुठेच कमी पडले नाही. ती अपुरी इच्छा आपल्या मुलीला डॉक्टर करुन पुर्ण केली. अनेक लोकांनी नाके मुरडली की मुलीला एवढे शिकवून काय फायदा, ती तर लग्न होऊन सासरी जाणार. पण त्यांना आपल्या लेकीची कुवत ठाऊक होती, किंबहुना विश्वासवजा खात्रीच होती. आम्ही दोघी बहिणी त्यांच्या खूप लाडक्या! आम्हा भावंडांचेच नाही तर आमच्या सगळ्या गोतवळ्यात ‘चिल्लर पार्टी’ चे ते खूप लाड करत. म्हणून ते ही मुलांचे लाडके होते. माझी मामे-भावंडे त्यांना ‘चिऊ-पप्पा’ म्हणत. माझे घरातले नाव ‘चिऊ’ आणि माझे पप्पा त्यांना स्वत:च्या पप्पांसारखे प्रिय, म्हणून त्यांचे ‘चिऊ-पप्पा’. आमच्याशी ते आमच्या वयाचे होऊन खेळत.

माझ्या बहिणीवर त्यांचा विशेष जीव होता. तिच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी हे नेमके देवासारखे तिच्यासमोर तिच्यासाठी हजर होत. हा प्रत्यत तिला नेहमी येत असे. ती telepathy होती की काय ते देव जाणो… आता वाटते ते फक्त त्यांचे त्यांच्या लेकीसाठीचे प्रेम होते!

माझ्या जन्माच्या वेळची एक गोष्ट आहे. एका मुली नंतर तुम्हाला मुलगा होईल असे वाटले होते. मी झाले आणि तुम्ही थोडे नाखुष झालात. पण मला हातात घेतलेत आणि तुमची नाराजी कुठंच्या कुठे पळून गेली. तुमच्याच भाषेत सांगायचे तर “हा मोठ्ठा कापसाचा गोळा होतीस तू, चेहरा अगदी आईसारखा, वाटले माझी आईच आलीए!” मी शाळेत काही केल्या जात नव्हते म्हणून महिनाभर ते माझ्याबरोबर शाळेत येऊन बसत होते. मला ते शाळेतले दिवस, तो ‘रंजन’ हॉलमधे कोपर्‍यात भरणारा L.K.G. चा क्लास अजून आठवतो.

माझी फोटोग्राफीची आवड अनुवंशीक आहे. त्यांनाही फोटोग्राफीचे वेड होते. त्यांच्या बॉक्स-कॅमेर्‍याने ते भरपूर फोटो काढायचे. रोल मात्र मुंबईहून डेवलप करुन आणायचे. मी कॅमेरा हातात घेतला तो ते गेल्या नंतर. आपला एखादा तरी फोटो त्यांनी पाहायला हवा होता असे वाटत रहाते. शाबासकी देणारे ते हात मात्र आज नाहीत.

विज्ञानाची प्रचंड आवड, रसायनशास्त्रात हातखंड. घरीच कपड्यांसाठीची निळं, अगरबत्ती, वेगवेगळी अत्तरं बनविणे, मिक्सर – washing machine – radio दुरुस्त करणे. आमचा आवज, गाणी टेप करुन ठेवणे हा त्यांचा छंद. त्यावेळी गंमत म्हणून केलेल्या गोष्टी आता अनमोल ठेवा होऊन बसल्या आहेत.

अवघ्या तिशीत त्यांनी चाकोरीबद्ध आयुष्याविरुद्ध बंड पुकारुन स्वत:चा व्यवसाय सुरु केला आणि स्वत:च्या हिमतीवर केमिकल फॅक्टरी काढली. व्यवसाय म्हटले की उतार-चढाव आलेच. त्यांनी खूप कष्ट केले. आम्हाला काही मागायच्या आधीच वस्तू मिळालेली असायची. त्यात विविध पुस्तके, निबंधमाला, dictionary, drawing books, colors आणि त्याच बरोबर Basket Ball, Tennis racket, Badminton racket, Chess etc board games, खेळाची पुस्तके हे देखील असायचे. धंद्यामुळे त्यांच्या जेवायच्या वेळाही ठरलेल्या नसायच्या. आम्हालाही फार वेळ देता यायचा नाही. आम्ही मुले मोठी झाल्यावर त्यांना विचारत असू – “तुम्ही इतरांच्या बाबांसारखी नोकरी का नाही केली?” त्यावर ते म्हणत “मी मोऽऽऽठ्ठ्ठा माणूस आहे आणि मोऽऽऽठ्ठ्ठी माणसे स्वत:चा व्यवसाय करतात”. त्याचा आताकुठे थोडा अर्थ कळायला लागलाय. आणि तेव्हा आपण किती क्षुद्र विचार करत होतो हे आज जाणवतेय.

तल्लख बुध्दी, सुधारलेली विचारसरणी, खेळकर व शांत स्वभाव, सदैव हसतमुख असा चेहरा, कोणत्याही प्रतिकुल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता, हळूवार पण सखोल विचार लाभलेली वाणी, जगमित्र असे ते एक प्रसन्न व्यक्तिमत्व! अशा पित्रू-छायेत वाढल्याचे भाग्य लाभले हे आमचे नशिबच. तुमचा खरंच खूप अभिमान वाटतो. तुम्ही जे संस्कार दिलेत त्यातील अर्धे जरी आम्हाला पुढेच्या पिढीला देता आले तरी जीवन सार्थक झाले असे समजू!

तुम्ही अचानक आमच्यातून निघून गेलात आणि बरेच काही अर्धवट राहिले. तुम्हाला जाऊन आज ७ वर्ष झाली तरी अजुन तुमचा भास होतो, तुमची प्रेमळ हाक एकू येते आणि खरचं सगळं घडले का? असा प्रश्न पडतो…

कुठेतरी मोरपंखी निळ्या रंगाचे कापड दिसते (जो तुम्ही तुमच्या कारखान्यात बनवायचात), अगरबत्तीचा सुगंध दरवळतो (तुम्हाला अगरबत्ती बनविण्याचे कौशल्य आत्मसात होते), कोण्याच्यातरी तोंडून “ए-वन!” अशी कशालातरी दाद जाते (जे तुमचे पेटंट होते) आणि जीव तुमच्या आठवणीने अगदी गलबलून जातो. सगळीकडे तुमचे अस्तित्व आहे असे जाणवत रहाते.

आणि हो पप्पा – तुमच्या प्रश्नाचे खरं उत्तर द्यायला खूप उशीर झालाय पण तरीही मला खात्री आहे तुम्हाला माहित होते की “एकीकडे सगळं जगं असेल, आणि दुसरीकडे तुम्ही असाल तर मी तुमच्याचकडे येईन!!!” Pops, I miss you so much…always…!

Page copy protected against web site content infringement by Copyscape


हे वाचेले का? –
पापा केहते थे…!




‘ती’ – ४

13 01 2012

‘ती’ माझ्या आयुष्यात असुन नसल्यासारखी…माझी तिची एकच भेट.. ती देखील ओझरती…मी शाळेतुन घरी जात होते आणि तेवढ्यात ती मला माझ्या आत्येभावाबरोबर दिसली. दादा बोलायला थांबला, अगदी २ मिनिटे. तिच्या चहर्‍यावर फक्त स्मितहास्य! ६वीत होते मी…

‘ती’ त्याची प्रेयसी! थोड्याच महिन्यात कळले की त्यांनी लग्न ठरवले आहे. BSc. नंतर दादा पुण्याला computer course करत होता. सुट्टीत तो घरी आला की आवर्जुन आमच्याकडे चक्कर मारत असे. माझे वडिल त्याचे लडके मामा. माझ्या वडिलांचे देखील या भाच्यावर विशेष प्रेम. माझे आणि माझ्या बहिणीचे तो खूप लाड करत असे. कुठे चॉकलेट, कुठे कंपास बॉक्स् तर कुठे अजुन काहीतरी. गप्पा होत तेव्हा मधेच कधीतरी तिचा उल्लेख होत असे.

दर भाऊबीजेला तो ओवाळणीसाठी येत असे. ते तिघे भाऊ. सख्खी बहिण नाही. त्या भाऊबीजेला तो पुण्यातच होता. २ दिवसांनंतर तो रत्नागिरीत आला. सकाळीच घरी आला आणि म्हणाला “आज करु आपली भाऊबीज, ओवाळा मला…”. माझी आणि माझ्या बहिणीची आंघोळ पण झाली नव्हती. पटकण आवरुन आम्ही त्याला ओवाळले. तो पर्यंत आईने त्यांना खायला दिले. त्याच्याबरोबर त्याचा मित्र होता. तो मित्र माझ्या वडिलांची कंपनी बघायला दादा बरोबर आला होता. घरुन ते दोघे कंपनीत जाणार होते. “तुम्ही मागून या.” असे सांगून वडिल पुढे कामावर निघाले. गप्पा गोष्टी करुन हे दोघे पण कंपनीला जायला निघाले. आणि वाटेत त्यांच्या मोटरसायकलचा अपघात झाला. दारु पिऊन ट्रक चालवणार्‍या वाहनचालकाचा ताबा सुटला आणि त्यांनी यांना जोरदार धडक दिली. माझा दादा त्याक्षणी गेला. त्याचा मित्र हॉस्पिटल मधे गेला. झाले त्यावर विश्वास बसेना. बरं, आमच्याकडे येऊन गेला ही सगळ्यात मोठ्ठी खंत. तो प्रसंगच महाभयानक होता. आत्या आणि काकांवर तर आभाळच कोसळले होते. शेजारी-शेजारी राहणारे दोन सख्खे मित्र एकत्र गेले. फार भयाण परिस्थिती होती ती. पोस्ट-मॉर्टम नंतर नातेवाईक मुंबईहून येइपर्यंत त्यांचे मृतदेह बर्फात ठेवले होते.

तिच्या घरी ही वाईट बातमी कळविण्यात आली. तिचा विश्वासच बसेना. तिने हॉस्पिटल मधे धाव घेतली. स्वत:च्या डोळ्यांनी बघून खात्री करायला. तिच्या दु:खाची कल्पना पण करवेना तेव्हाही आणि आत्ताही… तेव्हा तिला भेटण्याची खूप इच्छा झाली होती पण वय लहान होते. तो गेला ती एक भयाण पोकळी करुन – तिच्या, आमच्या सगळ्यांच्यातच! किती स्वप्नं रंगवली असतील तिने, लग्नाची, भावी सुखाची, सहजीवनाची… सगळी एका क्षणात मातीमोल झाली.

तो गेला तरी ती माझ्या आत्याकडे येत राहिली… आधार देत राहिली… आधार घेत राहिली. पुढे तिने शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षिकेची हंगामी नोकरी धरली. आत्या कडून तिची खबर-बात कळत असे. थोडे महिने नोकरी, थोडे महिने घरी असे तिचे सुरु होते. शाळेतल्या राजकारणाला ती बळी पडत होती. त्याने ती त्रस्त झाली होती. शेवटी तिने ती नोकरी सोडली.

काही वर्ष गेली तसे घरचे लग्नासाठी मागे लागले. ती काही ना काही सांगून टाळत होती. तो गेला तरी त्याच्या मधून ती बाहेर पडली नव्हती. नोकरी मिळेना, घरचे लग्नासठी खूप मागे लागत होते. शेवटी एके दिवशी तिने गळफास लावून आत्महत्या केली. हृदयाचा थरकाप करणारी ती बातमी होती. त्याच्याशिवाय जगण्यापेक्षा तिने मरण स्विकारले. कित्ती भयानक शोकांतिका होती ही…एखाद्या कादंबरीत वाचावी तशी!

कित्ती मानसिक त्रासातून ती गेली असेल…कित्ती डिप्रेशन?…तिला मदत हवी होती का कुणाची?….इतके हतबल कुणी का होते? असे अनेक प्रश्न मनात साचले… ज्यांची उत्तरं मिळणे केवळ अशक्य!

ती माझ्या आयुष्यातून कायमची गेली… तिला भेटायची ईच्छा अपुरी राहिली…तिच्या आयुष्यासारखी…

*************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape





‘ती’ – २

23 11 2011

तिच्या विषयी लिहायला घेतलं खरं पण नक्की कुठून सुरुवात करु आणि काय काय लिहू असे झाले क्षणार्धात…’ती’ माझ्या आयुष्यातले सगळ्यात प्रभावी व्यक्तिमत्व!
 
तिचे माहेर सिंधुदुर्गातले छोटेसे खेडे ‘पोईप’ आणि तिला दिले देवगडच्या ‘हिंदळे’ गावात. लग्नानंतर ती मुंबईत आली असावी. मुंबईच्या चाळींमधे जसे अनेकांनी संसार केले तसा हिने सुद्धा. ती तिथेच थांबली नाही. चेंबुरच्या हाऊसिंग बोर्डच्या बिल्डींग मधे स्वत:ची हक्काची जागा घेण्यापर्यंत तिने मजल मारली. ‘ती’च्या घराची दारं सगळ्यांच्या स्वागतासाठी नेहमी उघडी होती.

ती अतिशय जिद्धी, खंबीर, मनाने हळवी, हौशी, प्रेमळ, सुधारीत विचारसरणीची, विशाल ह्रुदयी आणि त्या सगळ्या गुणांना पूर्णत्व देणारा एक असामान्य गुण, तो म्हणजे – दानशूरपणा.

नवर्‍याची जेमतेम पगाराची मिलमधली नोकरी. त्यात त्यांची नोकरीची धरसोड सुरु असायची. मग हिने देखील काही ना काही करुन संसाराला हात भार लावला. दूधाचे सेंटर अनेक वर्ष चालविले. पहाटे लवकर उठून दूधाच्य गाड्या आल्या की दूध उतरवून घेणे, दूध पोचविणार्‍या मुलांकडे त्यांच्या लाईनच्या पिशव्या तयार करुन देणे. सगळा हिशोब बघणे. जातीने लक्ष घालून ती काम करत असे. कायम कष्ट करण्यात आयुष्य गेलं तिचे.

स्वत:च्या मुला-बाळांबरोबर तिने अनेकांना आपलेसे केले, अनेक होतकरु नातेवाईकांना आधर दिला. ते दिवस माणुसकीला महत्व देणारे. हिच्या अनेक ओलखी-पाळखी. कित्येक जणांना हिच्या शब्दाखातर नोकरी मिळाली असेल. परत याबद्दल कोणाकडेही वाच्यताही नाही. कोणालाही कसलीही मदत करायला ही सगळ्यांच्या पुढे. ज्याला जे हवे ते देणे, आपल्याला जमेल ती मदत करणे हा नियम होता. तिचा धडपडा स्वभाव ती जाईपर्यंत तिच्यात होता. कधी लोक गैरफायदाही घेत, पैशाला फसवत. पण हिने त्यांना माफ केले आणि आपले चांगले वागणे सोडले नाही. सगळ्यांच्या सुख-दु:खात ती धावून गेली.  मुलंही तशीच हिच्या वळणावर गेली.
 
दिसायला गोरीपान, अतिशय देखणी, उंच, मध्यम बांधा, पाचवरी साडी, केसांचा छानसा आंबाडा, मोठे कुंकु, वयोमननुसार लागलेला भिंगचा चष्मा. शंकर हे तिचे आराध्य दैवत. त्याच्यावर तिची निस्सीम श्रद्धा. पण त्याच्या कुठेही बाऊ नाही की उगाच थोटांड नाही. खोटेपणा, दिखाऊपणा तिच्या रक्तातच नव्हता. तिच्या वागण्यात एक भावणारा मनस्वीपणा होता. फिरायची भयंकर आवड. १२ ज्योतिर्लिंग आणि बराच भारत फिरुन झाला होता. हाताला चव अशी की नुसती आमटी केली तरी खाणारा बोटं चोखत बसेल. तांदळ्याच्या शेवया-नारळाचा रस, सातकाप्याचे घावनं, इत्यादी पदार्थांमधे तिचा हातखंड होता. कालागणिक हे पदार्थसुद्धा नामशेष झाले.

प्रेमळ स्वभावाला सीमा नाही – इतका की जावयाला मुलगा करुन घेतले आणि सुनांवर मुली सारखीच माया. सगळ्यांचे खूप लाड होत. मुलगी-जावई-नात चिंचवडला होते. त्यांची आठवण आली की त्यांच्यासाठी खाऊ, मासे (मुंबईत ताजे मिळतात ना…) घेऊन ही पहाटेच मुंबईहून पुण्याला निघायची. बस नाही मिळाली तर मिळेल त्या वहानाने ही चिंचवड गाठायची. अतिश्योक्ती वाटेल पण हे खरं आहे – अनेक वेळा तिने ट्रक-टेंपो मधून देखील लिफ्ट घेतली आहे. एकदम निडर आणि तितकीच घरंदाज. तिच्या बद्दल त्या ट्रक-टेंपोवाल्यांनाही आदर वाटला असणार यात काही शंका नाही.

माझ्यावर तिचा अतिशय जीव. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला ती मुंबईहून न चुकता रत्नागिरीला यायची. सोबत रात्रभर जागून, एस.टीच्या गराड्यातून मांडीवर सांभाळत आणलेला Monginis चा केक असायचा. आजही ते आठवले की तिच्या आठवणींनी गहिवरुन येते.

मे महिन्याच्या सुट्टीत तिच्याकडे चेंबुरला जाऊन राहाणे म्हणजे एक परवणीच! मी, माझी मोठी बहिण आणि माझा मामे भाऊ… आमच्या तिघांचे अतिशय लाड केले तिने. खेळ, पुस्तके, कपडे, खाऊ, त्यावेळी भाड्याने (तासावर) सायकल, रेखाच्या दुकानातला दूधाचा पेप्सीकोल व क्रीम वेफर्स (पिकविक), चेंबुर स्टेशन जवळची भेलपुरी, सरोजची स्वीट कचोरी, ‘यांकी डूडल’चे आईस्क्रीम, मोंजिनिजचा केक, घसितारामची मिठाई, असे एक न अनेक हट्ट तिने पुरवले. मला अजूनही आठवतेय मी आणि माझा मामे भाऊ तासावर भाड्याने सायकल आणायचो. बिल्डिंगच्या ग्राऊंडवर आम्ही सायकल चालवायचो. नेमकी त्याच वेळी शेजारची (आमच्याच वयाची) ‘चारु’ आमच्या त्या सायकलसाठी हट्ट करुन रडायची. आम्हाला प्रेमळ विनवणी व्हायची “द्या रे बाळांनो तिला थोडा वेळ सायकल” आणि ‘ती’ च्यासाठी चारुला सायकल द्यायचो. त्या चारुचा भयंकर राग यायचा. आत्ता हसू येते. मी दुसरीत असल्यापासून तिला इंग्लिशमधे पत्र लिहायचे. त्याचे तिला कोण कौतुक! माझी मामी तिला ती पत्र वाचून दाखवायची. वर्षभराची अशी ही माझी पोस्ट कार्ड ती  जमवून ठेवायची. त्या दिवसांची आज आठवण आली की खरंच वाटते “लहानपण देगा देवा..”

तब्येतीची कुठलीही पथ्य तिने कधीच पाळली नाहीत. २ महिने आरामासाठी लेकीकडे गेली. त्याच दरम्याने तिचा मेहुणा (बहिणीचा नवरा) वारला. मुंबईत परतली आणि ही बातमी कळताच बहिणीसाठी जीव कळवळला. लगोलाग तिला भेटायला घेऊन जा असे मधल्या मुलाला म्हणाली. मुलुंडला बहिणीच्या बिल्डिंग खाली आली. बहिणीचे कसे सांतवन करु या विचाराने भावना अनावर झाल्या आणि त्यातच ह्रुदयविकाराच तीव्र झटका आला. पहिल्या पायरीवर मुलाच्या हातात प्राण गेला. वय ६३. कोणालाच विश्वास बसण्या पलिकडची घटणा. ती गेली ती तारीख २२ नोव्हेंबर. काल तिला जाऊन १८ वर्ष झाली. शेवटी काय ‘जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला’ हेच खरं.

ती गेली तो मनाला चटका लावून. ती एक आदर्श स्त्री होती -चांगली मुलगी, बहिण, पत्नी, आई, वहिनी, जाऊ, सासू, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक उत्कृष्ट आजी होती. होय… ती माझ्या आईची आई… माझी ‘आजी’! माझ्या वडिलांची आई ते लहान असतानाच गेली. त्यामुळे त्याची भरपाई म्हणून असेल कदाचित की देवाने दोन आजींची एकत्र मिळून ही अशी ‘एक’ आजी दिली. आम्ही खूप मोठे व्हावे ही तिची ईच्छा. तिने केले संस्कार नकळत आमच्यात रुजले. म्हणून की काय कोण जाणे तिच्याच सारखी माझीही (बर्‍याच उशीरा) पण नकळत शंकरावर श्रद्धा जडली. माझी बहिण डॉक्टर व्हावी हे तिचे स्वप्न. तिला क्रिकेट मधे अतिशय रुची. त्या काळी तिला हा खेळ समजत होता, टि.व्ही वर सामने बघण्यात ती मग्न होत असे. तिचीच सुप्त इच्छा असावी म्हणून माझा मामे-भाऊ क्रिकेटर (fast bowler) आहे. त्याचे क्रिकेटचे वेड अनुवंशिक आहे. सल एवढीच की हे सगळे बघायला ती आमच्यात नाहीए.  

ती गेली त्यानंतर कार्यासाठी तिचा फोटो लागणार होता. तिचा एकटीचा असा एकही स्वतंत्र फोटो मिळेना. माझ्या आजोबांचे स्नेही चित्रकार होते आणि ही वहिनी लाडकी होती. त्यांनी तिचे तरुणपणीचे इतके सुंदर portrait रेखाटले की बघत बसावे. त्यांच्या त्या म्हातार्‍या बोटांतून देखील तिच्या खातर एक सुंदर कलाकृती कॅन्वासवर अवतरली. ते आजीचे पेंटिंग आजही माझ्या मामाकडे फ्रेम करुन लावले आहे.
 
आजूनही आमच्या घरात-नात्यात-ओळखीत तिचा विषय निघाला, तिची आठवण काढली की लहान-थोर सगळेच हळवे होतात. तिच्यात ती जादू होती…!

*************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

 

Page copy protected against web site content infringement by Copyscape





पापा केहते थे…!

20 03 2010

Finally, मी माझ्या पप्पांची एक इच्छा पूर्ण केली…Masters degree संपादन करण्याची… इतक्या वर्षांच्या प्रयत्नांना यश आले. 🙂

१५ मार्च ला IGNOU ची 21st Convocation ceremony होती  (पदवी वितरण किंवा हिंदी – दिक्षांत  कार्यक्रम). इग्नू चे हे Silver Jubilee Year असल्यामुळे जरा जास्त बोल-बाला होता.

माझे नाव Register list मध्ये आहे का ते confirm करुन मी auditorium मध्ये आत येऊन खुर्चीवर बसले आणि गेल्या अनेक वर्षांची चित्रं डोळ्यांसमोर तरळून मला अलगद भूतकाळात घेऊन गेली. १ सप्टेंबर १९९९ मध्ये मी पुण्यात आले ती हातात फक्त Diploma घेऊन.  पुढे काहीतरी Computers चे शिकायचे, ते ही  नोकरी करत-करत हे मनात  पक्के होते. आम्ही सगळ्यात आधी इग्नू च्या BCA ची चौकशी केली. Admission procedure ला बराच अवकाश होता तरीही आम्ही BCA 1st sem चा DD भरुन टाकला.

डिप्लोमा च्या through-out distinction ची नशा होती पण त्या बरोबरच माहित होते की नुसत्या त्या syllabus वर नोकरी मिळणे काही तितके सोपं  नाही. Java, E-commerce, Web Programming, Javascript, ASP, NT Server सारख्या शब्दांनी सगळे व्यापून टाकले होते. पप्पांबरोबर अनेक institutes मध्ये जाऊन चौकशी केली आणि शेवटी एका कोर्सला admission घेण्याचे ठरवत होतो… पण माझा पाय मागे येत होता तो त्याच्या फी मुळे. ६०,०००/- फी होती, ती ही फक्त ८ महिन्यांसाठी…जवळ-जवळ २ वर्षांच्या BE च्या एवढी फी होती ती. घरच्या परिस्थिती ची कल्पना मला होती आणि म्हणून मी कच खात होते. आपटे रोडवरच्या Asset International च्या building खाली येऊन पप्पांनी मला थेट प्रश्न केला “तुला syllabus झेपेल ना?” माझा होकार एकून ते पुढे म्हणाले “फी चे काय आणि कसे करायचे ते मी बघेन..त्याची तू चिंता करु नकोस”. Admission घ्यायला गेल्यावर Placement cell वाल्या बाईंनी नविन टोला दिला “तुझा फक्त डिप्लोमा आहे बाकीचे सगळे batchmates BE + MBA किंवा किमान BE आहेत म्हणून आम्ही placements ची काहीच guarantee देऊ शकत नाही. इतरांना १० interview calls आले तरी तुला कदाचित एक-दोन येतील किंवा एकही येणार नाही”. पुन्हा tension आले…काय करावे बरं? शेवटी मनं पक्क केलं की खूप मेहनत करायची आणि स्वत:ला prove करायचं. त्या वेळेस बेताची आर्थिक परिस्थिती असताना पप्पांनी टाकलेला विश्वास माझी शक्ति बनून अंगात भिनत होता. अशा प्रकारे एकदाची E-commerce course ला admission घेतली.

आयुष्यात पहिल्यांदा घर आणि मुळात मम्मी पासून लांब आले होते. जेवणाचे हाल होत होते. PG म्हणून राहिले त्या निमकर आजी जरा विचित्र होत्या. त्यांच्या वन-रुम-किचन मध्येही त्यांना PG मुलगी ठेवायची हौस. त्यांच्या दिवसभर टि.वी. बघण्याचा मला अभ्यास करताना त्रास होत होता. खूप कमी वेळेत खूप काही शिकायचे होते…syllabus vast होता…Modules demanding होती…Exam pattern tough होता. सकाळी ६:४५ ला बस पकडून डेक्कनला पोहचायचे. ‘तुलसी’ मध्ये कधी फक्त चहा घ्यायचा, (पैसे असतील तर…) चहा-पोहे किंवा चहा-खारीचा क्रिम रोल खायचा. ७:०० ला course सुरु होयचा..दुपरी २:०० च्या सुमारास परत येऊन मेसचा डब्बा आणून तो जेवायचा. ते बेचव जेवण जेवताना मम्मीच्या जेवणाची आठवण येऊन डोळे भरुन यायचे. एकटेपणाचा वीट यायचा… तोपर्यंत कोणी फार मित्र-मैत्रिणीही झाले नव्हते. आमच्या बॅच मध्ये मी, अभिजित आणि लेले सोडल्यास सगळेच अमराठी public होते.

एका महिन्यानंतर मी आणि प्रज्ञा एकत्र राहायला लागलो आणि त्याच्या पुढच्या महिन्यात आम्ही  ‘एमी जोशी’ यांच्याकडे शिफ्ट झालो. १३१८, शुक्रवार पेठ हा पत्ता नंतरची ३-३.५ वर्ष आमच्या नावाला चिकटला (की आम्ही त्या पत्त्याला चिकटलो(?) ) 🙂

बघता बघता महिने उलटत गेले, course संपायची वेळ आली..आता चांगला मित्र परिवार झाला होता…प्रत्येक exam मध्ये चांगले scoring येत होते… हुरुप वाढत होता…. आणि अप्रिल च्या सुरुवतीला एका नोकरीसाठी अर्ज केला, interview झाला आणि नोकरी मिळाली. आम्ही Dishnet च्या projects वर काम करणार होतो, पुलगेटच्या chya ETH office मध्ये आमची team बसायची. ४ अप्रिल २००० ला joining होते. मे महिन्यामध्ये course संपेपर्यंत ७:०० ते २:०० course आणि ३:००-७:०० part-time नोकरी. आमच्या बॅच मध्ये पहिली नोकरी मला मिळाली होती. घेतलेल्या श्रमांचं चीज होत होतं.

हातात नोकरी आल्यावर मनात आले आत्ता कशाला इग्नू चे graduation हवंय म्हणून इग्नू च्या Regional centre ला जाऊन भरलेला DD परत घेऊन आले. पप्पंना कळल्यावर त्यांनी समजावले (हो, ते कधीच ओरडत नसत…त्यांना ओरडताच आले नाही कधी आम्हा तिघांवर) की Graduation important आहे आणि नोकरी असलीतरी basic qualification फक्त ‘Diploma’ हे बरोबर नाही. मी गुप-चुप पुन्हा इग्नू मध्ये जाऊन DD देऊन आले. 😦

सोमवार-शनिवार  (हाफ डे) ऑफिस आणि शनिवार दुपार-रविवार वी. आय. टी. कॉलेज अशी दुहेरी कसरत सुरु झाली. त्यातच आमचे पुलगेटचे ऑफिस अभिमानश्री सोसायटी, पाषाणला शिफ्ट झाले आणि शुक्रवार पेठ ते अभिमानश्री असे दर दिवशी पुणे दर्शन करावे लागत होते, ते ही माझ्या सन्नीवर. शनिवार hectic होता. हाफ-डे ऑफिस आणि दुपारी अप्पर इंदिरा नगर ला कॉलेज. सगळे मॅनेज करत गेले कारण पर्याय नव्हता. ऑफिसमध्ये मीच सगळ्यात वयाने लहान होते. सगळे ५-६ वर्षांनी मोठे होते. colleagues प्रेमाने आणि co-operation ने वागत होते. रसिका आणि सुश्मिता ने कायम प्रोत्सहन दिले, घरातल्याच लहान व्यक्तिप्रमाणे आपुलकीने वागवले आणि आजही वागवत आहेत.

सगळे सुरळीत चालू असताना २००१ च्या शेवटी ले-ऑफ झाला आणि नोकरी गेली. ‘Devi & Associates’ dissolve झाले. एक वर्ष मी SSI मध्ये नोकरी केली. २००२ शेवटी एका NGO मध्ये त्यांच्या वेब प्रोजेक्टस् साठी वेब प्रोग्रामर म्हणून नोकरी मिळाली. मला जपान ला जाण्याचा chance मिळाला. तिथे १.५ वर्ष काम करुन मग Software Testing मध्ये शिफ्ट मारला. जोपासना, कॅनबे करत करत माझे करियर बनत गेले. अनेक अनुभव मिळाले…खूप मित्र-मैत्रिणी मिळाल्या….खूप प्रकारची लोकं भेटली. Maturity वाढत गेली. Independency आणि responsibility वाढत गेली. घेतलेले सगळेच निर्णय बरोबर ठरले असे नाही पण जे चुकले त्यातून दुप्पट शिकले.

प्रत्येक नोकरी stable years काम करुन योग्य कारणांसाठी, ‘गुड नोट’ वर सोडली. म्हणून पहिल्या जोब पासून ते आत्तापर्यंत काहींशी जोडलेली मैत्री अजूनही टिकून आहे. कमी वयात आणि कमी वेळेत खूप काही पहायला मिळाले. काही आयुष्यभराचे ऋणानुबंध जोडले गेले.

करियर सांभाळून शिक्षण सुरु होते… जून आणि डिसेंबर हे परीक्षेंचे महिने आणि नेमके त्याच वेळेस प्रोजेक्ट रिलिज यायचा आणि सहज पास होऊ अशा पेपरना पण बसता यायचे नाही. वेळ वाया जात होता…पण मनं माघार घायला तयार नव्हते… असे करत करत (रडत-खडत नाही हा!) BCA पूर्ण झाले, ते ही First class मिळवून!

BCA नंतर शिक्षण थांबवावे असे मनात आले पण पप्पांनी “MCA ही कर…ओघाने होऊन जाईल” असे सुचवले. MCA ला admission घेतली. submissions, vivas, practicals आणि exams हे सुरुच होते. syllabus तसा कठिण होता. कॉलेज मध्ये काही शिकवतील याची अपेक्षा करणे ही चुकीचे होते. त्यात अचानक पप्पा गेले आणि घरची जबाबदारी सांभाळण्यापेक्षा, ते गेल्याने निर्माण झालेली पोकळी भरुन काढणे जास्त कठिण होते.

MCA चे पपेर्स नीट सुटत गेले. वेळोवेळी मदतीचे अनेक हात मिळाले. BCA च्या गणितासाठी मी रसिकाच्या बाबांकडे शिकवणी लावली, TCS (Theory of Computer Science) सारखा समजायला कठिण पण एकदा कळला की scoring, अशा subject साठी प्रज्ञा होती, Financial Accounting साठी विक्रांत कडे गेले. Self study वर जास्त भर दिला. ‘Where there is a will, there is a way’ असे झाले आणि हा-हा म्हणता MCA ही पूर्ण झाले.

इग्नूची ती convocation ceremony सुरु असताना मी मात्र माझे स्वत:चेच विश्व पुन्हा जगून आले. पुण्यात आलेली तेव्हाची मी आणि आत्ताची मी यात बरीच प्रगती होती (असे मला तरी वाटतेय). हातातला फक्त डिप्लोमा असताना prove करायची महत्वाकांक्षा होती. स्वप्नांना सत्यात उतरवायची आणि त्यासाठी मेहनत घ्यायची तयारी होती. Graduation आणि नंतर Post Graduation करताना, नोकरी आणि व्ययक्तिक जीवनामध्ये अनेक उतार-चढाव अनुभवले होते. घरच्यांबरोबरच, जवळचे आणि हक्काचे मित्र-मैत्रिण यांची मोलाची साथ होती म्हणून एक एक गोष्ट निभावत गेली.

माझ्या पप्पांची ही एक इच्छा मी यशस्वीरित्या पूर्ण केली याचे समाधान जास्त आहे. ते आज असते तर त्यांना किती आनंद झाला असता या विचाराने मनं भरुन आले होते… डोळ्यात पाणी आले होते. MCA च्या यादीत माझेच नाव पहिले होते. माझे नाव पुकारले गेले आणि मी stage वर गेले, degree certificate हातात घेऊन stage वर मागे जाऊन उभी राहिले…एक एक batchmates स्वत:चे certificate घेऊन मला join करत होते कारण शेवटी degree specific ग्रुप फोटो काढायचा होता. लोकांच्या टाळ्या सुरु होत्या…त्या लोकांमध्ये कुठेतरी मला माझ्या पप्पांचे अंधुकसे अस्तित्व भासत होते…त्यांच्या टाळ्या ऐकू येत होत्या… आणि मला नेहमी स्फुर्ती देणारा आणि सदैव हसतमुख असा त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर असल्याचा भास होत होता. हातात ते certificate घेऊन मनं त्यांना म्हणत होते “This is for u Papa…thanks for being there!”.

Page copy protected against web site content infringement by Copyscape





…गमते उदास!

16 11 2009

मागच्या रविवारचा सकाळ पपेर उघडला आणि headline वाचून धक्का बसला…सुनिताबाईंवर काळाने झडप घातली होती….माझी त्यांना भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिली या विचाराने मनं हळहळले.

पुलंशी माझी ओळख तशी फार उशिरा झाली…एका जवळच्या मित्राने वाढदिवसाला पुलंची एक cassette भेट दिली आणि पुलंशी माझी ओळख झाली…मग त्यांची die hard fan असलेल्या माझ्या जिवलग मैत्रिणीने ती वाढवण्यात हात भार लावला. जवळ-जवळ सगळी पुलंची पुस्तकं संचयी आली आणि ‘आहे मनोहर तरी…” पुस्तक घेतले, वाचले आणि सुनिताबाई यांची नवी ओळख झली…त्यांचे अनुभव वाचून भारावून गेले…स्वातंत्र संग्रामात देशासाठी लढलेली, स्पष्ट आणी जबरदस्त व्यक्तिमत्व, करारी, स्वत:च्या चुका न बिचाकता जगासमोर ठेवणरी, प्रत्येक गोष्ट निटंच करावी असा हट्टं असणारी, पुलं वर जिवापाड प्रेम करणारी त्यांची सखी – सहचारिणी, एक ना अनेक पैलू उलगडत गेले… आणि मी त्यांच्या व्यक्तिमत्वावर पूर्णपणे भाळले. त्यांच्या बद्दल खूप वाचले, पुलंच्या भावांच्या मुलखतींपासून ते अगदी पुलंच्या जयंती निमित्त येणार्‍या लेखांपर्यंत.

पुलं प्रेमींना त्यांचा स्पष्टपणा फारसा रुचला नाही म्हणून सुनिताबाई बिनमर्जीतल्या राहिल्या. मला त्या ‘आहे मनोहर तरी…’ मधून खर्‍या कळल्या. त्यांच्या लेखनाचा प्रभाव वाढत गेला आणि त्यांना भेटण्याची मनात सुप्त इच्छा तरळत राहीली.

गेले अनेक महिने आजारी असलेल्या सुनीताबाई अखेरच्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी ८ नोव्हेंबरला (पु लंच्या वाढदिवसाच्याच) दिवसाचीच वाट बघावी की यालाच विचित्र योगायोग म्हणायचे? तसाच अजून एक योगायोग की मी अनेक महिन्यांपूर्वी सुरु करुन ठेवलेला मराठी blog ची  सुरुवात या लेखाने करावी (?)
 
माझी त्यांना भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिली म्हणून सुनिताबाई आत्ता खरोखरंच “….गमते उदास!” 😦