‘ती’ – ४

13 01 2012

‘ती’ माझ्या आयुष्यात असुन नसल्यासारखी…माझी तिची एकच भेट.. ती देखील ओझरती…मी शाळेतुन घरी जात होते आणि तेवढ्यात ती मला माझ्या आत्येभावाबरोबर दिसली. दादा बोलायला थांबला, अगदी २ मिनिटे. तिच्या चहर्‍यावर फक्त स्मितहास्य! ६वीत होते मी…
 
‘ती’ त्याची प्रेयसी! थोड्याच महिन्यात कळले की त्यांनी लग्न ठरवले आहे. BSc. नंतर दादा पुण्याला computer course करत होता. सुट्टीत तो घरी आला की आवर्जुन आमच्याकडे चक्कर मारत असे. माझे वडिल त्याचे लडके मामा. माझ्या वडिलांचे देखील या भाच्यावर विशेष प्रेम. माझे आणि माझ्या बहिणीचे तो खूप लाड करत असे. कुठे चॉकलेट, कुठे कंपास बॉक्स् तर कुठे अजुन काहीतरी. गप्पा होत तेव्हा मधेच कधीतरी तिचा उल्लेख होत असे.

दर भाऊबीजेला तो ओवाळणीसाठी येत असे. ते तिघे भाऊ. सख्खी बहिण नाही. त्या भाऊबीजेला तो पुण्यातच होता. २ दिवसांनंतर तो रत्नागिरीत आला. सकाळीच घरी आला आणि म्हणाला “आज करु आपली भाऊबीज, ओवाळा मला…”. माझी आणि माझ्या बहिणीची आंघोळ पण झाली नव्हती. पटकण आवरुन आम्ही त्याला ओवाळले. तो पर्यंत आईने त्यांना खायला दिले. त्याच्याबरोबर त्याचा मित्र होता. तो मित्र माझ्या वडिलांची कंपनी बघायला दादा बरोबर आला होता. घरुन ते दोघे कंपनीत जाणार होते. “तुम्ही मागून या.” असे सांगून वडिल पुढे कामावर निघाले. गप्पा गोष्टी करुन हे दोघे पण कंपनीला जायला निघाले. आणि वाटेत त्यांच्या मोटरसायकलचा अपघात झाला. दारु पिऊन ट्रक चालवणार्‍या वाहनचालकाचा ताबा सुटला आणि त्यांनी यांना जोरदार धडक दिली. माझा दादा त्याक्षणी गेला. त्याचा मित्र हॉस्पिटल मधे गेला. झाले त्यावर विश्वास बसेना. बरं, आमच्याकडे येऊन गेला ही सगळ्यात मोठ्ठी खंत. तो प्रसंगच महाभयानक होता. आत्या आणि काकांवर तर आभाळच कोसळले होते. शेजारी-शेजारी राहणारे दोन सख्खे मित्र एकत्र गेले. फार भयाण परिस्थिती होती ती. पोस्ट-मॉर्टम नंतर नातेवाईक मुंबईहून येइपर्यंत त्यांचे मृतदेह बर्फात ठेवले होते.

तिच्या घरी ही वाईट बातमी कळविण्यात आली. तिचा विश्वासच बसेना. तिने हॉस्पिटल मधे धाव घेतली. स्वत:च्या डोळ्यांनी बघून खात्री करायला. तिच्या दु:खाची कल्पना पण करवेना तेव्हाही आणि आत्ताही… तेव्हा तिला भेटण्याची खूप इच्छा झाली होती पण वय लहान होते. तो गेला ती एक भयाण पोकळी करुन – तिच्या, आमच्या सगळ्यांच्यातच! किती स्वप्नं रंगवली असतील तिने, लग्नाची, भावी सुखाची, सहजीवनाची… सगळी एका क्षणात मातीमोल झाली.

तो गेला तरी ती माझ्या आत्याकडे येत राहिली… आधार देत राहिली… आधार घेत राहिली. पुढे तिने शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षिकेची हंगामी नोकरी धरली. आत्या कडून तिची खबर-बात कळत असे. थोडे महिने नोकरी, थोडे महिने घरी असे तिचे सुरु होते. शाळेतल्या राजकारणाला ती बळी पडत होती. त्याने ती त्रस्त झाली होती. शेवटी तिने ती नोकरी सोडली.

काही वर्ष गेली तसे घरचे लग्नासाठी मागे लागले. ती काही ना काही सांगून टाळत होती. तो गेला तरी त्याच्या मधून ती बाहेर पडली नव्हती. नोकरी मिळेना, घरचे लग्नासठी खूप मागे लागत होते. शेवटी एके दिवशी तिने गळफास लावून आत्महत्या केली. हृदयाचा थरकाप करणारी ती बातमी होती. त्याच्याशिवय जगण्यापेक्षा तिने मरण स्विकारले. कित्ती भयानक शोकांतिका होती ही…एखाद्या कादंबरीत वाचावी तशी!

कित्ती मानसिक त्रासातून ती गेली असेल…कित्ती डिप्रेशन?…तिला मदत हवी होती का कुणाची?….इतके हतबल कुणी का होते? असे अनेक प्रश्न मनात साचले… ज्यांची उत्तरं मिळणे केवळ अशक्य!

ती माझ्या आयुष्यातून कायमची गेली… तिला भेटायची ईच्छा अपुरी राहिली…तिच्या आयुष्यासारखी…

*************

‘ती’ शृंखला -

‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape





‘ती’ – ३

29 11 2011

‘ती’ कोणाच्यातरी ओळखीने आली होती. तिला थोड्या दिवसांसाठी पुण्यात रहायची सोय हवी होती. आमच्या शेजारच्या खोलीत काही दिवस रहायची आजींनी परवांगी दिली आणि ती आमच्या शेजारी रहायला आली. ती B.A.M.S. डॉक्टर होती, निदान तसे तिने सांगितले तरी होते आम्हा सगळ्यांना…

माझी तिच्याशी हळूहळू मैत्री झाली. बोलायला ठीक होती ती. आमच्याच मेसमधे तिने डब्बा सुरु केला. रात्री एकत्र जेवण करुन गप्पा-टप्पा होत असत. ती सातार्‍याची होती. कोणतातरी छोटा कोर्स (बहुदा आयुर्वेदचा असावा) करण्यासाठी ती पुण्यात होती. तिचा एक प्रियकर असल्याचे कळले. तो सुद्धा डॉक्टर होता. त्याच्याबद्दल बोलताना ती वेगळ्याच विश्वात रमत असे. तो पुढच्या महिन्यात मेडिकल कॉन्फरंस् करिता पुण्यात येणार होता. आपटे रोडवरील एका हॉटेलमधे तो नेहमी उतरतो असे ती म्हणली.

कधी कधी तिचे वागणे विचित्र वाटायचे. हिला काहीतरी प्रोब्लेम आहे का अशी शंका यायची. अचानकपणे तिने एक दिवस जागा सोडली. आमच्या घरमालक आजींना कुठूनतरी बातमी कळली कि ‘ती’ घटस्फोटीत होती. माहेरच्यांनी हिच्याकडे पाठ फिरवली होती. मला तिची एकीकडे दया आली, दुसरिकडे विचार आला की ती आम्हला खरं सांगू शकली असती…की काही सांगण्या पलिकडचे होते? न जाणो काय त्रास होता तिला.

तिने तिचा सातार्‍याचा फोन दिल होता तिकडे मी कॉल केला तर तो फोन भलत्याचाच निघाला. तो तिच्या घरचा नंबर नव्हताच. दुसर्‍या महिन्याच्या तिने सांगितलेल्या तारखेला मी त्या आपटे रोदवरील हॉटेल मधे गेले आणि तिच्या प्रियकराच्या नावने रुम बूकिंग आहे का याची चौकशी केली. त्या नावाने कोणतेच बूकिंग नव्हते. म्हणजे ती जे काही बोलली, वागली ते सगळे खोटं होते? की तसे वागण्यात तिचा काही नाईलाज होता? तिची दया आली आणि थोडा रागही…कदाचित ती वाईत प्रसंगातून जात होती, तिचा कोणी आधारही नसेल, किंवा ती जीवनाकडून तेच deserve करत असेल. काही कळायला मार्ग नव्हता.

मला तिला जाणून घायचे होते, समजून घायचे होते.. कदचित तिला आधार द्यायचा होता. तिच्या आयुष्यात जे काही झाले ते सगळे विसरुन नविन सुरुवात कर असे सांगायचे होते. आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे – कोणी विश्वास ठेवला तर त्याला पात्र ठर हे सांगायचे होते.

आणखी ३-४ वेळा तिचा फोन लावला पण तिच्याशी काहीच संपर्क झाला नाही. आणि या पुढे कधी होणार नाही. ‘ती’ एक गूढच होती.

*************

‘ती’ शृंखला -

‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape





‘ती’ – २

23 11 2011

तिच्या विषयी लिहायला घेतलं खरं पण नक्की कुठून सुरुवात करु आणि काय काय लिहू असे झाले क्षणार्धात…’ती’ माझ्या आयुष्यातले सगळ्यात प्रभावी व्यक्तिमत्व!
 
तिचे माहेर सिंधुदुर्गातले छोटेसे खेडे ‘पोईप’ आणि तिला दिले देवगडच्या ‘हिंदळे’ गावात. लग्नानंतर ती मुंबईत आली असावी. मुंबईच्या चाळींमधे जसे अनेकांनी संसार केले तसा हिने सुद्धा. ती तिथेच थांबली नाही. चेंबुरच्या हाऊसिंग बोर्डच्या बिल्डींग मधे स्वत:ची हक्काची जागा घेण्यापर्यंत तिने मजल मारली. ‘ती’च्या घराची दारं सगळ्यांच्या स्वागतासाठी नेहमी उघडी होती.

ती अतिशय जिद्धी, खंबीर, मनाने हळवी, हौशी, प्रेमळ, सुधारीत विचारसरणीची, विशाल ह्रुदयी आणि त्या सगळ्या गुणांना पूर्णत्व देणारा एक असामान्य गुण, तो म्हणजे – दानशूरपणा.

नवर्‍याची जेमतेम पगाराची मिलमधली नोकरी. त्यात त्यांची नोकरीची धरसोड सुरु असायची. मग हिने देखील काही ना काही करुन संसाराला हात भार लावला. दूधाचे सेंटर अनेक वर्ष चालविले. पहाटे लवकर उठून दूधाच्य गाड्या आल्या की दूध उतरवून घेणे, दूध पोचविणार्‍या मुलांकडे त्यांच्या लाईनच्या पिशव्या तयार करुन देणे. सगळा हिशोब बघणे. जातीने लक्ष घालून ती काम करत असे. कायम कष्ट करण्यात आयुष्य गेलं तिचे.

स्वत:च्या मुला-बाळांबरोबर तिने अनेकांना आपलेसे केले, अनेक होतकरु नातेवाईकांना आधर दिला. ते दिवस माणुसकीला महत्व देणारे. हिच्या अनेक ओलखी-पाळखी. कित्येक जणांना हिच्या शब्दाखातर नोकरी मिळाली असेल. परत याबद्दल कोणाकडेही वाच्यताही नाही. कोणालाही कसलीही मदत करायला ही सगळ्यांच्या पुढे. ज्याला जे हवे ते देणे, आपल्याला जमेल ती मदत करणे हा नियम होता. तिचा धडपडा स्वभाव ती जाईपर्यंत तिच्यात होता. कधी लोक गैरफायदाही घेत, पैशाला फसवत. पण हिने त्यांना माफ केले आणि आपले चांगले वागणे सोडले नाही. सगळ्यांच्या सुख-दु:खात ती धावून गेली.  मुलंही तशीच हिच्या वळणावर गेली.
 
दिसायला गोरीपान, अतिशय देखणी, उंच, मध्यम बांधा, पाचवरी साडी, केसांचा छानसा आंबाडा, मोठे कुंकु, वयोमननुसार लागलेला भिंगचा चष्मा. शंकर हे तिचे आराध्य दैवत. त्याच्यावर तिची निस्सीम श्रद्धा. पण त्याच्या कुठेही बाऊ नाही की उगाच थोटांड नाही. खोटेपणा, दिखाऊपणा तिच्या रक्तातच नव्हता. तिच्या वागण्यात एक भावणारा मनस्वीपणा होता. फिरायची भयंकर आवड. १२ ज्योतिर्लिंग आणि बराच भारत फिरुन झाला होता. हाताला चव अशी की नुसती आमटी केली तरी खाणारा बोटं चोखत बसेल. तांदळ्याच्या शेवया-नारळाचा रस, सातकाप्याचे घावनं, इत्यादी पदार्थांमधे तिचा हातखंड होता. कालागणिक हे पदार्थसुद्धा नामशेष झाले.

प्रेमळ स्वभावाला सीमा नाही – इतका की जावयाला मुलगा करुन घेतले आणि सुनांवर मुली सारखीच माया. सगळ्यांचे खूप लाड होत. मुलगी-जावई-नात चिंचवडला होते. त्यांची आठवण आली की त्यांच्यासाठी खाऊ, मासे (मुंबईत ताजे मिळतात ना…) घेऊन ही पहाटेच मुंबईहून पुण्याला निघायची. बस नाही मिळाली तर मिळेल त्या वहानाने ही चिंचवड गाठायची. अतिश्योक्ती वाटेल पण हे खरं आहे – अनेक वेळा तिने ट्रक-टेंपो मधून देखील लिफ्ट घेतली आहे. एकदम निडर आणि तितकीच घरंदाज. तिच्या बद्दल त्या ट्रक-टेंपोवाल्यांनाही आदर वाटला असणार यात काही शंका नाही.

माझ्यावर तिचा अतिशय जीव. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला ती मुंबईहून न चुकता रत्नागिरीला यायची. सोबत रात्रभर जागून, एस.टीच्या गराड्यातून मांडीवर सांभाळत आणलेला Monginis चा केक असायचा. आजही ते आठवले की तिच्या आठवणींनी गहिवरुन येते.

मे महिन्याच्या सुट्टीत तिच्याकडे चेंबुरला जाऊन राहाणे म्हणजे एक परवणीच! मी, माझी मोठी बहिण आणि माझा मामे भाऊ… आमच्या तिघांचे अतिशय लाड केले तिने. खेळ, पुस्तके, कपडे, खाऊ, त्यावेळी भाड्याने (तासावर) सायकल, रेखाच्या दुकानातला दूधाचा पेप्सीकोल व क्रीम वेफर्स (पिकविक), चेंबुर स्टेशन जवळची भेलपुरी, सरोजची स्वीट कचोरी, ‘यांकी डूडल’चे आईस्क्रीम, मोंजिनिजचा केक, घसितारामची मिठाई, असे एक न अनेक हट्ट तिने पुरवले. मला अजूनही आठवतेय मी आणि माझा मामे भाऊ तासावर भाड्याने सायकल आणायचो. बिल्डिंगच्या ग्राऊंडवर आम्ही सायकल चालवायचो. नेमकी त्याच वेळी शेजारची (आमच्याच वयाची) ‘चारु’ आमच्या त्या सायकलसाठी हट्ट करुन रडायची. आम्हाला प्रेमळ विनवणी व्हायची “द्या रे बाळांनो तिला थोडा वेळ सायकल” आणि ‘ती’ च्यासाठी चारुला सायकल द्यायचो. त्या चारुचा भयंकर राग यायचा. आत्ता हसू येते. मी दुसरीत असल्यापासून तिला इंग्लिशमधे पत्र लिहायचे. त्याचे तिला कोण कौतुक! माझी मामी तिला ती पत्र वाचून दाखवायची. वर्षभराची अशी ही माझी पोस्ट कार्ड ती  जमवून ठेवायची. त्या दिवसांची आज आठवण आली की खरंच वाटते “लहानपण देगा देवा..”

तब्येतीची कुठलीही पथ्य तिने कधीच पाळली नाहीत. २ महिने आरामासाठी लेकीकडे गेली. त्याच दरम्याने तिचा मेहुणा (बहिणीचा नवरा) वारला. मुंबईत परतली आणि ही बातमी कळताच बहिणीसाठी जीव कळवळला. लगोलाग तिला भेटायला घेऊन जा असे मधल्या मुलाला म्हणाली. मुलुंडला बहिणीच्या बिल्डिंग खाली आली. बहिणीचे कसे सांतवन करु या विचाराने भावना अनावर झाल्या आणि त्यातच ह्रुदयविकाराच तीव्र झटका आला. पहिल्या पायरीवर मुलाच्या हातात प्राण गेला. वय ६३. कोणालाच विश्वास बसण्या पलिकडची घटणा. ती गेली ती तारीख २२ नोव्हेंबर. काल तिला जाऊन १८ वर्ष झाली. शेवटी काय ‘जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला’ हेच खरं.

ती गेली तो मनाला चटका लावून. ती एक आदर्श स्त्री होती -चांगली मुलगी, बहिण, पत्नी, आई, वहिनी, जाऊ, सासू, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक उत्कृष्ट आजी होती. होय… ती माझ्या आईची आई… माझी ‘आजी’! माझ्या वडिलांची आई ते लहान असतानाच गेली. त्यामुळे त्याची भरपाई म्हणून असेल कदाचित की देवाने दोन आजींची एकत्र मिळून ही अशी ‘एक’ आजी दिली. आम्ही खूप मोठे व्हावे ही तिची ईच्छा. तिने केले संस्कार नकळत आमच्यात रुजले. म्हणून की काय कोण जाणे तिच्याच सारखी माझीही (बर्‍याच उशीरा) पण नकळत शंकरावर श्रद्धा जडली. माझी बहिण डॉक्टर व्हावी हे तिचे स्वप्न. तिला क्रिकेट मधे अतिशय रुची. त्या काळी तिला हा खेळ समजत होता, टि.व्ही वर सामने बघण्यात ती मग्न होत असे. तिचीच सुप्त इच्छा असावी म्हणून माझा मामे-भाऊ क्रिकेटर (fast bowler) आहे. त्याचे क्रिकेटचे वेड अनुवंशिक आहे. सल एवढीच की हे सगळे बघायला ती आमच्यात नाहीए.  

ती गेली त्यानंतर कार्यासाठी तिचा फोटो लागणार होता. तिचा एकटीचा असा एकही स्वतंत्र फोटो मिळेना. माझ्या आजोबांचे स्नेही चित्रकार होते आणि ही वहिनी लाडकी होती. त्यांनी तिचे तरुणपणीचे इतके सुंदर portrait रेखाटले की बघत बसावे. त्यांच्या त्या म्हातार्‍या बोटांतून देखील तिच्या खातर एक सुंदर कलाकृती कॅन्वासवर अवतरली. ते आजीचे पेंटिंग आजही माझ्या मामाकडे फ्रेम करुन लावले आहे.
 
आजूनही आमच्या घरात-नात्यात-ओळखीत तिचा विषय निघाला, तिची आठवण काढली की लहान-थोर सगळेच हळवे होतात. तिच्यात ती जादू होती…!

*************

‘ती’ शृंखला -

‘ती’ – १

 

Page copy protected against web site content infringement by Copyscape





‘ती’ – १

16 11 2011

स्त्रीच्या विविध रूपाने मी अगदी भारावून जात आलेय. ‘ती’ कोणी एक स्त्री नाही. तिच्या अनेक प्रतिमा, अनेक चेहरे, अनेक छबी. आज वर आयुष्यात वेगवेगळ्या वळणावर ‘ती’ निरनिराळ्या स्वरूपात भेटत आली. आणि त्या-त्या वेळी तिने ह्रुदयाला स्पर्श केला.

कधी मैत्रिण म्हणून, कधी कामवाली बाई म्हणून तर कधी अजून कोणी. कधी मला ‘ती’ ची दया आली, कधी आवडली, कधी भावली, कधी रागही आला असेल तिचा, पण कुठेतारी ‘ती’ मनात रुजली. आणि आज म्हणूनच प्रत्येक ‘ती’ च्या विषयी लिहावे वाटले. म्हणून ही श्रुंखला…

‘ती’ च्याशी माझा असलेला संबंध/नाते मी स्पष्ट करेन किंवा करणारही नाही. खरे नाव सांगेन, किंवा कालपनीक नावंही देईन. ती चांगली की वाईट, चूक की बरोबर या खोलात मला शिरायचे नाही. मला तो अधिकारंही नाही. मला तसे करुन तिला दुखवायचे तर मुळीच नाही. ती ही अशी एक व्यक्ति/स्त्री शक्ती आणि ‘ती’ माझ्या मनात का आणि कशी रुजली एवढेच सांगण्याचा एक छोटासा प्रयास – तुमच्यापेक्षा माझ्या स्वत:साठीच कदाचित!

****************************
‘ती’ – १

कधी, केव्हा, कशी ते नक्की आठवत नाही पण बेगम मासे विकायला घरी येऊ लागली. बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे बहुदा मांसाहाराचे दिवस धरले जातात. बेगमच्या कोण्या नातेवाईकाच्या मासेमारीच्या लॉंच बोट होत्या. मध्यरात्री मासेमारी करुन पहाटे मासे आले की बेगम ते घेऊन विकायला निघायची. ६:३०-७:०० च्या दरम्याने घराच्या फाटकापाशी येऊन हाक मारायची. ती ताजे-ताजे मासे घेऊन आलेली असायची. मासे हवे असल्यास आई तिला ‘थांब, आले’ एवढेच ओरडून सांगायची. महिन्याचा हिशोब एकदम महिना अखेरी होत असे. तिची ठरलेली घरं असायची, त्यांच्याकडेच ती मासे विकायला जायची. दारो-दारी ओरडून तिने कधीच मासे विकले नाहीत.

नावावरुन समजलेच असेल ‘बेगम’ मुस्लिम आहे. पंनाशीच्या आत-बाहेर वय, जरासा उभट सस्मित चेहरा, गव्हाळ वर्ण, सुळसुळीत पाचवारी साडी, डोक्यावरुन पदर, मोठा अलुमिनियमचा मासे-बर्फाने भरलेला डबा डोक्यावर. बेगम विधवा होती. लग्नानंतर लगेच तिचा नवरा कोणत्यातरी आजाराने गेला. ही आई कडे परतली. माहेरी भाऊ-भावजया, आई आणि ही. आईकडे हीच लक्ष देत होती. मासे विकुन तिचा आणि आईचा खर्च भागवत होती, आईला तरीही मुलंचा पुळका होताच. एका भावाला हिने शब्द टाकून, पैसे भरुन कुवैत ला का कुठेतरी नोकरी लावली होती. हिची जबाबदारी ही स्वत:च घेत होती.

माझ्या आईशी बेगमचे छान संबंध जुळत होते. आई तिला चहा-नाश्ता केल्याशिवाय जाऊ देत नसे. कुठे दिवाळीचा फराळ, कैरीचे लोणचे, फणस, ती हक्काने मागून नेत असे. व्यवहार फक्त नावाला उरला. माझ्या आईने देखील कधी तिच्याशी घासा-घीस केली नाही. २ पैसे जास्त गेले तरी तिने आणलेला माल चोख होता.
 
माझ्या वडिलांचे किडणी स्टोनचे ऑपरेशन झाले. त्यावेळी बराच खर्च झाला होता. शिवाय त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून त्यांचा धंदाही मंदावला होता. हॉस्पिटल मधे बेगम त्यांना बघायला आली आणि कोणी न सांगता, काही न बोलता आईच्या हातात ३००० रु. देत म्हणाली “ताई, आधी हे घ्या.. असू देत जवळ” त्या मदतीचे मोल करणे अशक्य!

बेगमच्या घरच्यांनी तिचे एका विदुराशी लग्न करून दिले. त्या माणसाला लहान-लहान तीन मुले होती – एक मुलगी, २ मुलगे. तिचा नवर्‍याचा पण मासेमारीचा व्यवसाय होता राजापुरजवळ एका छोट्या गावी. लग्ननंतर ती तिच्या नवरा व मुलांबरोबर आली होती. रंगपंचमीचा दिवस होता तो. आईने छान पदार्थ केले, तिला आहेर केला. दुसर्‍या गावी गेल्यामुळे बेगमचे नेहमीचे येणे कमी झाले. आठवड्यातून एकदा ती येत असे मासे घेऊन. चहा घेत-घेत गप्पा होत. खुशाली कळे. मुलांना हिने जीव लावला होता. मुलं मोठी होत होती. तिघांमधे एकच मुलगा हुशार होता, त्याला तिने हॉस्टेलवर ठेवले होते. बाकी दोघांना अभ्यासात गती नव्हती. मुलीला शिंग फुटली आणि ती घरातून कोणा बरोबरतरी पळून गेली. ती भानगड सोडवते नाही तोवर तिचा नवरा एका बाईच्या नादी लागला. आगीतून-फुफाट्यात पडावे अशी बिचरीची गत झाली. हिने शिकवलेला मुलगा बापाच्या बाजुने झाला आणि ज्याला ही बिनकामाचा समजत होती तोच हिचा आधर बनला. आधी पंचायत मग कोर्ट-कचेरी असे सुरु आहे बिचरीचे. आता वेगळी खोली घेऊन राहतात माय-लेक. ही मासे विकते, मुलगा बोटीवर काम करतो आणि गुजारा करतात. येणार्‍या परिस्थितीला तोंड देत ती लढतेय आयुष्याशी.

माझा परदेशी असलेला मामा किंवा कोणी पाहुणे येणार असे कळले की बेगम हवे तसे मासे आणून देत असे. माझी बहिण सुद्धा मासे-प्रेमी, ती किंवा तिचा नवरा कोल्हापूरहून येणार आहे असे कधीतरी आई अंधुक बोललेली असायची बेगमला आणि कधी स्वत:ला नाहीच जमले  यायला तर ती माझ्या बहिणीसाठी कोणा ना कोणा बरोबर मासे पाठवून देत असे. मी मासे खात नाही यावर ती विलक्षण नाराज असते. आणि माझा नवरा जेव्हा लग्नानंतर पहिल्यांदा घरी रत्नागिरीला आला तेव्हा ती प्रेमाने त्याच्यासाठी मासे घेऊन आली होती. तेव्हा तिच्या डोळ्यात समाधान होते.
 
माझ्या आईची आणि तिची आत्ताशा खूप घट्ट मैत्री आहे. आई तिला काही ना काही मदतही करत असते. माझे वडिल मासेखाऊ होते. माश्याचे जेवण असले की ते मनसोक्त जेवत. कालांतराने वडिलही गेले. मासे घेण्याचे प्रमाण कमी झाले. बेगमला एव्हाना घरी येण्यासाठी कारण लागत नाही. ती येते, आईला भेटते. “जास्त दग-दग करु नको” असे दोघीही एकमेकींना सांगतात. प्रेमाने माझी, माझ्या बहिणीची, जावयांची चौकशी होते. भावासाठी एखादे पापलेट आणलेले असते…

गेली २० वर्ष, प्रत्येक सुख-दु:खात बेगम आमच्यासाठी आणि माझी आई तिच्यासाठी होती. अगदी मागच्याच महिन्याची गोष्ट – माझ्या वडिलांचे श्राद्ध होते. आईने वाडी दाखवली आणि जेवायला बसणार इतक्यात ही दारत हजर. आईने पोटभर जेऊन पाठवले. ते बघून वर माझ्या वडिलांनाही समाधान वाटले असणार. माहीत नाही ही अशी कोणती नाती असतात जी वेळ, काळ, जात-धर्म सगळ्यांच्या पलिकडची असतात. ही कोण कुठची बेगम, काय निमित्त? तर ती मासे विकणारी,  पण ती आमच्या घरचीच होऊन गेली.
 
मी येणार आहे हे कळले की बेगम मुद्दाम भेटायला येते. गप्पा होतात. प्रेमाने चौकशी होते. तिची कहानी मी ऐकून घेते. जमेल तसे तिचे सांतवन करते. बाकी काही हातात उरत नाही. तिच्या आणि माझ्याही…

Page copy protected against web site content infringement by Copyscape





दिवाळी फराळ

26 10 2011

आईच्या हातचा दिवाळीचा फराळ म्हणजे ‘स्वर्गीय सुख’!!!!

हा फोटो २-३ वर्षांपूर्वीचा आहे. अजून ती चव जिभेवर रेंगाळते आणि पटकन निघून आईकडे जावे मनात येते.

यंदा उत्साहात  बेसानाचे लाडू करायचा घाट घातला. पहिल्यांदाच केले त्या मानाने छान झाले. १ तास बेसन भाजत होते तेव्हा जाणीव झाली की आपल्या आईला दिवाळीचा फराळ करताना कित्ती कष्ट पडत असतात. ते ही इतकी वर्ष, ती सगळे पदार्थ, कमी वेळेत आणि सुग्रण प्रकारे कसे काय करत आली आहे याचे राहून राहून आश्चर्य वाटते. घरी अमक्याला चकली आवडते, तमक्याला रवा लाडू, बेसन लाडू लागतो, लेकीला करंजी, शंकरपाळे, लेकाला चिवडा, अनारसे, जावयाला चिरोटे, शेव असे एक-एक करत ती सगळा फराळ करतेच.

आम्ही भावंडे तिला दिवाळी आधी ताकीद देतो की यंदा काही करु नको, हल्ली सगळे विकत मिळते, बाहेरुन आण. पण ती थोडीच शांत बसणार आहे? आम्हालाही आतून माहित असते की तिच्या हातचा पदार्थाची सर विकतच्या वस्तूला कुठे येणार?

घर सोडून नोकरी-शिक्षणाला बाहेर पडले आणि दिवाळीच्या फराळाच्या शिदोरीचे महत्व आणखी समजले. आई भरपूर डबे देत असे. ऑफिसमधे खाऊ नेला की सगळे तुटून पडत त्यावर. मग तो पुरवून पुरवून खात असू.

दिवाळीच्या सकाळी उटणे लावून अभंग स्नान, सहकुटुंब फराळ, एकत्र फटाके… काय मजा असते ना देशात. परदेशात काही feel येत नाही.

आज इतर कशापेक्षा आईचीच जास्त आठवण येतेय मला. Hope, पुढच्या दिवाळीला आई सोबत, भारतात असेन.

Page copy protected against web site content infringement by Copyscape





एका स्वप्नाची पूर्ती!

9 08 2011

कालचा दिवस भाग्याचा!
नविन घराचा ताबा मिळाला. पुण्यात घर व्हावे ही एका तपापासूनची इच्छा…ते स्वप्न आज सत्यात उतरले.

भाऊ, बहिण, आई यांनी घराचा ताबा घेतला. गुरुजींना बोलावून गणेशपुजन केले. संध्याकाळी माझ्या जवळच्या मैत्रिणी आल्या होत्या. मी विडियो-चॅटवर घर पाहिले, सगळे बघत होते, सर्वांशी बोलले. खूप आनंद झाला. माझ्या आईने व बहिणीने घरीच पाव-भाजी केली.

माझ्या आईच्या चेहर्‍यावरचा आनंद बघून मला समाधान वाटले. राहून-राहून माझ्या पपांची उणीव जाणवत होती. त्यांच्या चिऊचे घरटे बघायला ते आज हवे होते.

मी तिकडे नसतानाही माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणी आपल्या घरच्यांसहित आवर्जून आल्या. मनं भरुन आले होते.

देवाचे शतश: आभार- हा दिवस दाखविल्याबद्दल, घर झाल्याबद्दल आणि माझ्यावर इतके प्रेम करणारी माणसे मला दिल्याबद्दल!

Miss u all…
Love u more!





मनी रुंजी घालत विचार तुझे…

22 06 2011


मनी रुंजी घालत विचार तुझे…
ह्रुदयी अनामक काहूर उठे,
डोळे मिटता मी मज पुसे…
तुच समोर की स्वप्न भासे!
 
अधरांवर टेकता अधरं तुझे…
मी ही हरले, मी ही विरले,
जाणता अजाणता…
तुझ्यासवे विसावले,
दचकून उठता ध्यानी आले…
स्वप्नसृष्टीत होते रमले!
 
मनी रुंजी घालत विचार तुझे…
ओठांवर अलगद स्मित फुले,
गालांवर फिरती मोर पिसे,
वेडावून मजला मनं हसे!

 

 
Page copy protected against web site content infringement by Copyscape





पावसाच्या पहिल्या सरीत…

25 05 2011

पावसाच्या पहिल्या सरीत…..
अंगणात जाऊन बागडायचं
मनातल्या भावनांना
ओलं चिंब भिजवायचं

तप्त धरा शांत करायला
पाऊस वाटे हवा हवा
अंग-अंग मोहरुन टाकी
हवेतला हा गारवा

पाण्यात भिजवून
मनं करायचे बेधुंद
अन् श्वासांमध्ये साठवून घ्यायचा
मातीचा सुगंध

पावसाच्या पहिल्या सरीत….
नक्की असंच करायचं
गाडी काढून, घाटामध्ये
धबधबे शोधत फिरायचं

अंगावर झेलायच्या
 कोसळणार्‍या धारा
कानांमध्ये घुमू द्यायचा
गार गार वारा

प्रत्येक सर नविन भासते
नवा तिचा स्पर्श
मनं-चक्षुत भरुन घ्यायचा
हिरवा गार निसर्ग

थेंबन् थेंब अनुभवायचा
सोडून सारी चिंता
हळू-हळू उलगडू द्यायचा
भावनांचा गुंता

पावसाच्या पहिल्या सरीत…..
नखं-शिखांत निथळायचं
पावसाबद्दलचे प्रेम
पुन्हा पावसालाच दाखवायचं

पावसाच्या पाण्यासारखं
अंगणभर पसरायचं
खळखळणारा निर्झर होऊन
नदीत जाऊन मिसळायचं

नाजूक हातात झेलू पाहायचे
टपोरे कांचबिंब
दवाच्या मोत्यांमध्ये शोधायचे
स्वत:चे प्रतिबिंब

पावसाच्या पहिल्या सरीत…..
त्याची आठवण काढायची
नविन सरीसोबत त्याला आणायची
पावसाला विनवणी करायची!

© Ruhi’s Creations 2011

Page copy protected against web site content infringement by Copyscape





हापूस

13 05 2011

माझा जन्म रत्नागिरीचा. त्यामुळे ‘हापूस’ या फळाशी माझे तेव्हापासूनचे नाते. त्याचे (जन्माचे नव्हे हो, हापूस चे) बरेच वर्ष मला काही कौतुक वाटायचे नाही. चुकीचा समज करुन घेऊ नका. कौतुक नाही  म्हणजे – लहानपणापासून ‘हापूस’ हा इतका बघायला (आणि खायला) मिळाला की त्याबद्दल अप्रुप वाटायचे नाही.

अप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यापासून हळूहळू आंब्याचे बाजारात आगमन व्हायचे. सुरुवातीला भाव वधारलेले असत. पण तरीही वडिल आंबे हमखास घेऊन येत. त्यांना आंब्यांची चांगली जाण होती. शिवाय घरी दारावर काही ‘माम्या’ (मामीचे बहुवचन). हा खास कोकणी शब्द आहे. दारावर ताजी भाजी, ओले काजु, लोणचाच्या कैर्‍या, आंबे, फणसाची कौरी, इत्यादी विकायला घेऊन येणार्‍या बायकांना ‘मामी’ म्हणायची पद्ध्त आहे. जसे सगळे पोलिस ‘मामा’ असतात ना तशी.

कोकणेतर लोकांचा एक (गैर)समज असा की कोकणात प्रत्यकाच्या आंब्यांच्या बागा आहेत. तो समज स्वाभाविक आहे म्हणा, पण माझ्या सारखे बरेच रत्नागिरीकर आजन्म आंबे विकत खात आले आहेत.

काही बागायतदार कच्चे आंबे विकत. वडिल असे कच्चे आंबे शेकड्याच्या हिशोबाने विकत घेत. त्यात एक ‘बिटके हापूस’ हा प्रकार असे. ज्या देठांना काही आंबे एकदम लागतात, त्यातले काही आकाराने मोठे होतात, आणि काही छोटे रहातात. पण आकार छोटा असलातरी गुणधर्म सारखेच. आम्हाला या बिटक्यांचे भयंकर वेड. शिवाय हा छोटासा आंबा चवी इतकाच दिसयलाही ‘गोड’.

तर वडिलांचा ठरलेला विकणारा माणूस असे ‘बिटके हापूस’ सुद्धा विकायच्या. मग घरी आणून रितसर त्यांची अडी घालून वेताच्या करंड्यांमध्ये पिकायला ठेवत. दर दिवशी ती अडी बाजुला करून आंबे किती पिकले आहेत यावर नजर ठेवावी लागत असे. आणि एकदा का आंबे पिकायला लागले की संपूर्ण खोली हापूस आंब्याच्या वासाने घमघमत असे. पिकलेले आंबे जमिनीवर नीट पसरुन ठेवावे लागत. खोलीभर नुसते आंबेच आंबे. हवे तितके खा. काही बंधन नाही. हापूसच्या जोडीला पायरी, रायवळ आंबे ही मुबलक असायचे.

आई विविध आंब्याचे विविध प्रकार करायची. कैरीचे ताजे लोणचे, आमरस, साखरांबा, पन्हे, आंब्यची साटं, रायवळच्या पिकलेल्या अख्ख्या आंब्याचे रायते, पल्प, आंब्याची वडी, केक, आईस्क्रिम, जाम, आणि बरेच काही. दर दिवशी नविन बेत असे. ही चंगळ अगदी आंब्याचा सिझन संपेपर्यंत चाले.

सुट्टीत घर पाहुण्यांनी भरुन जायचे. मावस-मामे-आत्ये-चुलत भावंड एकत्र जमून आंब्याचा यथेच्छ आनंद घेत असू.

“मे महिना = आंबे” हे समीकरण आयुष्यभर जुळून आलेले… अगदी मागच्या वर्षापर्यंत. या वर्षी न्यूजर्सी मध्ये आहे. अजून आंबा खाल्ला नाही याची हुरहुर वाटत होती. माझ्या इतकेच माझ्या नवर्‍यालाही आंब्यांचे वेड, त्यात करुन ‘हापूस’ चे जरा जास्तच. शोधाशोध करुन इथे कोणीतरी ‘रत्नागिरी हापूस’ विकतात हे कळले आणि शनिवारी सकाळी लगेच तिकडे आंबे आणायला पळालो. $४८ ला १ डझन या दरात आंबे विकत घेतले. महाग मिळाले खरे… पण मिळाले ‘हे ही नसे थोडके!’ :)

काल पहिला आंबा पिकला. आधी देवाला ठेवला आणि मग आम्ही दोघांनी प्रत्येक फोडीचा आस्वाद घेत घेत,  तो फस्त करण्याचे स्वर्गीय सुख घेतले.

आता आपण एक डझनच आंबे का आणले? अजून आणायला हवे होते का? हे आंबे लगेच संपतील, मग पुढे काय? आताशा विकणार्‍याचे आंबे संपले असतील. अशा एक ना अनेक विचार मनाला भेडसावतात. काय करणार…? मोजून मापून आंबे खायची सवय नाहीए ना!!! :D

Page copy protected against web site content infringement by Copyscape





१३१८, शुक्रवार पेठ

6 04 2011

शेवडे बोळातला फ्लॅट ही तात्पूर्ती सोय होती. महिन्या अखेरीला तो फ्लॅट सोडून नविन जागेत जायचे होते.त्या आधी नविन जागा शोधायचा खटाटोप होता. महिनाभर सकाळ-संध्याकाळ नविन जागेच शोध हाच उद्योग होता माझा आणि प्रज्ञाचा. बोळात १-२ ठिकाणी सांगून ठेवले होते की कोणाला कुठे पेईंग गेस्ट हव्या आहेत असे कळले तर आम्हाला सांगा. काही एजंटस् ना पण भेटून आलो. असे करत करत महिना संपत आला पण जागेची विवंचना काही सुटली नव्हती. दुपारी मेसचा डब्बा घेऊन आलो आणि जेवायला बसणार तोच एक मुलगी आम्हाला शोधत आली. नाव ‘कविता कुंटे’. तिने सांगितले एका आजींकडे २ मुलींसाठी १ खोली रिकामी होतेय, आम्हाला ती तिकडे घेऊन जाऊ शकते. आम्ही संध्याकाळची वेळ ठरवली आणि तिच्याबरोबर चालत निघालो. रस्त्यात आमचे बोलणे सुरु होते. कविताचे घर शेवडे बोळातल्या एका वाड्यातल्या जागेत होते. तिची मोठी बहिण डिलेवरीसाठी माहेरी आली होती, कविताची कसलीशी परिक्षा होती…जागे अभावी व कविताला अभ्यास करता यावा म्हणून ती या आजींकडे महिना-दीड महिना रहिली. तिला कळले आम्हाला जागेची गरज आहे आणि निघताना आजींनी कोणी मुली माहित असल्यास सांग असे तिला म्हणाल्या असणार. मी आणि प्रज्ञा आम्ही आधीच ठरवून टाकले होते की जागा जशी असेल तशी, आवडो न आवडो पक्की करुन टाकायची…दुसरा काही पर्याय नव्हताच.

शुक्रवार पेठेतल्या ‘श्रीशोभा’ नावाच्या मोठ्या बंगल्यासमोर आम्ही आलो आणि पाहताक्षणी त्या घराच्या प्रेमात पडलो. आत शिरलो. कविताने आजींशी ओळख करुन दिली. आजींचे वय ८३-८४ च्या घरात होते, ठेंगणीशी मूर्ती, गोरीपान कांती, पांढरे केस, थरथरते हात, फेंट रंगाची कॉटनची काष्टाची नऊवारी साडी, डोळ्यांवर जाड भिंगाचा – सोनेरी फ्रेमचा चष्मा, पायात सपाता, खणखणीत आवाज, सुस्पष्ट बोलणे, चेहर्‍यावर श्रीमंतीचे तेज आणि त्या जोडीला डोळ्यात मिश्किल भाव. अशा या आजी होत्या.
 
आजींनी आमची मोघम चौकशी केली – कोणत्या गावच्या, काय शिकता, वगैरे. खोली वरच्या मजल्यावर होती. आम्ही वर खोली बघायला गेलो. २ मुलींना पुरेल एवढी खोली, त्यात २ खाटा, गाद्या, भिंतीवर आरसा असलेले ड्रेसींग टेबल, एक भिंतीतले पुस्तकांचे कपाट, एक खाऊ ठेवायचे, आणि खोली बाहेर समोर एक  कपड्यांची कपाटे, हवेशीर जागा, खिडकीतून दिसणारी ‘महाराणा प्रताप’ बाग आणि वर्दळीचा ‘बाजीराव’ रस्ता. खोलीला लागून मोठी गच्ची, त्यात फुलंझाडांच्या अनेक कुंड्या, गच्चीच्या एक कोपर्‍यात एटॅच्ड् टॉयलेट-बाथरूम. आम्ही खाली आलो आणि आजींना सांगितले की रूम आम्हाला आवडली आणि भाडे ठरवून टाकले.
 
दोघींच्या प्रत्येकी २ बॅगस् घेऊन ३१ ऑक्टोबर १९९९ ला संध्याकाळी आम्ही आमचे बस्थान नविन जागेत हलविले. ४ ठिकाणी चौकशी करुन नविन मेसचा डब्बा लावला. टेलिफोन एक्सचेंज या कॉलनीला लागून होते, त्यामुळे रात्री ८ नंतर एस. टी. डी हाफ रेट मध्ये घरी रत्नागिरीला फोन करणे सोयीचे झाले होते. शनिवार-रविवार आजींकडे घरुन फोन येत असे. नविन जागेशी, आजींशी आम्ही जुळवून घेत होतो. हा बंगला ३ मजली होता. खालच्या फ्लोअरवर बरेच जुने असे २ भाडेकरु, मधल्या फ्लोअरवर आजी, आणि टॉप फ्लोअरवर आमच्या खोल्या आणी गच्ची. आजींच्या मजल्यावर एक मस्त अर्ध-गोलाकर, ग्रीलने बंदिस्त केलेली बालकनी होती. तिथे एका वेताच्या खुर्चीवर आजी संध्याकाळी बसत असत. आमची खोली ही वास्तविकरित्या एका मोठ्या खोलीची अर्धी खोली होती, लाकडाचे पर्मनंट पार्टिशन होते आणि त्यालाच एक दार होते जे नेहमी बंद असे. ती उरलेली दुसरी जागा आमच्या जागेपेक्षा जराशी मोठी होती आणि तिला स्वतंत्र दार होते जे गच्चीत उघडत होते. त्या जागेत कोणी परदेशी संस्क्रुत स्कॉलर ६ महिने येऊन रहात. हा बंगला आजींच्या नातेवाईकाने स्वत:  ४० वर्षांपूर्वी बांधला होता. पुण्यात झालेल्या भूकंपामुळे त्या घराला एक चीर गेली होती. परंतु त्याच्या भक्कम बांधकामामुळे फक्त एका चीरेवरच निभावले होते. खूपच सुंदर घर होते ते.

आजींना त्यांच्या घरचे सगळे ‘एमी’ म्हणत आणि ती हाक देखील ‘ए एमी’ अशी एकेरी असायची. मी एकदा त्यांना विचारल्यावर त्यांनी हे ‘एमी’ नाव कसे पडले ते सांगितले. त्यांचे माहेरचे नाव ‘विमल’ होते. घरचे सगळे याच नावाने हाक मारत. त्यांचा मुलगा जेव्हा बोलायला लागला तेव्हा तो ते एकून बोबडया बोलात ‘विमल’ चे ‘एमल’, ‘एमील’ असे म्हणू लागला आनि शेवटी ते ‘एमी’ असे नाव पडले. आजींचा मुलगा हा पुण्यातला मोठा उद्योगपती आहे, आजींना सुना-मुली, नात-नाती, पंतवंड आहेत. नाती आमच्याहुन मोठ्या, लग्न होऊन सासरी गेलेल्या. आम्ही ज्या खोलीत रहात होतो ती त्या २ नातींचीच खोली होती.  म्हणूनच दोन मुलींना लगेल असे सगळे होते त्या आमच्या खोलीत.
 
आजी बोलायला एकदम छान होत्या, शिस्तीला कडक होत्या. ७-७:३० पर्यंत घरी आलेच पाहिजे असा नियम होता. विकेन्डला थोडा उशीर चालत असे. आजींचे विचार सुधारीत होते, नव-नविन माहिती जाणून घेण्याची आवड होती. संध्याकाळी कधी कधी आम्ही गप्पा मारत बाल्कनीत बसत असू. आजी भारत, अमेरिका, युरोप सगळं फिरल्या होत्या. एवढेच काय तर त्यांचे नातजावई आर्मी मध्ये होते म्हणून त्या त्यावर्षी पुण्याहून ट्रेनने जम्मू-काश्मिर चा दौरा करुन आल्या. वाघा बॉर्डर बघून आल्या. त्यांचा उत्साह दांडगा होता.

दर दिवशी पहाटे ५:३० ला उठून, चहा करत, दूध तापवत, फडके दूधवाला दूधाची पिशवी आणि पेपरवाला मुलगा ‘सकाळ’ या दोन्ही गोष्टी, जिन्याला शंकरपाळी सारख्या डिझाईनची भोके होती, त्यात ठेवून जात. मग चहा तयार झाला की आजी ते आत घेऊन जात. त्यांच्याकडे नेहमी आदल्या दिवशीची दूधाची पिशवी असे जी त्या आजला तापवत. कालची आजला, आजची उद्याला असे काहीसे. आजची नविन दूधाची पिशवी फ्रीजमध्ये ठेवत असत. किटलीत चहा घेऊन गादीवर पपेर वाचत त्या चहा घेत. उजेडासाठी एक जुना टेबल लॅम्प असे. दुपारी पूर्ण जेवण, अगदी दही-ताकासकट. संध्याकाळी ७-७:३० ला फक्त एक कप दूध, एखादे बिस्किट किंवा ब्रेड स्लाईस असा हा त्यांचा आहारक्रम आम्ही बघत आलोय. आजींचे करणे सुग्रण होते. वेगवेगळ्या वड्या करत असत. आंब्याच्या मौसमात कोकणातून आंब्याची पेटी येत असे, नातवा-पंतवंडांसाठी त्या भरपूर साखरांबा करायच्या आणि ज्याच्या-त्याच्या घरी पोस्त करायच्या.

२००० साली एप्रिलमध्ये मला नोकरी लागली. मी icici बॅंकेत खाते काढले. ए.टी.एम. कार्ड नविन होते तेव्हा आणि मला या नविन गोष्टींचा भारी सोस. आजींना मी ए.टी.एम. काय भानगड आहे व ते कसे वापरले जाते ते एकदा सांगितले आणि ते एकून त्या एकदम अचंबीत झाल्या. “मी पण येईन एकदा ए.टी.एम. सेंटरला” असे त्या म्हणाल्या. सकाळ पेपरच्या ‘वाचकांचा पत्रव्यवहार’ यात त्या काही काही लिहून त्या पाठवायच्या. कुठे आपली मते, कुठे कॉलनीतले प्रॉब्लेम्स, कुठे काय. गणपतीमध्ये रात्री ११ नंतर लाऊड स्पीकर बंद ठेवावेत म्हणून त्या गणपती आधीच पुणे पोलिस कमिशनर ला भेटून लेखी अर्ज देऊन यायच्या. याचा जेवढा उपयोग होणार तेवढाच व्हायचा पण यांना समाधान असे की आपण आपले कर्तव्य करुन आलो.

असाच एक किस्सा आठवतो – एकदा आजी फुथपाथवरुन चालल्या होत्या. कोणालातरी दुर्बुद्धी झाली असेल त्याने गाडी फुथपाथवर चढवून पार्क केली होती. आजींना राग आला. त्यांनी समोरुन येणार्‍या शाळकरी मुलाला थांबवले आणि त्याच्याकडून वहीचा कागद-पेन घेऊन, “ही जागा चालण्याकरिता आहे. वहाने लावण्यासाठी नाही. असे करुन वयोवृद्धांची गैरसोय करु नये.” अशी चिठ्ठी लिहिली व त्या गाडीच्या वायपर वर लावून आल्या.

त्यांच्या शिस्तीचा आम्हालाही कधीतरी कंटाळा येई, याचा अर्थ आम्ही बेफाम होतो असा नाही. त्या शिस्तीचे महत्त्वही कळत होते. माझे इन-मीन तीन मित्र घरी यायचे. घरी म्हणजे दारात. वर त्यांना प्रवेश नव्हता. आजींना आधी त्यांचा राग यायचा. कदाचित बेल वाजवली की दार उघडायचा त्यांना त्रास होत असावा. मग बर्‍याच वेळेस त्या आम्ही असतानाही रागाने नाही आहोत असे सांगून टाकायच्या. थोड्याच दिवसात आम्ही थिल्लर मुली नाही आणि हे आमचे फक्त मित्रच आहेत हे पटले आणि नंतर त्यांचा राग कमी झाला.

त्यांचा आमच्यावर नंतर इतका विश्वास बसला की ३-४ वेळा संपूर्ण घराची जबाबदारी आमच्यावर टाकून त्या बिंधास्त फिरायला गेल्या. काश्मिरला गेल्या तेव्हा, आजारी पडून मुलाकडे-मुलीकडे रहायला गेल्या तेव्हा. पण कधी काही गैर फायदा घ्यावा असे मनातही आले नाही. किचन वापरची आणि कधी आजारी पडलो तर खिचडी करुन खायची मुभा होती. तसा आमचा मेसचा डबा होताच. कधीतरी आजी थोडीशी भाजी देत असत. रात्री हॉलमध्ये एकत्र आम्ही अधेमधे टि.व्हि बघायला जात असू.

पाकिस्तानवर आजींचा फार रोश होता. राजकारणात भयंकर इंटरेस्ट. वाजपेईंना पत्र पाठवून झाले होते. मस्करीत म्हणायच्या एक-एक बंदुक देऊन सीमेवर पाठवले पाहिजे आपल्या लोकांना, पाकड्यांना ठार करायला. आणि हातात बंदुक मिळाली तर ह्या वयात देखील असे काही करायला डगमगणार नाहीत अशी आम्हाला खात्री होती. त्या दरम्याने मला एका पोलिसाच्या जीपने टक्कर दिली आणि अपघात झाला. मी त्या पोलिसाची, पोलिस कमिशनरकडे तक्रार केली आणि त्याला शिक्षा झाली. अन्याया विरुद्ध लढा दिला या सगळ्या प्रकरणावर आजी बेहद्द खुष झाल्या होत्या.

आजींना स्वच्छता फार प्रिय. त्या स्वत: वर येऊन आमची रूम स्वच्छ आहे का ते बघत असत. आमची रुम नेहमीच स्वच्छ असायची. नियमित केर काढायचो, आठवड्यातून एकदा लादी पुसायचो. त्यांना खात्री पटल्यावर त्यांनी रुम चेक करणे सोडले. रूम मध्ये कॉम्पूटर आल्यावर रुमला कुलुप लावायला परवानगी मिळाली. 

त्यांच्या मुलाचे नाव ‘श्रीनिवास’ आणि मुलीचे ‘शोभा’ म्हणून घराचे नाव ‘श्रीशोभा’ होते हे त्यांनी सांगितले. कधी कधी आजी पूर्वीच्या आठवणींमध्ये रमून जात आणि आमच्याशी बोलत्या होत. स्वत:च्या नवर्‍याचा उल्लेख ‘शोभा आत्याचे वडिल’ असा करत. त्यांच्याबद्दल सांगत. त्यांच्या स्म्रुतीदिना दिवशी त्या घरी भजनाचा, व्याख्यानाचा किंवा गाण्याचा प्रोग्राम ठेवत. आम्हाला नेहमी आश्चर्य वाटायचे की एवढी सुबत्ता असतानाही एमी एकट्या का आणि कशा रहातात. नंतर कळले की त्यांचे घर हेच त्यांचे सोबती आहे. त्यात त्यांच्या संसाराच्या, चांगल्या-वाईट दिवसांच्या असंख्य आठवणी दडलेल्या आहेत. एवढ्या वयात देखील त्या घरातील प्रत्येक बाबीवर जातीने लक्ष देत व देख-रेख ठेवत.

९ मे ला आजींचा वाढदिवस आम्ही साजरा करायचो. अशाच एका वाढदिवसला त्यांच्या मुलाने हिरवट रंगाची नवी कोरी ‘झेन’ पाठवली होती त्यांना घेऊन जायला. त्यांचा ठरलेला ‘पंडित’ नावाचा ड्रायवर असे जो आजींना नेहमी आणायला-सोडायला येत असे. तशाच ‘विठाबाई’ म्हणून एक म्हातार्‍या बाई आजींकडे खूप वर्षांपासून घर कामाला होत्या.

आजींना सगळे ओळखत होते. पोस्टमन पासून ते आसपासच्या परिसरातले सगळेच. कोलनीमध्ये पण त्यांचा रुबाब होता. दर दिवशी संध्याकाळी आजींकडे कॉलनीतल्या बायका जमायच्या आणि रामायणाचे की गीतेचे वाचन करायच्या. गंमत आठवतेय – परिक्षा संपवून दोन-अडीच महिने प्रज्ञा सुट्टी लागली की रत्नागिरीला जात असे. मग आम्ही एकमेकींना पत्र लिहायचो. एकदा तिने फक्त ‘१३१८, शुक्रवार पेठ, पुणे’ एवढाच पत्ता घालून पत्र टाकले, ‘बाजीराव रस्ता’ हे घालायचे ती विसरली तरी ते पत्र बरोबर पोहोचले. म्हणून म्हणाले आजी फेमस होत्या आमच्या.
 
आजींना तब्येतीमुळे मुलाकडे रहाण्याचा निर्णय घेणार होत्या म्हणून आम्ही ती जागा सोडायचे ठरवले. तब्बल ३.५ वर्षांचा ऋणानुबंध होता. त्या जागेवर प्रेम आणि आजींवर श्रद्धा जडली होती. त्या वास्तूत आम्ही आमच्या आयुष्याच्या घडणीतले सोनेरी क्षण जगलो होतो. त्या परिसरात वाढलो होतो. नंतर पुण्यातल्या बर्‍याच ठिकाणी राहिलो. आता तर स्वत:ची घरं झाली माझी आणि प्रज्ञाची पण अजूनही बाजीराव रस्त्यावर गेलो की जो आपलेपणा जाणवतो तो इतरत्र कुठेही नाही. तिथून सोडून गेलो तरी त्या रस्त्यावरुन जाताना,  बागेसमोर थांबुन “ती दिसतेय ना ती आमची रूम” असे त्या खोलीकडे बोट करत आम्ही जणू ‘मस्तानी महाल’ किंवा ‘शनिवार वाडा’ दाखवतोय अशा थाटात सोबतच्या नातेवाईकांना/मित्र/मैत्रिणींना दाखवत असू.
 
तिथून निघलो ते चांगल्यासाठी… आजींचे आशिर्वाद घेऊन. आम्ही दोघीही खूपच साध्या-सरळ होतो (अहो, अजूनही आहोत). फाजिल चोचले करायला वेळ आणि पैसा दोन्ही नव्हता. काहीतरी चांगले करावे, बनावे हेच ध्येय समोर होते. प्रज्ञाचे शिक्षण सुरु होते आणि माझी तर दुहेरी कसरत – नोकरी व शिक्षण दोन्ही. एन्जोयमेन्ट केलीच नाही असे ही नाही. त्यावेळी कपडे घेण्यापेक्षा एखादे अभ्यासाचे पुस्तक विकत घेणे जस्त होत होते. अभ्यास-नोकरी-पुस्तकं-कॉम्पूटर-मेस चे जेवण करता-करता गप्पा, या व्यतिरिक्त काहीच करमणूक नव्हती. गरजा कमी होत्या आणि ते कमी गरजांचे आयुष्य आनंदी होते.
 
आम्ही ती जागा सोडली आणि काही वर्षात ते घर पाडून तिथे नविन बिल्डिंग बांधली जातेय हे कळले आणि मनं हळहळले. आपले घर पाडत आहेत याचा आजींना कित्ती त्रास झाला असेल याची कल्पनाच करवेना. रस्त्यावरुन दिसणारी आमची ती खोली, ती खिडकी कायमची नाहिशी झाली. नंतर उभ्या राहिलेल्या बिल्डिंग बद्दल आदर असण्याचे कारण नव्हते. शेजारच्या ‘माई जोशी’ यांच्या कडून एमींची चौकशी करत होते. एमी आता फार थकल्यात हेच समजत असे. खूप वेळा त्यांना भेटायचे ठरवले पण राहून गेले.

पुण्यातले वाडे पाडून त्या जागी नविन इमारती उभ्या राहातात हे अनेक वेळा वाचले होते पण त्या जुन्या जागी राहणार्‍यांना घर तुटताना काय वाटत असेल याचे दु:ख आम्ही आमचे स्वत:चे घर नसतानाही अनुभवले. एमींसारख्या अनेक वृद्धांना ते हयातीत बघावे लागले हे न जाणो कोणत्या जन्माचे भोग होते.
 
जग कित्ती लहान आहे याचा अजून एक अनुभव आला. २००९ मध्ये मी कामानिमित्त अमेरिकेत आले. डॅलसहून मुंबईला परतत होते आणि एअरपोर्ट वर ओळखीचे चेहरे दिसले. आजींचा मुलगा रमेश काका आणि त्यांची बायको होते. आजींची नात डॅलसला असते, तिकडे राहून ते पण परत चालले होते. दोघेही आपुलकीने बोलले. बोलून झाले आणि त्यांनी काजू कतरीचा एक पुडा हातत दिला आणि म्हणाल्या “हा घे तुला”. परक्या देशी आणि इतक्या वर्षांनंतर भेटून देखील त्यांचे हे वागणे मनाला आनंद देऊन गेले. आजींनी कधी तोंडावर स्तुती केली नाही पण  मला कळले की त्यांनाही आमच्याबद्दल काहीतरी वाटत होते, काही भावना होत्या.

मागच्या महिन्यात एमी गेल्याचे कळले…ते ही फेसबुकवर. लगेच ती बातमी कन्फर्म करुन घेतली. दु:ख झाले. खूप आठवणी मनात दाटून आल्या आणि गहिवरुन आले.
 
त्यांच्या विषयी काही लिहावे वाटले, त्या घरा विषयी लिहावे वाटले. आज ते घर नाही, ती आमची खोली नाही, ती सुंदर बालकनी नाही आणि त्या एमी ही नाहीत.  पण मनात अजूनही सगळे अगदी जसेच्या तसे आहे….ते घर, आमची खोली, त्यातल्या आमच्या वस्तू, ती बालकनी, त्या वेताच्या खुर्चीवर बसलेल्या आमच्या आजी आणि त्यांच्याशी गप्पा मारत बसलेल्या आम्ही दोघी…

Page copy protected against web site content infringement by Copyscape








Follow

Get every new post delivered to your Inbox.