‘ती’ – २७

17 01 2017

सकाळी ‘ती’ हाॅस्पिटल मधे दाखल झाल्याचे समजले. गेले वर्षभर ‘ती’च्या हाॅस्पिटलच्या वाऱ्या वाढल्या होत्या. २-३ दिवसात बरं वाटले की ती घरी येईल या विचारात असतानाच तिची तब्येत बिकट झाली व एका दिवसात सगळे संपले.

काही सुचायला मार्गच उरला नाही…

“आता तुझ्या घरच्यांना, माझ्या काकू (जिला आम्ही ‘आई’ म्हणतो) शी बोलून घ्यायला सांग. तू ही बोल जमेल तसं. घरात तीच मोठी आहे. एकदम साधी आहे. काही टेन्शन घेऊ नकोस. आमची मम्मी गेल्यावर हिनेच एका परीने आम्हाला लहानाचे मोठे केले. आम्ही तिला मानतो.” नुकतीच प्राथमिक पसंती झाली होती आमची, तेव्हा तो मुलगा (आताचा माझा नवरा) मला म्हणाला होता. देवाच्या दयेने योग जुळून आला व त्या माझ्या ‘अहो आई’ (चुलत सासू) झाल्या. अवघा ६-७ वर्षांचा ऋणानुबंध, (दूर राहत असल्यामुळे) एकून ८-१० भेटी. पण पहिल्या काही भेटींमधेच त्या फार मायाळू असल्याचा प्रत्यय आला…येतच राहिला.

आम्ही आमचे लग्न इंटरनेटवर ठरविले पण प्रत्यक्ष भेटलो ते त्यांच्या समोर. पुढे मग लग्नाची तारिख ठरविणे, खरेदी, कोर्ट मॅरेज, खरं लग्न, ती घाई-गडबड, त्यांचा तो उरक, सिद्धीविनायक, देव दर्शन. माझ्या माहेरी आम्ही गेलो, माझ्या कुलदैवतेला. केवढे आवडले होते त्यांना माझं माहेरचं घर, रत्नागिरी, गणपतीपुळे, सिंधुदूर्ग, समुद्र, भगवतीचे देऊळ! “हा पट्टा बघायचा राहिला होता. तुझ्यामुळे बघून झाला…” पायरी चढताना माझा हात धरत त्या म्हणालेल्या मला आठवतंय.

मी इकडे येऊन लगेच गाडी चालवायला लागले त्याचे कौतूक, काही नविन पदार्थ केला की मला कधी करून घालतेयस? हा प्रश्न…फार हौशी. माझ्या डोहाळ-जेवणाला हिरवी साडी लागते म्हणून त्यांनी कोणाकरवी ती पाठवून दिली होती. लोकांना तसदी होईल म्हणून आम्ही सांगत होतो, पण त्यांच्या मनात आले की त्यांनी ते केलेच समजा. मानव सुलभ डावे-उजवे त्यांच्या ठायीही होते. पण त्यांच्या मायेचे पागडे इतकं वजनदार होतं की त्यापुढे सगळे हलकंच. ‘ती’ने सगळ्यांवर भरभरून वेडी माया केली. एका अनाथ जीवाला आपले केले. त्याला नावं, घर, कुटुंब तर दिलेच पण ममता दिली. नवऱ्या पश्चात कष्ट करुन त्याला एकटीने हिंमतीने वाढवले.

आमच्यातले कुणा ना कुणाची वर्षातून एकदा भारतात फेरी होतेच. त्यांना नुसती कुणकुण लागली तरी त्या कंबर कसून तयारीला लागायच्या. कुठे चकल्या, चिवडा, लाडू, पापड-कुरडया, कुठे हळद-मसाला. वयोमानानुसार सगळे जमायचेच असे नाही. मग मुलं रागवणार, बॅगेत जागाच नाही तुझ्या खाऊ साठी सांगणार आणि निमूटपणे तिने बनविलेले  सगळे बॅगेतून इकडे येणार आणि मग आम्ही त्यावर ताव मारणार. हे गेली अनेक वर्ष मी बघत आले आहे. “मी जिवंत आहे तोपर्यंत मी बनवणारच.” हे त्यांचे बोलणे त्यांनी खरे करुन दाखविले.

प्रत्येक सणा-सुदीला काय-कसे करायचे हे त्या सांगायच्या. त्यातले सगळे करायला जमायचेच असे नाही. इकडे अमेरिकेत अमुक-तमुक गोष्ट मिळत नाही किंवा करता येत नाही हे कळल्यावर त्या आधी अमेरिकेच्या नावाने बोटं मोडायच्या व मग स्वतःच त्यातील पळवाटा सुचवायच्या. फार गंमत वाटायची. (अमेरिकेवर तसाही त्यांचा रोष होता. काय करणार? अमेरिकेने त्यांच्या लाडक्या मुलांना त्यांच्यापासून लांब केलं होतं.) कुळाचार करावा हा त्यांचा आग्रह होता पण हट्ट नव्हता. त्यांचे विचार सुधारित होते. म्हणूनच जाती बाहेर प्रेमविवाह करणाऱ्या आपल्या पुतण्याच्या मागे त्या ठामपणे उभ्या राहिल्या, तो ही दीराचा राग ओढवून व विरोध पत्करुन. त्यांच्यासाठी त्यांच्या मुलाचा आनंद इतर कुठल्याही गोष्टापेक्षा अधिक महत्वाचा होता.

त्या फार शिकलेल्या नव्हत्या पण वाचन पुष्कळ केले होते. खूप फिरल्या होत्या. यादोन्हीचे श्रेय त्या दिवंगत नवऱ्याला द्यायच्या. कधी प्रसंगी दोन कवितेच्या ओळीही सुचायच्या त्यांना…कुठे नात्यात लग्न, कार्य निघाले की त्या निघायला एका पायावर तयार. अगदी हल्लीच त्या ‘द्वारका’ बघून आल्या, मुला-नातवंडांसाठी आशिर्वाद मागून आल्या.

त्या कधी कुणाबद्दल वाईट बोलल्याचे मला स्मरत नाही. अलीकडे मात्र त्या बोलताना हळव्या व्हायच्या. जुन्या आठवणी सांगत बसायच्या. “तुला सांगते रुही,….” अशी सुरुवात करुन मनातला एखादा सल हळूच डोकं वर काढायचा.

ठेंगणी – बैठी मूर्ती, गहू वर्ण, पिकलेले केस, कपाळावर गोंदलेले बारिक कुंकू, सांधेदुखीमुळे थोडे अडखळत चालणे, नाशिक-धुळे कडील बोलायची लकब, प्रचंड उत्साह, फिरायची हौस आणि ऐकूनच जगण्याची हौस!

काॅफी, चाॅकलेट, आईस्क्रिम, आणि मसाला डोसा खास आवडीच्या गोष्टी. आत्ताही कुणी लहानगी आजीसाठी, (तिला लवकर बरं वाटावं म्हणून) कॅडबरी घेऊन आली होती. ती कॅडबरी तशीच पडलीए अजून फ्रिज मधे. त्या ती न खाताच निघून गेल्या…कायमच्या…कुणालाही कसलीही पूर्व-कल्पना न देता…त्यांचे त्यांनाही न उमजता!

या मकरसंक्रांतीला, उत्तरायणात शिरणारा सुर्य, आधीच्या पिढीचा, शेवटचा प्रतिनिधी असलेला एक तेजस्वी तारा घेऊन मावळला.

फोन केल्यावर, “हा बोल बेटा…” अशी मायाची हाक आता कायमची बंद झाली!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – २६
‘ती’ – २५
‘ती’ – २४
‘ती’ – २३
‘ती’ – २२
‘ती’ – २१
‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape





‘ती’ – २३

28 10 2015

‘ती’ माझी दूरची नातेवाईक. उन्हाळ्यात ती कुटुंबासोबत अमेरिका फिरायला आली होती. आमचे निमंत्रण स्विकारुन ‘ती’ घरी आली. खरंतर ती आमची पहिली आणि (आता म्हणावं लागतंय) शेवटची भेट!

‘ती’ ला दोन मुली. मोठीचे वय १३/१४ असेल तर लहान ८/९ वर्षांची. ‘ती’ चांगल्या हुद्द्यावर नोकरीला होती. सावळी, बेताची उंची, मध्यम बांधा. दर दिवशी न चुकता योगासनं, सुर्यनमस्कार, खाण्या-पिण्यात पथ्य, ‘ती’ आम्हाला सुदृढ राहणे कसे जरुरीचे आहे हे सांगत होती. मस्त जेवण, (तिच्या आवडीची) वोडका, गप्पांबरोबर माहोल छान रंगला होता. दुसऱ्या दिवशी त्यांना नायगाराला निघायचे होते. भरपूर फिरुन, खरेदी करुन, मजेत सुट्टी घालवून ‘ती’ भारतात परतली.

मागच्या महिन्यात एका पहाटे फोन किणकिणला. ‘ती’ची तब्येत अचानक बिघडली, ‘ती’चे काही खरं नाही…ही बातमी! एकदम काही सुचेनासे झाले. मग कळले, दुपारी ‘ती’ गणपती कार्यक्रमात मुलीच्या नाच बघत असताना कोसळली व बेशुद्ध झाली. आधी घरचा डॉक्टर व मग हॉस्पिटलला नेले तोवर मेंदूत रक्तस्त्राव होऊन ‘ती’ची तब्येत गंभीर झाली होती. त्या दिवशी रात्री तिला कृत्रिम श्वासोश्वास देणाऱ्या यंत्रावर ठेवण्यात आले. डॉक्टरांनी ‘ती’ला ‘ब्रेन डेड’ अर्थात ‘मेंदू निकामी मृत’ घोषित केले. वैदकीय दृष्ट्या ‘ती’ गेलेली होती. पण तरी काहीतरी चमत्कार होईल आणि ती डोळे उघडेल म्हणून तिचे घरच्यांनी (खोटी) आशा बाळगून तिचा कृत्रिम श्वासोश्वास सुरु ठेवला होता. तिची केस सांगून भारतभरातील, परदेशात इतर कुठे, काही मदत मिळते का ते शोधण्यात आले पण सगळीकडून नकारच येत होता. फार भीषण परिस्तिथी झाली होती. कृत्रिम श्वासोश्वासामुळे ऊर धडधडत असतो आणि ते पाहून आपले माणूस जिवंत असल्यासारखे वाटते. आणि अशा वेळी मन सत्य स्विकारायला तयार होत नाही.

‘ती’ ला उच्च रक्तदाबाचा त्रास होता, ज्याकडे तिने कानाडोळा केला. शिवाय तिला रक्तवाहिन्यांचा एक विकार होता, ज्यात त्यांच्या भिंती नाजूक होतात. त्यामुळे अती रक्तप्रवाह झाल्यास त्या लगेच फुटतात किंवा वाहिन्यांना कोंब येतात. ‘aneurysm’ असे नाव आहे त्या दोषाचे. हे ती गेल्यानंतर कळले. परंतू हा विकार अनुवंषिक असू शकतो व तिच्या नातेवाईकांची ही चाचणी करावी लागली.

मेंदूतील रक्तस्त्राव इतका झाला की मेंदू व कवटी यातील पूर्ण जागा रक्ताच्या गुठळ्यांनी भरली. ‘ती’चे वाचणे अशक्य झाले. सगळे शरिर नियंत्रित करणारा मेंदूच निकामी झाला. वैदकीय भाषेत याला ‘ब्रेन डेड’ म्हणतात. आणि कानूनी भाषेतही ‘ब्रेन डेड’ म्हणजे ‘डेड’! यापुढे तिला किती काळ कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवायचे हे हॉस्पिटलने घरच्यांवर सोपविले. ७-८ दिवसात ‘ती’ गेल्याचे कळले.

जो पर्यंत आपल्या माहितीतल्यांशी एखादी गोष्ट होत नाही तोवर आपल्याला त्याचे गांभीर्य कळत नाही. ‘ती’ गेली! आमच्या घरी आम्हा जमलेल्यांनी ती सांगत होती,”मीच तुमच्यात वयाने सगळ्यांत मोठ्ठी आहे पण मीच सर्वांच्यात फिट आहे!”. काटेकोर पथ्य, व्यायाम करणाऱ्या ‘ती’चे शब्द आठवले. तिच्या मुलींसाठी जास्त हळहळायला होते. जाताना ‘ती’, तिच्या मुलींच्या चेहऱ्यावरची ‘हसी-खुशी’ घेऊन गेली…!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – २२
‘ती’ – २१
‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape





‘ती’ – ११

2 09 2015

अकाळी वडिल गेले. त्यांचे कार्य उरकून मी परत नोकरीवर रूजू झाले. मन हळवे झाले होते. आठवणींनी टचकण डोळ्यांत पाणी येई. मी परत आले कळल्यावर माझी मॅनेजर माझ्या डेस्कपाशी थांबली. मला गहिवरून आले. ती सांतवन करत म्हणाली,”वाईट झालं. पण तुला तुझे वडिल इतकी वर्ष लाभले तरी, मी अगदी लहान असताना माझे वडिल गेले. त्यांचा चेहराही मला आठवत नाही!”

एवढेच बोलून ती निघून गेली. माझं दु:ख उगाच हलकं झाल्यासारखं वाटायला लागलं आणि तिचंच सांतवन करावंसं वाटायला लागलं.

‘ती’ चायनीज होती. शिकायला पुण्यात आली व तिथेच नोकरीला लागली. तिच्याशी फक्त कामापुरतेच बोलणं होत असे. बरेच वर्ष पुण्यात काढल्यामुळे बोलता येत नसलेतरी तिला मराठी कळते असे काहीजण म्हणायचे.

त्या कठिण समयी तिने माझ्या दु:खावर जी फुंकर व मनावर जो चटका दिला, त्यामुळे आपल्याहूनही कमनशिबी लोकं आहेत याची जाणीव झाली. त्यासाठी ‘ती’ चे आभार मानायचे मात्र राहूनच गेले.

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape





एक मोऽऽऽठ्ठ्ठा माणूस!

17 10 2012
“एकीकडे सगळं जगं आहे, आणि दुसरीकडे ‘मी’…तर सांग बघू तू कोणाकडे जाशील?” हा त्यांचा मला नित्याचा प्रश्न! मस्करीत माझे उत्तर “जगाकडे…” हे एकून त्यांच्या चेहर्‍यावर मिष्किलवजा खट्टू आविर्भाव आणि माझ्या चेहर्‍यावर ‘विजयी’ मुद्रा. असे हे अगदी ते जाईपर्यंत सुरु होते…
ते एकुलते एक. लहानपणीच त्यांची आई गेली. वडिलांनीच (आबांनी) यांना वाढविले. म्हणूनच असेल कदाचित त्यांच्यात एक विलक्षण लाघवी ‘मूलपण’ होते.

काही कारण्यास्त्व एकत्र कुटुंब सांभाळायची जबाबदारी पेलावी लागणार्‍या आबांना स्वत:च्या मुलाची कुवत असूनही मेडिकलला पाठवता आले नाही. तरीही त्याला चांगले संस्कार आणि शिक्षण देण्यात ते कुठेच कमी पडले नाही. ती अपुरी इच्छा आपल्या मुलीला डॉक्टर करुन पुर्ण केली. अनेक लोकांनी नाके मुरडली की मुलीला एवढे शिकवून काय फायदा, ती तर लग्न होऊन सासरी जाणार. पण त्यांना आपल्या लेकीची कुवत ठाऊक होती, किंबहुना विश्वासवजा खात्रीच होती. आम्ही दोघी बहिणी त्यांच्या खूप लाडक्या! आम्हा भावंडांचेच नाही तर आमच्या सगळ्या गोतवळ्यात ‘चिल्लर पार्टी’ चे ते खूप लाड करत. म्हणून ते ही मुलांचे लाडके होते. माझी मामे-भावंडे त्यांना ‘चिऊ-पप्पा’ म्हणत. माझे घरातले नाव ‘चिऊ’ आणि माझे पप्पा त्यांना स्वत:च्या पप्पांसारखे प्रिय, म्हणून त्यांचे ‘चिऊ-पप्पा’. आमच्याशी ते आमच्या वयाचे होऊन खेळत.

माझ्या बहिणीवर त्यांचा विशेष जीव होता. तिच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी हे नेमके देवासारखे तिच्यासमोर तिच्यासाठी हजर होत. हा प्रत्यत तिला नेहमी येत असे. ती telepathy होती की काय ते देव जाणो… आता वाटते ते फक्त त्यांचे त्यांच्या लेकीसाठीचे प्रेम होते!

माझ्या जन्माच्या वेळची एक गोष्ट आहे. एका मुली नंतर तुम्हाला मुलगा होईल असे वाटले होते. मी झाले आणि तुम्ही थोडे नाखुष झालात. पण मला हातात घेतलेत आणि तुमची नाराजी कुठंच्या कुठे पळून गेली. तुमच्याच भाषेत सांगायचे तर “हा मोठ्ठा कापसाचा गोळा होतीस तू, चेहरा अगदी आईसारखा, वाटले माझी आईच आलीए!” मी शाळेत काही केल्या जात नव्हते म्हणून महिनाभर ते माझ्याबरोबर शाळेत येऊन बसत होते. मला ते शाळेतले दिवस, तो ‘रंजन’ हॉलमधे कोपर्‍यात भरणारा L.K.G. चा क्लास अजून आठवतो.

माझी फोटोग्राफीची आवड अनुवंशीक आहे. त्यांनाही फोटोग्राफीचे वेड होते. त्यांच्या बॉक्स-कॅमेर्‍याने ते भरपूर फोटो काढायचे. रोल मात्र मुंबईहून डेवलप करुन आणायचे. मी कॅमेरा हातात घेतला तो ते गेल्या नंतर. आपला एखादा तरी फोटो त्यांनी पाहायला हवा होता असे वाटत रहाते. शाबासकी देणारे ते हात मात्र आज नाहीत.

विज्ञानाची प्रचंड आवड, रसायनशास्त्रात हातखंड. घरीच कपड्यांसाठीची निळं, अगरबत्ती, वेगवेगळी अत्तरं बनविणे, मिक्सर – washing machine – radio दुरुस्त करणे. आमचा आवज, गाणी टेप करुन ठेवणे हा त्यांचा छंद. त्यावेळी गंमत म्हणून केलेल्या गोष्टी आता अनमोल ठेवा होऊन बसल्या आहेत.

अवघ्या तिशीत त्यांनी चाकोरीबद्ध आयुष्याविरुद्ध बंड पुकारुन स्वत:चा व्यवसाय सुरु केला आणि स्वत:च्या हिमतीवर केमिकल फॅक्टरी काढली. व्यवसाय म्हटले की उतार-चढाव आलेच. त्यांनी खूप कष्ट केले. आम्हाला काही मागायच्या आधीच वस्तू मिळालेली असायची. त्यात विविध पुस्तके, निबंधमाला, dictionary, drawing books, colors आणि त्याच बरोबर Basket Ball, Tennis racket, Badminton racket, Chess etc board games, खेळाची पुस्तके हे देखील असायचे. धंद्यामुळे त्यांच्या जेवायच्या वेळाही ठरलेल्या नसायच्या. आम्हालाही फार वेळ देता यायचा नाही. आम्ही मुले मोठी झाल्यावर त्यांना विचारत असू – “तुम्ही इतरांच्या बाबांसारखी नोकरी का नाही केली?” त्यावर ते म्हणत “मी मोऽऽऽठ्ठ्ठा माणूस आहे आणि मोऽऽऽठ्ठ्ठी माणसे स्वत:चा व्यवसाय करतात”. त्याचा आताकुठे थोडा अर्थ कळायला लागलाय. आणि तेव्हा आपण किती क्षुद्र विचार करत होतो हे आज जाणवतेय.

तल्लख बुध्दी, सुधारलेली विचारसरणी, खेळकर व शांत स्वभाव, सदैव हसतमुख असा चेहरा, कोणत्याही प्रतिकुल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता, हळूवार पण सखोल विचार लाभलेली वाणी, जगमित्र असे ते एक प्रसन्न व्यक्तिमत्व! अशा पित्रू-छायेत वाढल्याचे भाग्य लाभले हे आमचे नशिबच. तुमचा खरंच खूप अभिमान वाटतो. तुम्ही जे संस्कार दिलेत त्यातील अर्धे जरी आम्हाला पुढेच्या पिढीला देता आले तरी जीवन सार्थक झाले असे समजू!

तुम्ही अचानक आमच्यातून निघून गेलात आणि बरेच काही अर्धवट राहिले. तुम्हाला जाऊन आज ७ वर्ष झाली तरी अजुन तुमचा भास होतो, तुमची प्रेमळ हाक एकू येते आणि खरचं सगळं घडले का? असा प्रश्न पडतो…

कुठेतरी मोरपंखी निळ्या रंगाचे कापड दिसते (जो तुम्ही तुमच्या कारखान्यात बनवायचात), अगरबत्तीचा सुगंध दरवळतो (तुम्हाला अगरबत्ती बनविण्याचे कौशल्य आत्मसात होते), कोण्याच्यातरी तोंडून “ए-वन!” अशी कशालातरी दाद जाते (जे तुमचे पेटंट होते) आणि जीव तुमच्या आठवणीने अगदी गलबलून जातो. सगळीकडे तुमचे अस्तित्व आहे असे जाणवत रहाते.

आणि हो पप्पा – तुमच्या प्रश्नाचे खरं उत्तर द्यायला खूप उशीर झालाय पण तरीही मला खात्री आहे तुम्हाला माहित होते की “एकीकडे सगळं जगं असेल, आणि दुसरीकडे तुम्ही असाल तर मी तुमच्याचकडे येईन!!!” Pops, I miss you so much…always…!

Page copy protected against web site content infringement by Copyscape


हे वाचेले का? –
पापा केहते थे…!




‘ती’ – ४

13 01 2012

‘ती’ माझ्या आयुष्यात असुन नसल्यासारखी…माझी तिची एकच भेट.. ती देखील ओझरती…मी शाळेतुन घरी जात होते आणि तेवढ्यात ती मला माझ्या आत्येभावाबरोबर दिसली. दादा बोलायला थांबला, अगदी २ मिनिटे. तिच्या चहर्‍यावर फक्त स्मितहास्य! ६वीत होते मी…

‘ती’ त्याची प्रेयसी! थोड्याच महिन्यात कळले की त्यांनी लग्न ठरवले आहे. BSc. नंतर दादा पुण्याला computer course करत होता. सुट्टीत तो घरी आला की आवर्जुन आमच्याकडे चक्कर मारत असे. माझे वडिल त्याचे लडके मामा. माझ्या वडिलांचे देखील या भाच्यावर विशेष प्रेम. माझे आणि माझ्या बहिणीचे तो खूप लाड करत असे. कुठे चॉकलेट, कुठे कंपास बॉक्स् तर कुठे अजुन काहीतरी. गप्पा होत तेव्हा मधेच कधीतरी तिचा उल्लेख होत असे.

दर भाऊबीजेला तो ओवाळणीसाठी येत असे. ते तिघे भाऊ. सख्खी बहिण नाही. त्या भाऊबीजेला तो पुण्यातच होता. २ दिवसांनंतर तो रत्नागिरीत आला. सकाळीच घरी आला आणि म्हणाला “आज करु आपली भाऊबीज, ओवाळा मला…”. माझी आणि माझ्या बहिणीची आंघोळ पण झाली नव्हती. पटकण आवरुन आम्ही त्याला ओवाळले. तो पर्यंत आईने त्यांना खायला दिले. त्याच्याबरोबर त्याचा मित्र होता. तो मित्र माझ्या वडिलांची कंपनी बघायला दादा बरोबर आला होता. घरुन ते दोघे कंपनीत जाणार होते. “तुम्ही मागून या.” असे सांगून वडिल पुढे कामावर निघाले. गप्पा गोष्टी करुन हे दोघे पण कंपनीला जायला निघाले. आणि वाटेत त्यांच्या मोटरसायकलचा अपघात झाला. दारु पिऊन ट्रक चालवणार्‍या वाहनचालकाचा ताबा सुटला आणि त्यांनी यांना जोरदार धडक दिली. माझा दादा त्याक्षणी गेला. त्याचा मित्र हॉस्पिटल मधे गेला. झाले त्यावर विश्वास बसेना. बरं, आमच्याकडे येऊन गेला ही सगळ्यात मोठ्ठी खंत. तो प्रसंगच महाभयानक होता. आत्या आणि काकांवर तर आभाळच कोसळले होते. शेजारी-शेजारी राहणारे दोन सख्खे मित्र एकत्र गेले. फार भयाण परिस्थिती होती ती. पोस्ट-मॉर्टम नंतर नातेवाईक मुंबईहून येइपर्यंत त्यांचे मृतदेह बर्फात ठेवले होते.

तिच्या घरी ही वाईट बातमी कळविण्यात आली. तिचा विश्वासच बसेना. तिने हॉस्पिटल मधे धाव घेतली. स्वत:च्या डोळ्यांनी बघून खात्री करायला. तिच्या दु:खाची कल्पना पण करवेना तेव्हाही आणि आत्ताही… तेव्हा तिला भेटण्याची खूप इच्छा झाली होती पण वय लहान होते. तो गेला ती एक भयाण पोकळी करुन – तिच्या, आमच्या सगळ्यांच्यातच! किती स्वप्नं रंगवली असतील तिने, लग्नाची, भावी सुखाची, सहजीवनाची… सगळी एका क्षणात मातीमोल झाली.

तो गेला तरी ती माझ्या आत्याकडे येत राहिली… आधार देत राहिली… आधार घेत राहिली. पुढे तिने शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षिकेची हंगामी नोकरी धरली. आत्या कडून तिची खबर-बात कळत असे. थोडे महिने नोकरी, थोडे महिने घरी असे तिचे सुरु होते. शाळेतल्या राजकारणाला ती बळी पडत होती. त्याने ती त्रस्त झाली होती. शेवटी तिने ती नोकरी सोडली.

काही वर्ष गेली तसे घरचे लग्नासाठी मागे लागले. ती काही ना काही सांगून टाळत होती. तो गेला तरी त्याच्या मधून ती बाहेर पडली नव्हती. नोकरी मिळेना, घरचे लग्नासठी खूप मागे लागत होते. शेवटी एके दिवशी तिने गळफास लावून आत्महत्या केली. हृदयाचा थरकाप करणारी ती बातमी होती. त्याच्याशिवाय जगण्यापेक्षा तिने मरण स्विकारले. कित्ती भयानक शोकांतिका होती ही…एखाद्या कादंबरीत वाचावी तशी!

कित्ती मानसिक त्रासातून ती गेली असेल…कित्ती डिप्रेशन?…तिला मदत हवी होती का कुणाची?….इतके हतबल कुणी का होते? असे अनेक प्रश्न मनात साचले… ज्यांची उत्तरं मिळणे केवळ अशक्य!

ती माझ्या आयुष्यातून कायमची गेली… तिला भेटायची ईच्छा अपुरी राहिली…तिच्या आयुष्यासारखी…

*************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape





…गमते उदास!

16 11 2009

मागच्या रविवारचा सकाळ पपेर उघडला आणि headline वाचून धक्का बसला…सुनिताबाईंवर काळाने झडप घातली होती….माझी त्यांना भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिली या विचाराने मनं हळहळले.

पुलंशी माझी ओळख तशी फार उशिरा झाली…एका जवळच्या मित्राने वाढदिवसाला पुलंची एक cassette भेट दिली आणि पुलंशी माझी ओळख झाली…मग त्यांची die hard fan असलेल्या माझ्या जिवलग मैत्रिणीने ती वाढवण्यात हात भार लावला. जवळ-जवळ सगळी पुलंची पुस्तकं संचयी आली आणि ‘आहे मनोहर तरी…” पुस्तक घेतले, वाचले आणि सुनिताबाई यांची नवी ओळख झली…त्यांचे अनुभव वाचून भारावून गेले…स्वातंत्र संग्रामात देशासाठी लढलेली, स्पष्ट आणी जबरदस्त व्यक्तिमत्व, करारी, स्वत:च्या चुका न बिचाकता जगासमोर ठेवणरी, प्रत्येक गोष्ट निटंच करावी असा हट्टं असणारी, पुलं वर जिवापाड प्रेम करणारी त्यांची सखी – सहचारिणी, एक ना अनेक पैलू उलगडत गेले… आणि मी त्यांच्या व्यक्तिमत्वावर पूर्णपणे भाळले. त्यांच्या बद्दल खूप वाचले, पुलंच्या भावांच्या मुलखतींपासून ते अगदी पुलंच्या जयंती निमित्त येणार्‍या लेखांपर्यंत.

पुलं प्रेमींना त्यांचा स्पष्टपणा फारसा रुचला नाही म्हणून सुनिताबाई बिनमर्जीतल्या राहिल्या. मला त्या ‘आहे मनोहर तरी…’ मधून खर्‍या कळल्या. त्यांच्या लेखनाचा प्रभाव वाढत गेला आणि त्यांना भेटण्याची मनात सुप्त इच्छा तरळत राहीली.

गेले अनेक महिने आजारी असलेल्या सुनीताबाई अखेरच्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी ८ नोव्हेंबरला (पु लंच्या वाढदिवसाच्याच) दिवसाचीच वाट बघावी की यालाच विचित्र योगायोग म्हणायचे? तसाच अजून एक योगायोग की मी अनेक महिन्यांपूर्वी सुरु करुन ठेवलेला मराठी blog ची  सुरुवात या लेखाने करावी (?)
 
माझी त्यांना भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिली म्हणून सुनिताबाई आत्ता खरोखरंच “….गमते उदास!” 😦