शेवडे बोळातला फ्लॅट ही तात्पूर्ती सोय होती. महिन्या अखेरीला तो फ्लॅट सोडून नविन जागेत जायचे होते.त्या आधी नविन जागा शोधायचा खटाटोप होता. महिनाभर सकाळ-संध्याकाळ नविन जागेच शोध हाच उद्योग होता माझा आणि प्रज्ञाचा. बोळात १-२ ठिकाणी सांगून ठेवले होते की कोणाला कुठे पेईंग गेस्ट हव्या आहेत असे कळले तर आम्हाला सांगा. काही एजंटस् ना पण भेटून आलो. असे करत करत महिना संपत आला पण जागेची विवंचना काही सुटली नव्हती. दुपारी मेसचा डब्बा घेऊन आलो आणि जेवायला बसणार तोच एक मुलगी आम्हाला शोधत आली. नाव ‘कविता कुंटे’. तिने सांगितले एका आजींकडे २ मुलींसाठी १ खोली रिकामी होतेय, आम्हाला ती तिकडे घेऊन जाऊ शकते. आम्ही संध्याकाळची वेळ ठरवली आणि तिच्याबरोबर चालत निघालो. रस्त्यात आमचे बोलणे सुरु होते. कविताचे घर शेवडे बोळातल्या एका वाड्यातल्या जागेत होते. तिची मोठी बहिण डिलेवरीसाठी माहेरी आली होती, कविताची कसलीशी परिक्षा होती…जागे अभावी व कविताला अभ्यास करता यावा म्हणून ती या आजींकडे महिना-दीड महिना रहिली. तिला कळले आम्हाला जागेची गरज आहे आणि निघताना आजींनी कोणी मुली माहित असल्यास सांग असे तिला म्हणाल्या असणार. मी आणि प्रज्ञा आम्ही आधीच ठरवून टाकले होते की जागा जशी असेल तशी, आवडो न आवडो पक्की करुन टाकायची…दुसरा काही पर्याय नव्हताच.
शुक्रवार पेठेतल्या ‘श्रीशोभा’ नावाच्या मोठ्या बंगल्यासमोर आम्ही आलो आणि पाहताक्षणी त्या घराच्या प्रेमात पडलो. आत शिरलो. कविताने आजींशी ओळख करुन दिली. आजींचे वय ८३-८४ च्या घरात होते, ठेंगणीशी मूर्ती, गोरीपान कांती, पांढरे केस, थरथरते हात, फेंट रंगाची कॉटनची काष्टाची नऊवारी साडी, डोळ्यांवर जाड भिंगाचा – सोनेरी फ्रेमचा चष्मा, पायात सपाता, खणखणीत आवाज, सुस्पष्ट बोलणे, चेहर्यावर श्रीमंतीचे तेज आणि त्या जोडीला डोळ्यात मिश्किल भाव. अशा या आजी होत्या.
आजींनी आमची मोघम चौकशी केली – कोणत्या गावच्या, काय शिकता, वगैरे. खोली वरच्या मजल्यावर होती. आम्ही वर खोली बघायला गेलो. २ मुलींना पुरेल एवढी खोली, त्यात २ खाटा, गाद्या, भिंतीवर आरसा असलेले ड्रेसींग टेबल, एक भिंतीतले पुस्तकांचे कपाट, एक खाऊ ठेवायचे, आणि खोली बाहेर समोर एक कपड्यांची कपाटे, हवेशीर जागा, खिडकीतून दिसणारी ‘महाराणा प्रताप’ बाग आणि वर्दळीचा ‘बाजीराव’ रस्ता. खोलीला लागून मोठी गच्ची, त्यात फुलंझाडांच्या अनेक कुंड्या, गच्चीच्या एक कोपर्यात एटॅच्ड् टॉयलेट-बाथरूम. आम्ही खाली आलो आणि आजींना सांगितले की रूम आम्हाला आवडली आणि भाडे ठरवून टाकले.
दोघींच्या प्रत्येकी २ बॅगस् घेऊन ३१ ऑक्टोबर १९९९ ला संध्याकाळी आम्ही आमचे बस्थान नविन जागेत हलविले. ४ ठिकाणी चौकशी करुन नविन मेसचा डब्बा लावला. टेलिफोन एक्सचेंज या कॉलनीला लागून होते, त्यामुळे रात्री ८ नंतर एस. टी. डी हाफ रेट मध्ये घरी रत्नागिरीला फोन करणे सोयीचे झाले होते. शनिवार-रविवार आजींकडे घरुन फोन येत असे. नविन जागेशी, आजींशी आम्ही जुळवून घेत होतो. हा बंगला ३ मजली होता. खालच्या फ्लोअरवर बरेच जुने असे २ भाडेकरु, मधल्या फ्लोअरवर आजी, आणि टॉप फ्लोअरवर आमच्या खोल्या आणी गच्ची. आजींच्या मजल्यावर एक मस्त अर्ध-गोलाकर, ग्रीलने बंदिस्त केलेली बालकनी होती. तिथे एका वेताच्या खुर्चीवर आजी संध्याकाळी बसत असत. आमची खोली ही वास्तविकरित्या एका मोठ्या खोलीची अर्धी खोली होती, लाकडाचे पर्मनंट पार्टिशन होते आणि त्यालाच एक दार होते जे नेहमी बंद असे. ती उरलेली दुसरी जागा आमच्या जागेपेक्षा जराशी मोठी होती आणि तिला स्वतंत्र दार होते जे गच्चीत उघडत होते. त्या जागेत कोणी परदेशी संस्क्रुत स्कॉलर ६ महिने येऊन रहात. हा बंगला आजींच्या नातेवाईकाने स्वत: ४० वर्षांपूर्वी बांधला होता. पुण्यात झालेल्या भूकंपामुळे त्या घराला एक चीर गेली होती. परंतु त्याच्या भक्कम बांधकामामुळे फक्त एका चीरेवरच निभावले होते. खूपच सुंदर घर होते ते.
आजींना त्यांच्या घरचे सगळे ‘एमी’ म्हणत आणि ती हाक देखील ‘ए एमी’ अशी एकेरी असायची. मी एकदा त्यांना विचारल्यावर त्यांनी हे ‘एमी’ नाव कसे पडले ते सांगितले. त्यांचे माहेरचे नाव ‘विमल’ होते. घरचे सगळे याच नावाने हाक मारत. त्यांचा मुलगा जेव्हा बोलायला लागला तेव्हा तो ते एकून बोबडया बोलात ‘विमल’ चे ‘एमल’, ‘एमील’ असे म्हणू लागला आनि शेवटी ते ‘एमी’ असे नाव पडले. आजींचा मुलगा हा पुण्यातला मोठा उद्योगपती आहे, आजींना सुना-मुली, नात-नाती, पंतवंड आहेत. नाती आमच्याहुन मोठ्या, लग्न होऊन सासरी गेलेल्या. आम्ही ज्या खोलीत रहात होतो ती त्या २ नातींचीच खोली होती. म्हणूनच दोन मुलींना लगेल असे सगळे होते त्या आमच्या खोलीत.
आजी बोलायला एकदम छान होत्या, शिस्तीला कडक होत्या. ७-७:३० पर्यंत घरी आलेच पाहिजे असा नियम होता. विकेन्डला थोडा उशीर चालत असे. आजींचे विचार सुधारीत होते, नव-नविन माहिती जाणून घेण्याची आवड होती. संध्याकाळी कधी कधी आम्ही गप्पा मारत बाल्कनीत बसत असू. आजी भारत, अमेरिका, युरोप सगळं फिरल्या होत्या. एवढेच काय तर त्यांचे नातजावई आर्मी मध्ये होते म्हणून त्या त्यावर्षी पुण्याहून ट्रेनने जम्मू-काश्मिर चा दौरा करुन आल्या. वाघा बॉर्डर बघून आल्या. त्यांचा उत्साह दांडगा होता.
दर दिवशी पहाटे ५:३० ला उठून, चहा करत, दूध तापवत, फडके दूधवाला दूधाची पिशवी आणि पेपरवाला मुलगा ‘सकाळ’ या दोन्ही गोष्टी, जिन्याला शंकरपाळी सारख्या डिझाईनची भोके होती, त्यात ठेवून जात. मग चहा तयार झाला की आजी ते आत घेऊन जात. त्यांच्याकडे नेहमी आदल्या दिवशीची दूधाची पिशवी असे जी त्या आजला तापवत. कालची आजला, आजची उद्याला असे काहीसे. आजची नविन दूधाची पिशवी फ्रीजमध्ये ठेवत असत. किटलीत चहा घेऊन गादीवर पपेर वाचत त्या चहा घेत. उजेडासाठी एक जुना टेबल लॅम्प असे. दुपारी पूर्ण जेवण, अगदी दही-ताकासकट. संध्याकाळी ७-७:३० ला फक्त एक कप दूध, एखादे बिस्किट किंवा ब्रेड स्लाईस असा हा त्यांचा आहारक्रम आम्ही बघत आलोय. आजींचे करणे सुग्रण होते. वेगवेगळ्या वड्या करत असत. आंब्याच्या मौसमात कोकणातून आंब्याची पेटी येत असे, नातवा-पंतवंडांसाठी त्या भरपूर साखरांबा करायच्या आणि ज्याच्या-त्याच्या घरी पोस्त करायच्या.
२००० साली एप्रिलमध्ये मला नोकरी लागली. मी icici बॅंकेत खाते काढले. ए.टी.एम. कार्ड नविन होते तेव्हा आणि मला या नविन गोष्टींचा भारी सोस. आजींना मी ए.टी.एम. काय भानगड आहे व ते कसे वापरले जाते ते एकदा सांगितले आणि ते एकून त्या एकदम अचंबीत झाल्या. “मी पण येईन एकदा ए.टी.एम. सेंटरला” असे त्या म्हणाल्या. सकाळ पेपरच्या ‘वाचकांचा पत्रव्यवहार’ यात त्या काही काही लिहून त्या पाठवायच्या. कुठे आपली मते, कुठे कॉलनीतले प्रॉब्लेम्स, कुठे काय. गणपतीमध्ये रात्री ११ नंतर लाऊड स्पीकर बंद ठेवावेत म्हणून त्या गणपती आधीच पुणे पोलिस कमिशनर ला भेटून लेखी अर्ज देऊन यायच्या. याचा जेवढा उपयोग होणार तेवढाच व्हायचा पण यांना समाधान असे की आपण आपले कर्तव्य करुन आलो.
असाच एक किस्सा आठवतो – एकदा आजी फुथपाथवरुन चालल्या होत्या. कोणालातरी दुर्बुद्धी झाली असेल त्याने गाडी फुथपाथवर चढवून पार्क केली होती. आजींना राग आला. त्यांनी समोरुन येणार्या शाळकरी मुलाला थांबवले आणि त्याच्याकडून वहीचा कागद-पेन घेऊन, “ही जागा चालण्याकरिता आहे. वहाने लावण्यासाठी नाही. असे करुन वयोवृद्धांची गैरसोय करु नये.” अशी चिठ्ठी लिहिली व त्या गाडीच्या वायपर वर लावून आल्या.
त्यांच्या शिस्तीचा आम्हालाही कधीतरी कंटाळा येई, याचा अर्थ आम्ही बेफाम होतो असा नाही. त्या शिस्तीचे महत्त्वही कळत होते. माझे इन-मीन तीन मित्र घरी यायचे. घरी म्हणजे दारात. वर त्यांना प्रवेश नव्हता. आजींना आधी त्यांचा राग यायचा. कदाचित बेल वाजवली की दार उघडायचा त्यांना त्रास होत असावा. मग बर्याच वेळेस त्या आम्ही असतानाही रागाने नाही आहोत असे सांगून टाकायच्या. थोड्याच दिवसात आम्ही थिल्लर मुली नाही आणि हे आमचे फक्त मित्रच आहेत हे पटले आणि नंतर त्यांचा राग कमी झाला.
त्यांचा आमच्यावर नंतर इतका विश्वास बसला की ३-४ वेळा संपूर्ण घराची जबाबदारी आमच्यावर टाकून त्या बिंधास्त फिरायला गेल्या. काश्मिरला गेल्या तेव्हा, आजारी पडून मुलाकडे-मुलीकडे रहायला गेल्या तेव्हा. पण कधी काही गैर फायदा घ्यावा असे मनातही आले नाही. किचन वापरची आणि कधी आजारी पडलो तर खिचडी करुन खायची मुभा होती. तसा आमचा मेसचा डबा होताच. कधीतरी आजी थोडीशी भाजी देत असत. रात्री हॉलमध्ये एकत्र आम्ही अधेमधे टि.व्हि बघायला जात असू.
पाकिस्तानवर आजींचा फार रोश होता. राजकारणात भयंकर इंटरेस्ट. वाजपेईंना पत्र पाठवून झाले होते. मस्करीत म्हणायच्या एक-एक बंदुक देऊन सीमेवर पाठवले पाहिजे आपल्या लोकांना, पाकड्यांना ठार करायला. आणि हातात बंदुक मिळाली तर ह्या वयात देखील असे काही करायला डगमगणार नाहीत अशी आम्हाला खात्री होती. त्या दरम्याने मला एका पोलिसाच्या जीपने टक्कर दिली आणि अपघात झाला. मी त्या पोलिसाची, पोलिस कमिशनरकडे तक्रार केली आणि त्याला शिक्षा झाली. अन्याया विरुद्ध लढा दिला या सगळ्या प्रकरणावर आजी बेहद्द खुष झाल्या होत्या.
आजींना स्वच्छता फार प्रिय. त्या स्वत: वर येऊन आमची रूम स्वच्छ आहे का ते बघत असत. आमची रुम नेहमीच स्वच्छ असायची. नियमित केर काढायचो, आठवड्यातून एकदा लादी पुसायचो. त्यांना खात्री पटल्यावर त्यांनी रुम चेक करणे सोडले. रूम मध्ये कॉम्पूटर आल्यावर रुमला कुलुप लावायला परवानगी मिळाली.
त्यांच्या मुलाचे नाव ‘श्रीनिवास’ आणि मुलीचे ‘शोभा’ म्हणून घराचे नाव ‘श्रीशोभा’ होते हे त्यांनी सांगितले. कधी कधी आजी पूर्वीच्या आठवणींमध्ये रमून जात आणि आमच्याशी बोलत्या होत. स्वत:च्या नवर्याचा उल्लेख ‘शोभा आत्याचे वडिल’ असा करत. त्यांच्याबद्दल सांगत. त्यांच्या स्म्रुतीदिना दिवशी त्या घरी भजनाचा, व्याख्यानाचा किंवा गाण्याचा प्रोग्राम ठेवत. आम्हाला नेहमी आश्चर्य वाटायचे की एवढी सुबत्ता असतानाही एमी एकट्या का आणि कशा रहातात. नंतर कळले की त्यांचे घर हेच त्यांचे सोबती आहे. त्यात त्यांच्या संसाराच्या, चांगल्या-वाईट दिवसांच्या असंख्य आठवणी दडलेल्या आहेत. एवढ्या वयात देखील त्या घरातील प्रत्येक बाबीवर जातीने लक्ष देत व देख-रेख ठेवत.
९ मे ला आजींचा वाढदिवस आम्ही साजरा करायचो. अशाच एका वाढदिवसला त्यांच्या मुलाने हिरवट रंगाची नवी कोरी ‘झेन’ पाठवली होती त्यांना घेऊन जायला. त्यांचा ठरलेला ‘पंडित’ नावाचा ड्रायवर असे जो आजींना नेहमी आणायला-सोडायला येत असे. तशाच ‘विठाबाई’ म्हणून एक म्हातार्या बाई आजींकडे खूप वर्षांपासून घर कामाला होत्या.
आजींना सगळे ओळखत होते. पोस्टमन पासून ते आसपासच्या परिसरातले सगळेच. कोलनीमध्ये पण त्यांचा रुबाब होता. दर दिवशी संध्याकाळी आजींकडे कॉलनीतल्या बायका जमायच्या आणि रामायणाचे की गीतेचे वाचन करायच्या. गंमत आठवतेय – परिक्षा संपवून दोन-अडीच महिने प्रज्ञा सुट्टी लागली की रत्नागिरीला जात असे. मग आम्ही एकमेकींना पत्र लिहायचो. एकदा तिने फक्त ‘१३१८, शुक्रवार पेठ, पुणे’ एवढाच पत्ता घालून पत्र टाकले, ‘बाजीराव रस्ता’ हे घालायचे ती विसरली तरी ते पत्र बरोबर पोहोचले. म्हणून म्हणाले आजी फेमस होत्या आमच्या.
आजींना तब्येतीमुळे मुलाकडे रहाण्याचा निर्णय घेणार होत्या म्हणून आम्ही ती जागा सोडायचे ठरवले. तब्बल ३.५ वर्षांचा ऋणानुबंध होता. त्या जागेवर प्रेम आणि आजींवर श्रद्धा जडली होती. त्या वास्तूत आम्ही आमच्या आयुष्याच्या घडणीतले सोनेरी क्षण जगलो होतो. त्या परिसरात वाढलो होतो. नंतर पुण्यातल्या बर्याच ठिकाणी राहिलो. आता तर स्वत:ची घरं झाली माझी आणि प्रज्ञाची पण अजूनही बाजीराव रस्त्यावर गेलो की जो आपलेपणा जाणवतो तो इतरत्र कुठेही नाही. तिथून सोडून गेलो तरी त्या रस्त्यावरुन जाताना, बागेसमोर थांबुन “ती दिसतेय ना ती आमची रूम” असे त्या खोलीकडे बोट करत आम्ही जणू ‘मस्तानी महाल’ किंवा ‘शनिवार वाडा’ दाखवतोय अशा थाटात सोबतच्या नातेवाईकांना/मित्र/मैत्रिणींना दाखवत असू.
तिथून निघलो ते चांगल्यासाठी… आजींचे आशिर्वाद घेऊन. आम्ही दोघीही खूपच साध्या-सरळ होतो (अहो, अजूनही आहोत). फाजिल चोचले करायला वेळ आणि पैसा दोन्ही नव्हता. काहीतरी चांगले करावे, बनावे हेच ध्येय समोर होते. प्रज्ञाचे शिक्षण सुरु होते आणि माझी तर दुहेरी कसरत – नोकरी व शिक्षण दोन्ही. एन्जोयमेन्ट केलीच नाही असे ही नाही. त्यावेळी कपडे घेण्यापेक्षा एखादे अभ्यासाचे पुस्तक विकत घेणे जस्त होत होते. अभ्यास-नोकरी-पुस्तकं-कॉम्पूटर-मेस चे जेवण करता-करता गप्पा, या व्यतिरिक्त काहीच करमणूक नव्हती. गरजा कमी होत्या आणि ते कमी गरजांचे आयुष्य आनंदी होते.
आम्ही ती जागा सोडली आणि काही वर्षात ते घर पाडून तिथे नविन बिल्डिंग बांधली जातेय हे कळले आणि मनं हळहळले. आपले घर पाडत आहेत याचा आजींना कित्ती त्रास झाला असेल याची कल्पनाच करवेना. रस्त्यावरुन दिसणारी आमची ती खोली, ती खिडकी कायमची नाहिशी झाली. नंतर उभ्या राहिलेल्या बिल्डिंग बद्दल आदर असण्याचे कारण नव्हते. शेजारच्या ‘माई जोशी’ यांच्या कडून एमींची चौकशी करत होते. एमी आता फार थकल्यात हेच समजत असे. खूप वेळा त्यांना भेटायचे ठरवले पण राहून गेले.
पुण्यातले वाडे पाडून त्या जागी नविन इमारती उभ्या राहातात हे अनेक वेळा वाचले होते पण त्या जुन्या जागी राहणार्यांना घर तुटताना काय वाटत असेल याचे दु:ख आम्ही आमचे स्वत:चे घर नसतानाही अनुभवले. एमींसारख्या अनेक वृद्धांना ते हयातीत बघावे लागले हे न जाणो कोणत्या जन्माचे भोग होते.
जग कित्ती लहान आहे याचा अजून एक अनुभव आला. २००९ मध्ये मी कामानिमित्त अमेरिकेत आले. डॅलसहून मुंबईला परतत होते आणि एअरपोर्ट वर ओळखीचे चेहरे दिसले. आजींचा मुलगा रमेश काका आणि त्यांची बायको होते. आजींची नात डॅलसला असते, तिकडे राहून ते पण परत चालले होते. दोघेही आपुलकीने बोलले. बोलून झाले आणि त्यांनी काजू कतरीचा एक पुडा हातत दिला आणि म्हणाल्या “हा घे तुला”. परक्या देशी आणि इतक्या वर्षांनंतर भेटून देखील त्यांचे हे वागणे मनाला आनंद देऊन गेले. आजींनी कधी तोंडावर स्तुती केली नाही पण मला कळले की त्यांनाही आमच्याबद्दल काहीतरी वाटत होते, काही भावना होत्या.
मागच्या महिन्यात एमी गेल्याचे कळले…ते ही फेसबुकवर. लगेच ती बातमी कन्फर्म करुन घेतली. दु:ख झाले. खूप आठवणी मनात दाटून आल्या आणि गहिवरुन आले.
त्यांच्या विषयी काही लिहावे वाटले, त्या घरा विषयी लिहावे वाटले. आज ते घर नाही, ती आमची खोली नाही, ती सुंदर बालकनी नाही आणि त्या एमी ही नाहीत. पण मनात अजूनही सगळे अगदी जसेच्या तसे आहे….ते घर, आमची खोली, त्यातल्या आमच्या वस्तू, ती बालकनी, त्या वेताच्या खुर्चीवर बसलेल्या आमच्या आजी आणि त्यांच्याशी गप्पा मारत बसलेल्या आम्ही दोघी…

ताज्या प्रतिक्रिया